मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्लाप्रकरणी भाजपवर सडकून टीका केली आहे. शरद पवारांच्या घरावर हल्ला करणारे एसटी कर्मचारी नाहीत तर हल्ल्यामागे अतृप्त आत्म्यांचा हात असल्याची खोचक टीका राऊत यांनी केली आहे.
शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात संजय राऊतांनी, “शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याला मी आंदोलन म्हणत नाही. यामागे काही राजकीय पुढाऱ्यांचा हात असू शकतो. महाराष्ट्रातील वातावरण बिघडवायचे आहे, असे काही असे अस्वस्थ आणि अतृप्त आत्मे महाराष्ट्रात आहेत व त्यांच्या माध्यमातून हे सर्व सुरू आहेत, असे म्हणत अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला आहे.
पुढे बोलताना त्यांनी,”सतीश उके यांना अटक केल्यानंतर या लोकांना आनंद होतो. मुंबईतील एक वकील सदावर्ते यांना पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्रास होतो. दोघेही वकील, दोघांनाही समान न्याय पाहिजे. गेले काही दिवस भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यातील लोक कोणी विधान परिषदेत आहेत, कोणी रस्त्यावर आहेत. ते महाविकास आघाडीतील माननीय पवार साहेबांवर टीका करतात आणि आम्हाला भाषा विचारतात. तर आमची भाषा अशीच असेल असा टोला राऊतांनी लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले की, “तुम्ही ज्या प्रमाणे शरद पवार यांच्यावर टीका टिप्पणी करत आहात. अशा प्रकारची भाषा वापरतात. म्हणजे तुमच्या संघाच्या शाखेमध्ये याच भाषेचे वर्ग घेतात का? साधनशुचिता असे शब्द वापरतात. ते कुठे गेले? असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. महाराष्ट्राला ही घाण साफ करावी लागेल आणि आता ती वेळ आली आहे. महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर नाही तर विरोधी पक्षातील काही लोकांचा स्तर खाली गेला आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.