मुंबई – अभिनेता सनी देओल आणि अमीषा पटेलचा ‘गदर 2’ हा चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे. मात्र सध्या अमीषा एका वेगळया कारणामुळे चर्चेत आली आहे. 2001 साली प्रदर्शित झालेल्या गदर चित्रपटाला देखील मोठा प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटामुळे अमिषाला मोठी लोकप्रियता मिळाली. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी पत्र लिहिले होते. त्याबाबत एका मुलाखती अमिषाने खुलासा केला आहे.
या मुलाखतीत ती म्हणाली की, “गदर पाहिल्यानंतर संजय लीला भन्साळी यांनी मला खूप सुंदर पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं होतं. त्यानंतर मी जेव्हा त्यांना भेटले, तेव्हा ते मला म्हणाले, ‘अमीषा, तू आता निवृत्त झाली पाहिजे.’ ते असं का बोलले असा मला प्रश्न पडला होता. यावर ते म्हणाले, तू या दोन चित्रपटांमधूनच एवढं यश मिळवले आहे जे काही कलाकार त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये मिळवत नाहीत, असं ते मला म्हणाले. आयुष्यात एकदाच मुघल-ए-आझम, मदर इंडिया, पाकिझा, शोले यांसारखे चित्रपट बनवले जातात. तुझ्या आयुष्यातला दुसराच चित्रपट इतका हिट ठरला आहे. आता पुढे काय करशील?, असा सवाल त्यांनी मला केला.”
दरम्यान, हृतिक रोशनसोबतच्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाने अमिषा पटेलला मोठे नाव आणि प्रसिद्धी मिळवली. या चित्रपटातील निरागसता पाहून चाहते अमिषाच्या प्रेमात पडले. हा चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर अमिषा पटेल भुलभुलैय्या, हमराज, थोडा प्यार थोडा मॅजिक यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली. पण सध्या तिचा ‘गदर 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.