नवी दिल्ली – भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अयोध्येतील मुर्ती प्रतिष्ठापनेच्या धार्मिक कार्यक्रमाला राजकीय स्वरूप दिल्याने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे कॉंग्रेस नेत्यांसाठी अवघड बनले आहे असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण कॉंग्रेस नेत्यांनी नाकारले आहे. त्या संबंधात सध्या भारत जोडो न्याय यात्रेवर असलेले राहुल गांधी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देतना त्यांनी हे प्रतिपादन केले.
ते म्हणाले की राम मंदिराचा अभिषेक सोहळा हा पंतप्रधानांभोवती केंद्रित असलेला राजकीय कार्यक्रम आहे. भाजप आणि आरएसएस याला निवडणुक तयारीचा रंग देत आहेत आणि म्हणूनच आम्हाला उपस्थित राहणे कठीण आहे,असे ते म्हणाले. भाजप आणि आरएसएसने या सोहळ्यावर कब्जा केला असून त्यांनी याचे निवडणुकीच्या कार्यक्रमात रूपांतर केले आहे, त्यामुळे तिकडे जाण्यात आम्हाला अडचण आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या संबंधात बोलताना ते म्हणाले की ही निवडणूक इंडिया आघाडी जिंकणार असून त्यात भाजपचा सफाया होणार आहे. इंडिया आघाडीची जागा वाटपाची चर्चा सुरळीत आणि सकारात्मक वातावरणात सुरू आहे असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
राहुल गांधींची यात्रा १४ जानेवारी रोजी मणिपूरमधील थौबल येथून सुरू झाल्यानंतर सोमवारी संध्याकाळी ही यात्रा नागालँडमध्ये पोहोचली आहे.