मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी नाट्यमय रित्या उमेदवारी अर्ज भरला आणि तो नंतर माघारी देखील घेतला. त्यामुळे ते मोठ्या चर्चेत आले. मात्र आता त्यानंतर त्यांचे ट्विट चर्चेत आले आहे. ‘विझलो आज जरी मी ,हा माझा अंत नाही… ‘ अशा आशयाची ‘लढेन नव्या उमेदीने’ ही सुरेश भट यांची कविता पोस्ट केली आहे. एकंदरीत त्यांच्या कवितेवरून विधान परिषद उमेदवारीवरून त्यांनी ही पोस्ट केल्याचे दिसत आहे.
लढेन नव्या उमेदीने …… pic.twitter.com/iel4QLW11t
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) June 15, 2022
राऊतांचे म्हणणे म्हणजे शिळ्या कडीला ऊत आणण्यासारखे
शिवाय आज त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधत अनेक प्रश्नांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रपती पदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवार राष्ट्रपतीपदाचे योग्य उमेदवार असल्याचे म्हंटले होते. त्यावरून सदाभाऊ खोत यांनी राऊतांवर टीका केली आहे. “शरद पवारांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करा असं म्हटलं नाही, त्याबद्दल संजय राऊत यांचं अभिनंदनच आहे. पवार साहेबांनी सांगितले की, मी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार नाही. गावगाड्यात म्हण आहे की, ज्याचं त्याला कळेना आणि शेजाऱ्याला रात्रभर झोप येईना. त्यामुळे संजय राऊत रात्रभर जागलेत. त्यामुळे ज्याचे त्याला कळेल की काय करायचे. राऊतांचे म्हणणे म्हणजे शिळ्या कडीला ऊत आणण्यासारखे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
मुख्यमंत्री घरात आणि युवराज देशाच्या वाऱ्या करतात…
यावेळी आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबतही सदाभाऊ खोत यांनी निशाणा साधला , मुख्यमंत्री घरात बसतात आणि युवराज देश वाऱ्या करत असतात. आज ते अयोध्येच्या स्वारीवर गेलेत. ज्यांनी अयोध्येच्या मंदिराच्या वर्गणीमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले आणि गोंधळ घातला, ज्यांनी राम मंदिर बांधायची यांच्यात हिंमत नाही असे विधान केले होते, तेच आता आयोध्येला निघालेत.म्हणजे यांना रामाचाही जप करायचा आहे आणि काँग्रेस वगैरे आहेत त्यांना हिरवे झेंडे खांद्यावर घेऊन नाचायचे आहे. एका म्यानात दोन तलवारी राहतील कश्या? त्या राहू शकत नाहीत. मग तुम्ही रामाला जावा, नाहीतर काशीला जाऊन आंघोळ करा. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातून तुम्ही संपलेले आहात, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.