सोनईतकार्यकर्त्यांचा ‘संवाद’ मेळावा संपन्न
नेवासा – राज्याच्या सत्तांतरच्या राजकीय दुर्घटनेमुळे मंत्रीपद गेल्याचे अजिबात दुःख नाही, मात्र दुःख आहे ते मंजूर केलेली कोट्यवधींची विकासकामे ठप्प झाल्याचे. मंत्री झाल्यावर दोन वर्षे कोरोनात महामारीत गेले. मात्र त्यानंतर मिळालेल्या काळात तालुक्यासाठी विकासकामांसाठी कोट्यवधींचा योजना व निधी मिळाळविला. आणखी अडीच वर्षे मिळाली असतेतर तालुक्यातील सर्व विकासकामे मार्गी लावता आली असती अशी खंत माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी व्यक्त केली.
सोनई (ता. नेवासा) येथे “मला आपल्याशी बोलायचं’ या कार्येकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात माजी मंत्री गडाख बोलत होते. मेळाव्यास ज्येष्ठ साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख प्रमुख उपस्थित होते. माजी मंत्री गडाख म्हणाले, “माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व तुम्हा जनतेच्या आशीर्वादाने नेवासे तालुक्यात झालेली विकासकामांमुळे आत्मिक समाधान मिळाले. मंत्रिपदाच्या माध्यमातून तालुक्याला दीडशे कोटी रूपयांचे रस्ते मंजूर केले. त्याचबरोबर तालुक्यातील रस्ते, पाणी, आरोग्य यासाठीही मोठा निधी आणला असून शेकडो अतिक्रमितांचे पुनर्वसन करून शेकडो कुटूंबाचे व तरुणांच्या रोजोरोटीचा प्रश्न मंत्री पदाच्या माध्यमातून सोडविला.
ज्येष्ठ नेते गडाख म्हणाले, सत्ता असताना कार्यकर्ते बरोबर असतात परंतु आज मंत्रीपद जावूनही मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात हीच संघटनेची ताकद आहे.सत्ता बदलाच्या धर्तीवर अनेकांनी भूमिका बदलल्या परंतु शंकरराव यांनी दिलेला शब्द पाळून उद्धव ठाकरे यांचे बरोबर राहत शब्द काय असतो हे दाखवून दिले.तालुक्यातील पहिल्यांदा मिळालेले कॅबिनेट मंत्री पद अडीच वर्ष तालुक्यातील विविध योजना विकास कामे पूर्ण करण्यासाठी वापरले.राजकीय जीवनात अनेक संकटे आली परंतु नेवासा तालुक्यात शंकरराव यांना जो राजकीय हेतूने त्रास देण्यात आला तो निषेधार्थ असा आहे.
भविष्यात येणाऱ्या जीप,प स निवडणुका ,नगर पंचायत निवडणुका मोठ्या ताकदीने तुमच्या सर्वांच्या बळावर जिंकू यापुढील काळातही शंकरराव यांना साथ द्या. यावेळी सुहास गोंटे, जानकीराम डौले, भाजपचे नेते प्रकाश शेटे, शिवसेना तालुका प्रमुख मॅचिंद्र म्हस्के, वंचित’चे नेते संजय सुखधान, भाजप पंचायत समितीचे सदस्य अजित मुरकुटे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक अॅड काकासाहेब गायके यांनी केले. कार्यक्रमास तालुक्यातील सुमारे पंधराहजार कार्येकर्ते उपस्थित होते.
गडाख यांचे आभार..!
पहिल्याच वर्षी 100 कोटींचे रस्ते, नंतर 90 कोटींचे रस्ते, 310 कोटीच्या पाणी योजना, 1000 कुटुंबांना पोट खराबा दुरुस्ती, आरोग्यसाठी निधी, 103 कोटींच्या उपसा जलसिंचन निधी, कुकाणा, नेवासा येथे सुमारे 312 गाले, मुळा उजवा कालवा दुरुस्तीसाठी 60 कोटी अशा अनेक कामासाठी भरघोस निधी आणला याबद्दल अनेकांनी जाहीरपणे शंकरराव गडाख यांचे आभार मानले
मुरकुटे धोकादायक व्यक्ती – प्रकाश शेटे
माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणारे स्वार्थी व धोकादायक व्यक्ती असून त्यांच्यामुळे नेवासे तालुक्यातील शेकडो भाजप पदाधिकारी, कार्येकर्ते, तसेच नगरसेवक यांनी माजी मंत्री गडाखांचे नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यामुळेच तालुक्यात भाजपची वाताहत झाली. असल्याचा आरोप भाजपचे नेते प्रकाश शेटे यांनी केला.
मुरकुटे हे तालुक्यातील दुर्योधन : संजय सुखधान
बाळासाहेब मुरकुटे हे तालुक्यातील ‘दुर्योधन’ असून त्यांच्या स्वार्थी व मतलबी वृत्तीमुळे नेवासे तालुक्याचे वाटोळे झाले असून त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी भाजप व भाजप कार्येकर्त्यांचा बळी दिला असल्याचा आरोप यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखधान यांनी केला.