मुंबई – शिवसेनेच्या सामना मुखपत्रातून रोज केंद्र सरकारसह राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. नुकतच आसामकडून भीमाशंकर जोतिर्लिंगावर दावा करण्यात आला होता. त्यावरून सामानातून सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका करण्यात आली होती. यावरूनच आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये देशपांडे यांनी सामनात येणाऱ्या सरकारी जाहिरातींबाबत भाष्य केले आहे.
“सरकारी जाहिरातीच्या पैशांवर चालणाऱ्या सामनामधून पगार घेणाऱ्यांची आमच्याबद्दल बोलायची लायकी नाही जाहिराती बंद तर पगार पण बंद “चड्डीत राहायचं ” अशा आशयाचे ट्विट देशपांडे यांनी केला आहे. तसेच यावेळी सामनात आलेल्या फ्रंट पेजचा फोटो देखील देशपांडे यांनी पोस्ट केला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदी दिसत येत आहेत.
सरकारी जाहिरातीच्या पैशांवर चालणाऱ्या सामनामधून पगार घेणाऱ्यांची आमच्याबद्दल बोलायची लायकी नाही जाहिराती बंद तर पगार पण बंद “चड्डीत राहायचं ” pic.twitter.com/OlbI43NpPf
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 16, 2023
काय म्हटलंय आजच्या सामना अग्रलेखात
“माझे ते माझे आणि तुझे तेदेखील माझेच, असा उफराटा कारभार सध्या केंद्र आणि इतर भाजपशासित राज्यांकडून महाराष्ट्राबाबत सुरू आहे. लाचार मिंधे सरकारमुळे तो महाराष्ट्राच्या मुळावर तर उठला आहेच, पण महाराष्ट्र धर्माच्या अस्तित्वालाही धडका देऊ लागला आहे. देव, देश आणि धर्मासाठी प्राण हाती घेणारा महाराष्ट्र हतबल करण्याचे मोठे षड्यंत्र रचले गेले आहे. केंद्र आणि भाजपशासित राज्यांकडून महाराष्ट्राचे उद्योग, अर्थकारण, पाणी आणि बरेच काही पळविण्याचे प्रकार या कटकारस्थानाचाच भाग आहेत. आता तर त्यांनी आमचे देवही पळविले! आमच्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावरच आसामच्या भाजप सरकारने मालकी हक्क सांगितला. लाचार मिंधे सरकारकडून याविरोधात काहीच होणार नाही. राज्यातील जनतेला शिवशंभोंचा शंख फुंकावाच लागेल” अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.