मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेले स्फोटकं, मनसूख हिरेन यांची आत्महत्या आणि तपास अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेवरून सध्या राज्यातील राजकारण तापलं आहे. या प्रकरणाचा तपास एनआयए या राष्ट्रीय संस्थेकडे देण्यात आला आहे. मात्र या प्रकरणासंदर्भात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी एनआयए तपास संस्थेला सल्ला दिला आहे.
स्फोटक आणि सचिन वाझे या प्रकरणासंदर्भात एनआयएने विनाकारण बातम्या पसरवू नये, असा सल्ला जयंत पाटील यांनी दिला आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके आणि सचिन वाझे यांच्या चौकशीबाबत संपूर्ण तपास झाल्यावर आणि निष्कर्षापर्यंत पोहोचल्यानंतरच एनआयएने यासंदर्भात बोलावे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. सतत वेगवेगळी माहिती दिल्याने जनतेपर्यंत चुकीचा संदेश जात असल्याचे पाटील यांनी नमूद केलं.
एनआयएने तपास पूर्ण करावा. परंतु, तपास करताना माध्यमांमध्ये बातम्या पेरू नये, असंही पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी भाजप खासदार जयंत पाटील यांच्यावरही टीका केली. नारायण राणे सत्तेत नसल्यामुळे अस्वस्थ झाले आहेत. पाण्याबाहेर असल्यावर माशाची जशी अवस्था होते, तशी त्यांची झाली आहे. त्यामुळे ते राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी करत असल्याचं टीकास्त्र पाटील यांनी राणे यांच्यावर सोडलं.