पाच फेब्रुवारीपासून महाराष्ट्र दौरा
औरंगाबाद – रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. येत्या पाच फेब्रुवारीपासून सदाभाऊ खोत महाराष्ट्र दौरा करणार आहे. तसेच एप्रिलमध्ये पहिले अधिवेशन घेतले जाणार आहे. नव्या पक्षाचा झेंडा आणि नाव जनतेतून आले पाहिजे, म्हणूनच लोकांना नाव आणि झेंडा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुचवावे, असे आवाहन सदाभाऊ खोत यांनी केले.
याबाबत औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. सदाभाऊ खोत म्हणाले, राजकारणापासून अलिप्त असलेले आणि सज्जन लोक पक्षात सामावून घेऊ. हा पक्ष सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी काम करेल. फडणवीस सरकारच्या काळात शेतकरी वंचित राहिला. आताच असो किंवा आधीच सरकार, शेतकरी कर्जमाफी देताना निकष न लावता कर्जमाफी केली पाहिजे होती, असे मत त्यांनी व्यक्त केले.
निवडणुकीच्या काळात जे आश्वासन उमेदवार देतात ती शपथपत्र म्हणून घेतली पाहिजे. निवडून आल्यावर त्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही, तर त्याच पद काढून घेण्यात यावे, अशी भूमिका निवडणूक आयोगाने घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. रयत क्रांती संघटनेचा निर्धार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात संघटनेची नव्याने उभारणी आणि त्याची वाटचाल याबाबत मंथन करण्यात आले. आता आपल्याला संधी असल्याच सदाभाऊ खोत यांनी सांगितले.