केतकावळे -पुरंदर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. त्यामुळे ऐतिहासिक कऱ्हा नदी खळळली असून त्यावरील संगमेश्वर बंधारा “ओव्हर फ्लो’ झाला आहे. त्यामुळे रखडलेल्या भात लावणीला वेग आला आहे. तसेच परिसरांतील बंधारेही पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत.
पुरंदर तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर चांगला असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. तसेच या भागातील भात खाचरेही भरली असल्याने बळीराजा आनंदीत आहे. पश्चिम भागातील भिवडी, नारायणपूर, चिव्हेवाडी, हिवरे, चांबळी, गराडे, या भागात पाऊस चांगला झाल्याने कऱ्हा नदीतून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे.
पर्यायाने चांबळी येथील चरणावती नदी आणि पुढे सिद्धेश्वर बंधारा भरून सासवडच्या संगमेश्वर मंदिरासमोरील संगमेश्वर बंधारा पाण्याने भरून वाहत आहे.