वाहने आणि औद्योगिक प्रदूषणामुळे निसर्गाची हानी होत चालली आहे आणि त्यामुळे शुद्ध हवा मिळणे कठीण झाले आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरी व्यवस्थेवर ताण आल्याचे पाहण्यास मिळत आहे. शहरातल्या या धकाधकीने एकमेकांशी थांबलेला संवाद, शिणलेला जीव आणि मरगळलेली मने ताजीतवाणी करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला निर्भेळ, निर्मळ निसर्गाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी पुण्यापासून एक तासाच्या अंतरावर असलेले बहुली येथील सह्याद्री ऍग्री टुरिझम हे ठिकाण निसर्गप्रेमींच्या पसंतीस उतरत आहे.
महाराष्ट्र स्टेट ग्रीन अँड रुरल टुरिझम को ऑप. फेडरेशन ली.(मार्ट) चे अध्यक्ष बाळासाहेब बराटे हे या कृषी पर्यटन केंद्राचे मालक आहेत. त्यांनी सांगितले की, सह्याद्री ग्रीन टुरिझम हे वीस एकरात सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले आहे. येथे घनदाट छाया देणारे वृक्ष, वेली, असंख्य प्रजातीच्या वनस्पती, विविध वन्य प्राणी, पक्षी, रंगीबेरंगी फुले, फुलपाखरे तुम्हाला वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. येथील प्रत्येक सकाळ मोकळी शुद्ध हवा, वातावरण प्रदूषणमुक्त सागाच्या जंगलाचा फेरफटका आनंददायी ठरतो.
भात, गहू या पिकांची प्रत्यक्ष शेती करण्याचा आनंद येथे घेता येतो तसेच शेतीला लागणारे गांडूळ खत, कंपोस्ट खत कसे तयार करतात हे पाहता येते. केशर, हापूस आंब्याच्या बागांमधून फिरताना मन तृप्त होते. येथील वनभोजनाचा आस्वाद कायम स्मरणात राहणारा आहे. पावसाळ्याच्या दिवसात भुरभुरणारा पाऊस, नजर जाईल तिथे हिरवेगार झालेल्या वातावरणात सह्याद्री फिरण्याची मजा काही औरच आहे.
येथे मुलांसाठी विटी-दांडू, सुरपारंब्या, लपंडाव, झोके, गोट्या, लगोरी आदी खेळ खेळण्याबरोबरच बैलगाडा सफर खार, कोंबड्या, गाई, म्हशींच्या पाळीव प्राण्यांचा स्पर्श, पक्षी निरीक्षण याठिकाणी करता येते. ज्येष्ठ नागरिक, कार्पोरेट पिकनिक, स्वागत समारंभ, वाढदिवस, पिकनिक पार्टी, किटी पार्टी, शैक्षणिक सहल यासाठी पुण्यातील मंडळी सह्याद्री ग्रीन टुरिझमची निवड करत आहेत. त्यामुळे निसर्गसमृद्ध सह्याद्री ऍग्रो टुरिझम सर्वांच्या मनात घर करत आहे.