श्रीनगर – जम्मू आणि कश्मीर मधून कलम-370 हटवल्यानंतर या संपूर्ण प्रदेशाचा नव्याने उदय झाला आहे, असे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी म्हटले आहे. येत्या काळात या प्रदेशाचा जो कायापालट होईल, त्याचे दाखले भाविष्यात दिले जातील, असेही सिंह यांनी म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरच्या संपूर्ण क्षेत्राचा तसेच तिथल्या नागरिकांचा विकास व्हावा, यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी डॉ. जितेंद्र सिंग, केंद्रीय राज्यमंत्री अर्जून राम मेगवाल, केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे तसेच इतर काही मंत्र्यांचे शिष्टमंडळ जम्मू कश्मीरच्या भेटीवर आहे. आपल्या या भेटीत सिंग यांनी अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटनही केले.
त्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमासाठी जमलेल्या नगरसेवक, सरपंच आणि पंचांना त्यांनी संबोधित केले. जम्मू-काश्मीरमधल्या नागरिकांमधला आत्मविश्वास पुन्हा जागवणे आणि या संपूर्ण क्षेत्राचा आधुनिकतेने विकास करणे हाच केंद्र सरकारच्या मोहिमेचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. इथल्या नागरिकांचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने गेले अनेक वर्ष रखडलेल्या प्रकल्पांसह नव्या विकास प्रकल्पांनाही मान्यता दिली आहे.
आपल्या भेटीत सिंह यांनी एका क्रीडा संकुलाची कोनशिला ठेवली तसेच जम्मू इथल्या गोल गुजराल इथे स्मार्ट क्लासरूम प्रकल्पाचे उद्घाटनही केले. नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय माध्यभम केंद्राच्या धर्तीवर जम्मू आणि काश्मिर तसेच लडाखमध्ये माध्यमांसाठी केंद्र सुरू केले जाईल, अशी घोषणा सिंग यांनी या वेळी केली.
केंद्रीय राज्यमंत्री अर्जून राम मेगवाल यांनीही सांबा जिल्ह्याला भेट दिली आणि आजवर रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन केले. यावेळी मेघवाल यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.
केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी देखील जम्मु प्रेस क्लब इथे जमलेल्या नागरिकांसोबत संवाद साधला. या क्षेत्रात आयुष्मान भारत योजनेची यशस्वी अंमलबजावणी करणाऱ्या अनेक भागधारकांचा सत्कारही त्यांच्या हस्ते करण्यात आला.