नवी दिल्ली – संयुक्त किसान मोर्चाने 26 ऑक्टोबरला देशव्यापी निदर्शनांची हाक दिली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची हकालपट्टी आणि अटकेच्या मागणीसाठी ती निदर्शने होणार आहेत.
केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाला 26 ऑक्टोबरला 11 महिने पूर्ण होणार आहेत. त्याचे औचित्य साधून आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने देशव्यापी निदर्शनांची तयारी केली आहे.
निदर्शनांच्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत धरणे धरले जातील. त्याशिवाय, मोर्चेही काढले जातील. कृषी कायदे मागे घेण्याची आमची मागणी कायम आहे. त्याबरोबरच मिश्रा यांना हटवण्याची आणि त्यांच्या अटकेची मागणी आम्ही आणखी तीव्र करणार आहोत, असे संयुक्त किसान मोर्चाने एका निवेदनाद्वारे जाहीर केले.
उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खेरीत काही दिवसांपूर्वी एका वाहनाने चिरडल्याने चार शेतकरी मृत्युमुखी पडले. ते वाहन मिश्रापुत्र आशिषचे असल्याचे समोर आले. त्या प्रकरणी आशिषला याआधीच अटक करण्यात आली. आता केंद्रीय मंत्री मिश्रा यांच्या अटकेची मागणीही शेतकरी संघटनांनी लावून धरली आहे.