सांगली (प्रतिनिधी) – उत्तर भारतीयांना त्यांच्या गावी परत पाठवण्यासाठी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे श्रमिक विशेष रेल्वे रविवारी रात्री मिरज रेल्वे स्थानकातून रवाना झाली. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते रात्री ८ वाजता परप्रांतीय मजुरांना तिकीट आणि जेवण देऊन गोरखपूरला रवाना करण्यात आले. २४ बोगीच्या विशेष रेल्वेतून प्रत्येक बोगीत ५२ याप्रमाणे ११८४ प्रवाशांची व्यवस्था करण्यांत आली होती.
दुपारपासून परप्रांतीय प्रवाशांना बसमधून रेल्वे स्थानकाकडे आणण्यात आले. एका बसमध्ये २५ प्रवासी याप्रमाणे दोन बसेसला एका नोडल अधिकार्याची नियुक्ती करण्यांत आली होती. १६ नोडल अधिकार्यांनी नोंदणीकृत ११५० प्रवाशांना ३२ बसेसमधून रेल्वे स्थानकात आणले. स्थानिक पोलिसांचा रेल्वे स्थानकाबाहेर बंदोबस्त होता. महसूल अधिकार्यांनी रेल्वे स्थानकात प्रवेशापूर्वी प्रवाशांच्या ओळखपत्राची तपासणी केली.
प्लॅटफॉर्मवर पोलिस बंदोबस्तात रेल्वे बोगीत सर्वाना प्रवेश देण्यात आला. जे कामगार जाणार आहेत. त्याशिवाय कोणीही रेल्वेत घुसणार नाहीत याची खबरदारी रेल्वे पोलिस व सुरक्षा दलाने घेतली होती. बोगीत प्रवाशांना रेल्वे तिकीटासोबत दोन पाण्याच्या बाटल्या व जेवण देण्यात आले. सर्वाना ३० तासांच्या प्रवासासाठी गुळपोळी, थालपीठ देण्यात आले.
रेल्वे टिकीट निरीक्षकांनी प्रत्येक बोगीत प्रवाशांची खात्री केली. यावेळी पोलिस उपअधीक्षक संदीपसिंग गिल, रेल्वे सुरक्षा बल पोलीस निरीक्षक, स्टेशन प्रबंधक पनीर सेल्वम, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार रणजित देसाई , रेल्वे मेडिकल ऑफीसर सतीश मंडला यांच्यासह पोलीस व रेल्वे अधिकारी उपस्थित होते.
आँनलाईन नोंदणी केलेल्या प्रवाशांना स्वीकारण्याची तयारी उत्तर प्रदेश सरकारने या कामगारांना दर्शविल्याने गोरखपूरसाठी दोन विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. मिरजेतून रविवारी पहिली रेल्वे रवाना झाली असून मंगळवारी दुसरी रेल्वे पाठविण्याची तयारी सुरु आहे. मिरजेतून थेट गोरखपूरपर्यत जाणारी रेल्वे वाटेत कोठेही थांबणार नाही किंवा कोणत्याही प्रवाशाला वाटेत उतरू देण्यात येणार नाही. उत्तर प्रदेशातील अन्य जिल्हयातील प्रवाशांना गोरखपूरातून स्थानिक प्रशासन अन्यत्र पाठविण्याची व्यवस्था करणार आहे.
जिल्ह्यात हजारो परप्रांतीय मजूर गावाकडे जाण्याच्या प्रतीक्षेत असून यापैकी उत्तर भारतीयांची संख्या मोठी असल्याने गोरखपूरपर्यत मिरजेतून विशेष रेल्वेचे प्रशासनातर्फे नियोजन करण्यांत आले. तिकीटखर्चाच्या रकमेसाठी गेले आठवडाभर रेल्वेचे नियोजन रखडले होते. या विशेष रेल्वेचे प्रत्येकी साडेनऊ लाख रुपये प्रवासखर्चाची व्यवस्था कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केल्याने गरीब मजुरांना दिलासा मिळाला .