नवी दिल्ली – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेवरून विरोधी कॉंग्रेस आणि इतर पक्षांनी कामकाजात व्यत्यय आणून जोरदार गदारोळ करीत या अटकेचा निषेध केला. याच गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. दरम्यान, राज्यसभेत महागाई आणि जीएसटीवर चर्चा व्हावी, ही विरोधकांची मागणी मात्र राज्यसभेत सरकारने मंजूर केली असून उद्या मंगळवारी त्या विषयावर सभागृहात चर्चा होणार आहे.
संजय राऊत यांनी ईडीने अटक केल्याने त्याच्या विरोधात आज कामकाज सुरू होताच विरोधी सदस्यांनी सरकारच्या विरोधात निदर्शने केली. त्यामुळे कामकाज तहकूब करावे लागले. दुपारी प्रश्नोत्तराच्या तासाला सभागृह सुरू झाले तेव्हाही अनेक खासदारांनी सभागृहाच्या सभापतींच्या आसनापुढील मोकळ्या जागेत जमून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्याने जोरदार गदारोळ झाला.
घोषणाबाजी सुरू असतानाच, सभागृह नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आंदोलक सदस्यांना राज्यसभेचे कामकाज आणि प्रश्नोत्तराचा तास सुरळीत चालू ठेवण्याचे आवाहन केले. राज्यसभेत उद्या दुपारी 2 नंतर महागाईवर चर्चा सुरू केली जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
मनी लॉंडरिंग प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अटकेचा संदर्भ देत गोयल म्हणाले, “आम्ही कायदा करणारे आहोत, कायदा तोडणारे नाही. जे कायदा मोडतील त्यांना कायद्याचे परिणाम भोगावे लागतील. मी त्यांना आवाहन करेन, या प्रकरणात कायद्यानुसार प्रक्रिया पूर्ण होऊ द्या. अंमलबजावणी एजन्सींच्या कामात सरकार हस्तक्षेप करू शकत नाही, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, ते त्यांचे काम करत आहेत. मी विरोधी पक्षांना आवाहन करतो की, त्यांनी सभागृह सुरळीत चालू द्यावे. सरकार ईडी व अन्य सरकारी यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांवर दडपशाही करीत आहे, असा आरोप अनेक सदस्यांनी केला.