नवी दिल्ली : रामचरितमानसवरून उत्तर प्रदेशात वाद निर्माण झाला आहे. समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार स्वामीप्रसाद मौर्य यांनी रामचरित मानसच्या काही ओळींवर आक्षेप घेतला होता. त्यांनी रामचरितमानस बकवास आहे असेही म्हटले होते. तुलसीदासांनी ते आपल्या आनंदासाठी लिहिले आहे असाही दावा त्यांनी केला होता. एवढंच नाही तर रामचरितमानस मध्ये ज्या काही आक्षेपार्ह ओळी आहेत त्या ओळी सरकारने हटवल्या पाहिजेत. तसं करणं शक्य नसेल तर थेट रामचरितमानसवर बंदी घालावी अशीही मागणी त्यांनी केली होती. त्यावरून वाद झाला होता. आता त्यांची मुलगी आणि भाजपा खासदार संघमित्रा मौर्य यांनी या विषयावर वाद होण्यापेक्षा सविस्तर चर्चा झाली पाहिजे असे म्हटले आहे.
स्वामीप्रसाद मौर्य यांच्या वक्तव्यावर त्यांच्याच पक्षाकडून मौन बाळगले आहे. मात्र स्वामीप्रसाद मौर्य यांची मुलगी आणि भाजपा खासदार संघमित्रा यांनी यासर्व वादावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. याविषयी बोलताना त्यांनी,”या ओळींवर चर्चा झाली पाहिजे तसंच या ओळी का लिहिल्या गेल्या असतील यांचे सखोल विश्लेषण झाले पाहिजे. काही लोक अनावश्यक मुद्दे उपस्थित करत आहेत. यापेक्षा महत्त्वाचे प्रश्न राज्यात आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, स्वामी प्रसाद मौर्य यांनी, “धर्म कुठलाही असो आम्ही त्या धर्माचा सन्मानच करतो. मात्र धर्माच्या नावावर विशिष्ट जात आणि विशिष्ट धर्माच्या लोकांना अपमानित करण्यात आलं आहे. आमचा आक्षेप हा याच गोष्टीवर आहे. रामचरितमानसमध्ये एक चौपाई लिहिली आहे, त्यामध्ये तुलसीदास म्हणतात की शूद्र हे अधम जातीचे आहेत. यापुढे तुलसीदास म्हणतात की ब्राह्मण दुराचारी, निरक्षर असला तरीही तो ब्राह्मण आहे आणि त्यामुळे तो पूजनीय आहे. मात्र शूद्र हा किती ज्ञानी, विद्वान असला तरीही त्याचा सन्मान करू नका. जर असं त्यांचं म्हणणं असेल तर मी अशा धर्माला नमस्कार करतो आणि ही आशा बाळगतो की या धर्माचा सत्यानाश होईल कारण हा धर्म आमचा सत्यानाश करू पाहतो आहे,” असेही मौर्य यांनी म्हटले होते.
दरम्यान, समाजवादी पक्षाने रामप्रसाद मौर्य यांच्या या वक्तव्यावर सोयीस्कर मौन बाळगले आहे. कारण पक्षाला असं वाटतं आहे की या वक्तव्याच्या दोन बाजू आहेत. त्यातली एक बाजू ही धार्मिक आहे तर दुसरी बाजू ही सामाजिक आहे. समाजवादी पक्षातंर्गत दोन्ही बाजूंचा विचार होतो आहे. पक्षाला एकीकडे असं वाटतं आहे की अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे पक्षाचं नुकसान होऊ शकतं. तर दुसरीकडे असं वाटतं आहे की जे काही लिहिलं गेलं आहे त्यावर वाद आणि चर्चा होत असेल तर होऊ द्यावी या निमित्ताने दलित वर्ग चर्चा करण्यासाठी पुढे येत असेल त्यात गैर काहीही नाही, अशी स्पष्ट भूमिका पक्षाकडून घेण्यात आली आहे.