पुणे – स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. किल्ले शिवनेरीवर मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने अनेकांना गडावरच थांबवण्यात आल्याने संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी गडकिल्ले संवर्धनाच्या मुद्द्यावरूनही सरकारला खडे बोल सुनावले आहेत. शिवजयंती सोहळयानिमित्त संभाजीराजे छत्रपती किल्ले शिवनेरी पायी सर करून शिवजन्मस्थळावर पोहोचले.
यावेळी शिवनेरी किल्ल्यावर आलेल्या शिवभक्तांना छत्रपतींच्या जन्मस्थळाचे दर्शन घेण्यास मनाई करण्यात आली. ही गोष्ट शिवभक्तांनी संभाजीराजेंच्या कानावर घातली. तेव्हा संभाजीराजे छत्रपती यांनी तेथेच थांबून या सर्व शिवभक्तांना जन्मस्थळाचे दर्शन दिले जावे, अशी मागणी केली. सर्व सामान्य शिवभक्तांना जन्मस्थळाचे दर्शन घेतल्याशिवाय मीदेखील इथून पुढे जाणार नाही, अशी भूमिका संभाजीराजे यांनी घेतली. त्यामुळे प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.’
यावेळी माध्यमांशी बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले,’किल्ले शिवनेरीवर होणारा महोत्सव हा शासकीय महोत्सव आहे. तरी लोकांना मोठ्या प्रमाणात गडावर सोडण्यात आलं आहे. आज मीसुद्धा पायी चालत गडावर पोहोचलो. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हेलिकॉप्टरने गडावर पोहोचले. मध्यरात्रीपासून लोक गडावर चालत येत आहेत. त्यामुळे मी लोकांबरोबर जाऊन दर्शन घेणार असेही त्यांनी सांगितले.