मुंबई,- एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या भावनिक पत्रावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. क्रांती रेडकर यांचा या प्रकरणाशी संबंधच काय? ही लढाई एनसीबी आणि इतर अशी सुरू आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.
क्रांती रेडकर यांच्यावर कुणी व्यक्तिगत टीका टिप्पणी केली असल्याचे माझ्या पाहण्यात नाही. ईडी, सीबीआय, एनसीबी हे बाहेरचे अधिकारी महाराष्ट्रात येऊन आमच्या मराठी लोकांना त्रास देत आहेत. ते मराठीच आहेत ना, ते काय अमराठी आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
दिल्लीतून केंद्रीय तपास यंत्रणांचे ज्या प्रकारे आक्रमण सुरू आहे, कारण नसताना अनेकांच्या मानगुटीवर बसण्याचा प्रयत्न होत आहे. अनेक खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. धाडी पडत आहे. कालही देगलूरमध्ये निवडणूक सुरू असताना धाडी पडल्या. अशोक चव्हाण मराठी नाहीत का? अजित पवारांचे नातेवाईक मराठी नाहीत का? इथे सर्वच मराठी आहेत. प्रश्न सत्य आणि असत्याच्या लढाईचा आहे. खरे आणि खोट्याची लढाई आहे. पाहू आता काय होते ते, असे ते म्हणाले.
क्रांती रेडकर यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे. ती मराठी मुलगी आहे. तिच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. बाळासाहेब ठाकरे जरी आज नसले तरी उद्धव ठाकरे आहेत. शिवसेना तीच आहे. बाळासाहेबांच्या विचारांची आहे.
सरकार हे ठाकरे सरकार आहे. शरद पवार आहेत. सर्व व्यवस्थित आहे. इथे कुणावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी समीर वानखेडेंबाबत बोलण्यास नकार दिला. गुन्हा महाराष्ट्रात घडलाय. त्याविषयी मी फार बोलणार नाही. कारण तो सरकारचा विषय आहे असे त्यांनी स्पष्ट केले.