हुतात्मा राजगुरू जलाशयात जलपूजन
राजगुरूनगर – खेड तालुक्याला पाण्यापासून वंचित ठेवू नका. वेळप्रसंगी राजकारणाचा त्याग करण्याची वेळ आली तरी मी करेन, माझ्या तालुक्यातील जनतेच्या हितासाठी रक्त सांडायची वेळ आली तरी मी करेन, कसल्याही परिस्थितीत आमच्या हक्काचे पाणी आम्ही आंबेगावला जाऊच देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका खेड-आळंदी मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते यांनी मांडली.
खेड तालुक्यातील चास कमान व कळमोडी धरण हा दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. चासकमान धरणाच्या हुतात्मा राजगुरू जलाशयात साडी-चोळी, हार व नारळ वाहून मंगळवारी (दि. 1) आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते जल पूजन करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा दूध संघाचे सदस्य अरुण चांभारे, जिल्हा परिषद माजी सदस्या मंगल चांभारे, खेड पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे, सुरेश शिंदे, उपसभापती विठ्ठल वनघरे, लक्ष्मण मुके,
कळमोडीच्या सरपंच हेमलता गोपाळे, तालुका राष्ट्रवादीचे नामदेव गोपाळे, महिला राष्ट्रवादीच्या सुजाता पचपिंड, विठ्ठल गटे, पांडूरंग जठार, बहिरवाडीच्या सरपंच वसुधा राक्षे, उप विभागीय अभियंता डी. एस. डिग्गीकर, सहायक अभियंता एस. एस. सुसुंद्रे, कर्मचारी बाबाजी कडलग, उद्धव नाईकडे, भिवसेन गुंडाळ, रोहिदास नाईकडे, तुळशीराम बोंबले, रघुनाथ कडलग, बाळासाहेब आनंदकर, बाळासाहेब कदम आदी कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, कळमोडे धरणातून 2680 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
आमदार दिलीप मोहिते म्हणाले की, भामा आसखेड धरणातील पाणी पुणे आणि पिंपरी चिंचवडला वळवलेले आहे. कळमोडी धरणातील पाणी आंबेगाव तालुक्याला नेण्याच्या हालचाली सुरू आहेत, या पूर्वीही आम्ही त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला आहे. कळमोडी धरणाचे पाणी आमच्या हक्काचे असून एक इंचही पुनर्वसन आंबेगाव तालुक्याला झालेले नाही, त्यामुळे या पाण्यासाठी आम्हाला कालही संघर्ष करावा लागला आजही आहे तर उद्याही करावा लागणार आहे. राज्यसरकारला विनंती आहे तुम्ही डिंभे धरणातील पाणी नगरमधील इतर तालुक्यातील देण्याचा प्रयत्न आहे ते पाणी आंबेगाव तालुक्याच्या पठार भागाला द्या, मात्र खेड तालुका पाण्यापासून वंचित ठेवून नका. एवढीच विनंती आमची विनंती असल्याचे त्यांनी नमूद केले.
खेड तालुका तहानेला राहतो की काय?
चास-कमान धरण आमच्या तालुक्यात असून पुनर्वसनही माझ्याच तालुक्यात झाले आहे. असे असताना माझ्या तालुक्यातील जनतेला धरणातील फक्त 18 टक्के पाणी व मृत साठ्यावर शेती व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागत आहे. कारण 82 टक्के पाणी शिरूर तालुक्यात जाते आहे त्यामुळे आमचा तालुका तहानलेला राहतो की काय अशी परिस्थिती आहे, असे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी नमूद केले.
कळमोडीचे पूजन सरपंचांच्या हस्ते
कळमोडी धरणाच्या जलाशयाचे पूजन कळमोडीच्या सरपंच हेमलता गोपाळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विकास सोसायटी अध्यक्ष संजय गोपाळे, उपसरपंच दिगंबर बाबू गोपाळे, बजरंग गोपाळे, मंगलदास पवार, नामदेव गोपाळे, विठ्ठल गटे मोहन गटे, सुदाम पवार आनंदा गोपाळे, दत्ता गोपाळे, काळूराम गोपाळे, रामदास पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.