नांदेड : नांदेडचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी नांदेडमधीलच सहा जणांना अटक केली आहे. बियाणी यांची हत्या खंडणी आणि दहशत निर्माण करण्यासाठीच करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यात रिंदा गॅंगचा सहभाग असल्याचेही पुढे आले आहे. या हत्येच्या तपासासाठी पोलिसांनी महाराष्ट्रासह इतर सहा राज्यात जाऊन तपास केल्याचे सांगण्यात येत आहे.
नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नांदेडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची 5 एप्रिल रोजी हत्या करण्यात आली. संजय बियाणी यांच्या शारदा नगर येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या मागावर असलेल्या दोन आरोपींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. मोटारसायकलवर आलेल्या या दोन मारेकऱ्यांनी बियाणी यांच्या अगदी जवळ येऊन गोळ्या झाडून ही हत्या केली होती. दरम्यान, 55 दिवसांच्या कसून तपासानंतर पोलिसांनी या हत्येच्या छडा लावला आहे.
बियाणी हे बाहेरून साडे अकरा वाजताच्या सुमारास घरी आले, तेव्हा आरोपींनी अगदी त्यांच्या कार जवळ येऊन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. गोळीबार आणि हत्येची ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे.
या हत्येच्या तपासासाठी महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, तेलंगणा व कर्नाटक या राज्यात जावून तपास करण्यात आला आहे. तपासादरम्यान आतापर्यंत सहा आरोपी निष्पन्न करुन अटक करण्यात आली आहे. यानंतरही तपासात आणखी आरोपी अटक होण्याची शक्यता आहे.