मुंबई : राज्यात सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नावरून चांगलाच वाद सुरु आहे. त्याच प्रश्नवरून आता कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी काही गावांसाठी सोलापुरात हक्क सांगण्यास सुरवात केली. म्हणून तुम्ही सोलापुरात कर्नाटक भवन उभं करायचं म्हणत आहेत. मात्र सोलापुरात किंवा कोल्हापुरात त्यासाठी कर्नाटक भवन बांधणार असाल तर आम्हाला सुद्धा बेळगावात महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी जागा द्या, असा पलटवार संजय राऊत यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना केला आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधत कर्नाटक मुख्यमंत्री बोम्मई यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी, महाराष्ट्राचे प्रत्येक राज्याशी प्रेमाचे संबंध असून कर्नाटकाशी सुद्धा आहेत. ज्याप्रमाणे मुख्यमंत्री काल परवा नवस फेडायला गेले होते. गुवाहाटीवरून येताना आसाममध्ये आसाम भवन उभ करण्याच ठरवलं. तर दुसरीकडे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर, कोल्हापूरमध्ये कर्नाटक भवन उभं करणार असल्याचे सांगितले. मुंबईमध्ये सुद्धा अनेक भवन आहेत. कानडी बांधवांचे अनेक हॉल्स, भवन आहेत. पण जर तुम्ही सीमा वादाच्या लढ्यात काही गावांवरती हक्क सांगताय म्हणून सोलापुरात किंवा कोल्हापुरात त्यासाठी कर्नाटक भवन बांधणार असाल तर आम्हाला सुद्धा बेळगावात महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी जागा द्या. बेळगाव आणि बेंगलोरला महाराष्ट्र भवन बांधण्याची आमची इच्छा असून या ठिकाणी दोन भवन बांधण्यात येईल, त्या संदर्भात निर्णय व्हावा, मग आम्ही तुमचा विचार करू असे म्हणत संजय राऊत कर्नाटक मुख्यमंत्री बोम्मई यांना फटकारले.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, मला जर कोणी गद्दार शिव्या देत असतील तर तो माझा मी सन्मान समजतो. खर म्हणजे त्यांना जर उत्तम शिव्या देता येत असतील तर त्यांनी सगळ्यात आधी छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे राज्यपाल, प्रवक्ते, मंत्री यांना द्याव्यात. आम्ही त्या शिव्या देणाऱ्यांवरती फुले उधळू, आम्ही त्यांना संधी देतोय, छत्रपती शिवरायांचा अपमान तुम्ही सहन करताय, सावित्रीबाई फुले यांचा अपमान सहन करताय, द्या ना त्यांना शिव्या, तुम्हाला जर इतक्या उत्तम शिव्या देता येत असतील, त्यांना शिव्या द्या, महाराष्ट्र तुमच्या शिव्यांच कौतुक करेल अशा भाषेत संजय राऊत यांनी भाजपसह शिंदे गटातील नेत्यांना सुनावले.
गेल्या काही दिवसांपासून शिवरायांचा अपमान करण्याची महाराष्ट्रात लाट आली आहे. छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे, भाजपकडून सर्रास शिवरायांचा अपमान करण्याचे सत्र सुरु आहे. भाजप हे शिवप्रेमाचे ढोंग करत आहे. मोदी यांना रावण म्हटल्यावर तुमची अस्मिता जागी होत आहे. मग महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान केल्यावर तुमची अस्मिता थंड का पडते, तिथे तुमचा नाग फणा काढत नाही. काही चुकीचं असेल तर मला सांगा? असा उलटप्रश्न देखील राऊतांनी केला. दरम्यान, आता संजय राऊत यांच्या या मागणीवर कर्नाटकातून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे गरजेचे आहे.