Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर बोलताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे. आज सकाळी माध्यमांशी बोलताना,”महाराष्ट्रावर तीन घाशीराम कोतवालांचं राज्य आहे. पेशवे काळात घाशीराम कोतवालावर पुण्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी होती. मात्र तो लूटमार करायचा, अनागोंदी माजवली होती. तशाच प्रकारे सध्याच्या घडीला राज्यकारभार सुरु आहे असं म्हणत संजय राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना महायुती सरकारवर सडकून टीका केली. यावेळी बोलताना, “पुण्यात पेशवेकाळात घाशीराम कोतवाल होता. सरकार तीन घाशीराम कोतवाल सरकार चालवत आहेत. त्यांना कुठली नैतिकता आहे? दुसऱ्यांवर हे बोट उचलत आहेत. महाराष्ट्रात तीन घाशीराम कोतवाल राज्य करत आहेत. घाशीराम कोतवालाचा कार्यकाळ बघा, त्याच्या काळात लूटमार, दरोडेखोरी, कायदा सुव्यस्थेच्या बाबतीत अनागोंदी होती. घाशीराम कोतवालावर पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी होती. त्याने ज्या पद्धतीने लूटमार सुरु करुन आपल्या बॉसेसना पैसे आणि सगळंच पोहचवत होता. घाशीराम कोतवाल हे नाटक फार गाजलं महाराष्ट्रात. घाशीराम कोतवाल ही विकृती होती. आज या राज्यावर घाशीराम कोतवालांचं राज्य आहे.” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
त्यासोबतच संजय राऊत यांनी भाजपाचाही समाचार घेतला. याविषयी बोलताना,”भाजपा हा नैतिकतेचे फुगे छाती फुटेपर्यंत फुगवतो. यांच्याकडे नैतिकता औषधाला तरी शिल्लक आहे का? भाजपाच्या नैतिकतेचं ऑडिट झालं पाहिजे. नवाब मलिक प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिण्याचं जे काही नाटक केलं आहे ते प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी का नाही? दोघांचे अपराध सारखे आहेत. प्रफुल्ल पटेल हे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात. इकडे नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही म्हणतात. आज शिंदे गटाचा पोपट बोलला की नवाब मलिकच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही. हे सगळे बोलणारे नवाब मलिकांचे बाप आहेत. गद्दारांच्या मागे ईडी लागली होती म्हणून अटकेच्या भीती तिकडे गेले असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
पुढे बोलताना संजय राऊत यांनी काही सवाल उपस्थित केले. त्यांनी,”ड्रग्ज रॅकेटमध्ये दोन मंत्री सहभागी आहेत. सरकारने त्यांच्यावर कारवाई केली का? आमच्या पक्षाचे जे लोक घेतले आहेत, राष्ट्रवादीचे जे लोक घेतलेत त्यांच्यावर आरोप आहेत.प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादीचे खासदार आहेत ते मंत्री असताना भाजपाने मुद्दा उपस्थित केला होता की इक्बाल मिर्चीशी संबंध असलेले मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात कसे? आता प्रफुल्ल पटेल कुठे आहेत? नवाब मलिक चालत नाहीत म्हणत आहात. मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर असं नाटक सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या सफाईचा आढावा घेण्यापेक्षा आपल्या मंत्रिमंडळातल्या भ्रष्ट मंत्र्यांची सफाई केली पाहिजे असेही त्यांनी यावेळी म्हटले.