मुंबई: परदेशात अडकून राहिलेल्या आणि मायदेशी परत आणलेल्या 572 भारतीयांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहाटेच्या सुमारास या सर्व भारतीयांना घेऊन आलेली विमाने उतरली, असे राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रवाशांपैकी मुंबईतील प्रवाशांना अनिवार्यपणे संस्थागत विलगीकरणासाठी विमानतळाजवळील हॉटेलमध्येच ठेवण्यात आले आहे. तर अन्य शहरांमधील प्रवाशांना त्यांच्या निवडीच्या हॉटेलांमध्ये नेण्यात आले आणि तेथे त्यांना विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
लंडन आणि सिंगापूर येथे अडकून राहिलेल्या भारतीयांना घेऊन दोन विमाने आज सकाळी मुंबई विमानतळावर उतरली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या 572 प्रवाशांची प्रथम वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मनिला येथून 241 प्रवाशांना घेऊन आणखी एक विमान आज (रविवारी) रात्री मुंबईत येणे अपेक्षित आहे.
आज दिवसभरात परदेशातून मायदेशी परत येणाऱ्या बहुतेक प्रवाशांमध्ये महाराष्ट्रातील पुणे, धुळे, कोल्हापूर आणि अन्य शहरांमधील नागरिकांचा समावेश आहे. मुंबई वगळता अन्य शहरातील नागरिकांना राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेल्या वाहनांद्वारे संबंधित शहरांकडे पाठवून दिले गेले आहे. तेथे स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार आणि चिकित्सा करणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.