करोनाच्या धर्तीवर मेडिकल व्यावसायिकांकडून नागरिकांची लूट
कराड – करोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर कराड तालुका आरोग्य विभाग व स्व. सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालय, यांच्यावतीने युद्धपातळीवर जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. आरोग्य विभाग सज्ज झाला असलातरी शहरातील मेडिकल व्यावसायिकांकडून मात्र, नागरिकांची अक्षरश: लूट सुरू आहे. करोनापासून बचाव करण्यासाठी साबण, सॅनिटायझर व मास्क यांचा वापर करणे आवश्यक आहे. मात्र, येथील बसस्थानक परिसरातील काही मेडिकल व्यावसायिकांनी त्याच्या किंमतीत वाढ करून लुटालूट चालवली आहे. सॅनिटायझर 250 रूपये तर मास्कची किंमत 300 वर गेली आहे. यावर आरोग्य विभाग अंकुश ठेवणार का? अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.
कराड तालुका आरोग्य विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार तालुक्यात शीघ्रपथकाची स्थापना केली आहे. त्यामध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, आरोग्यसेविका, आशा, अंगणवाडी सेविका, मंडलाधिकारी, आरोग्य सहाय्यक, विस्ताराधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्याद्वारे सकाळी 8 ते 2 यावेळेत गावोगावी जाऊन करोना आजाराची लक्षणे, घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली जाणार आहे. तसेच हात स्वच्छ धुण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे. तालुक्यातील विलगीकरण कक्ष कृष्णा हॉस्पिटलमध्ये स्थापन करण्यात आला आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार करोना व्हायरसच्या जंतूंचा प्रादूर्भाव प्राधान्याने चौदा दिवस होतो. याकाळात निकडीची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच 28 ते 30 दिवसात एक प्रकारे सायकल ब्रेक करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. तसेच आरोग्य विभागाकडून देण्यात येत असलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, या आजारापासून बचाव करण्यासाठी गर्दीचे ठिकाणे टाळणे व स्वच्छता ठेवणे आवश्यक असल्याने अनेकजण सॅनिटायझर व मास्क खरेदी करताना दिसत आहे. वाढत्या मागणीनुसार मेडिकल व्यावसायिकांनी त्यालाही व्यवसायाचे स्वरूप आणले आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीपेक्षा स्वत:चे घर भरण्याचा प्रयत्न केला जात आहे. इतरवेळी 40 रूपयांना मिळणारे सॅनिटायझर सध्या 250 रूपये तर मास्कच्या किंमती 300 ते 350 रूपयांवर पोहोचल्या आहेत. बाटलीवरील मूळ किंमत खोडून त्यावर मनाला वाटेल तशा किंमती टाकून एकप्रकारे नागरिकांची लूट केली जात आहे. संपूर्ण जगात हाहाकार माजविणाऱ्या करोनाची भिती मनात बसल्याने नागरिकही त्याला बळी पडत दिसत आहे. नागरिकांनीही आरोग्याबरोबरच आपली होत असलेल्या लुटीबाबत जागरूक होणे गरजेचे आहे.
स्वच्छता ही महागड्या वस्तू खरेदी करून होत नाही. तर घरोघरी माहिती देण्यात येत असलेल्या सहा स्टेपनुसार आपले हात स्वच्छ करणे आवश्यक आहे. ते आपण दररोज घरी वापरत असलेल्या साबणानेही करू शकतो. मास्कचा उपयोग फक्त संशयित रूग्णांसाठी आहे. प्रत्येकाने ते खरेदी करू नयेत. आपल्या हातरूमालाचाही उपयोग करू शकतो. मेडिकल व्यावसायिकांकडून होत असलेल्या फसवणुकीस बळी न पडता आपल्या आरोग्याच्या काळजीकडे लक्ष द्यावे.
डॉ. संगीता देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी