मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर विरोधी पक्षातील अनेक नेते संतप्त झाले होते. भाजपने हा वाद मिटवण्यासाठी केंद्रात हालचाली देखील सुरु केल्याचे बोलले जात होते. हा वाद शांत होतो न होतो तोच भाजपच्या प्रसाद लाड यांनी महाराजांबाबत केलेल्या एका विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू लागलं आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला’ असं अजब विधान लाड यांनी केलं. आता यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लाड यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे.
“कोण प्रसाद लाड ? ते काय दत्तो वामन पोतदार आहेत का ? भाजप मधला कोणी उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर भाष्य करतो. या भारतीय जनता पक्षाचं डोकं फिरलय” असा घणाघात संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला. छत्रपती शिवाजी महाराजांची शक्तीच यांना खतम करेल. महाराजांची भवानी तलवारचं यांच्या पक्षाचं मुंडक छाटणार आहे. रोज कोणीतरी उठतो आणि महाराजांवर भाष्य करतो. मला असं वाटायला लागलंय रोज यांच्या स्वप्नात अफझल खान,औरंगजेब येतो आणि यांच्या कानात काहीतरी मंत्र देतो त्यानुसार हे बोलतात अशी टीका राऊत यांनी यावेळी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बोलण्याची यांची लायकी आहे का ? रायगडावर महाराजांची समाधी आहे,पुण्यात त्यांचा जन्म झाला तुम्ही नवीन नवीन शोध लावताय. भारतीय जनता पक्षाने इतिहास संशोधन मंडळाची नव्याने स्थापना केली आहे का ? असा सवाल देखील राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.
प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले.. पहा Video