माधव विद्वांस
ज्येष्ठ संगीतकार व गायक सचिन देव बर्मन यांची आज जयंती. त्यांचा जन्म त्रिपुराच्या राजघराण्यात 1 ऑक्टोबर 1906 रोजी सध्याच्या बांगलादेशमधील कोमिल्ला येथे झाला. ते मणिपूरची राजकन्या राजकुमारी निर्मलादेवी आणि महाराजा ईशानचंद्र माणिक्य देव बर्मन (त्रिपुरा) यांचे चिरंजीव. त्यांची आई ते दोन वर्षांचे असतानाच मरण पावली. राजेशाही आणि अत्यंत श्रीमंत मुलांसाठी असलेल्या हॅरो आणि इटन यांच्या बोर्डिंग स्कूलमध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यांच्या वडिलांनी सचिन देव यांना कोमिल्लाच्या युसूफ स्कूलमध्ये दाखल केले. 1920 मध्ये ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया कॉलेज, कोमिल्ला येथे प्रवेश घेतला.
पदवी परीक्षा पास झाल्यावर संगीत विषय घेऊन एम.ए. करण्यासाठी कोलकाता येथे गेले; पण ते पूर्ण होऊ शकले नाही. सन 1925 ते 1930 दरम्यान या काळात त्यांनी संगीतकार के. सी. डे यांच्याकडे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर 1930 ते 32 दरम्यान ते भीष्मदेव चट्टोपाध्याय यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. दरम्यान, सारंगीवादक खलिफा बादल खान आणि उस्ताद अल्लाउद्दीन खान यांच्याकडे प्रशिक्षण घेतले. 1920चे दशकाच्या उत्तरार्धात एस. डी. बर्मन यांनी कलकत्ता रेडिओ स्टेशनवर गायक म्हणून काम सुरू केले. सुरुवातीस त्यांचे गायन व संगीत बंगाली आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर आधारित होते. त्यांची पहिली रेकॉर्ड हिंदुस्तान म्युझिकल प्रॉडक्ट कंपनीने सन 1932 मध्ये बनविली.
वर्ष 1934 मध्ये त्यांनी अलाहाबाद विद्यापीठाच्या निमंत्रणानिमित्त अखिल भारतीय संगीत परिषदेला हजेरी लावली, तिथे त्यांनी आपली बंगाली ठुमरी सादर केली. त्याचदरम्यान त्यांना बंगाल संगीत परिषद, कोलकत्ता येथे बोलावण्यात आले, ज्याचे उद्घाटन रवींद्रनाथ टागोर यांनी केले होते. तेथे त्यांनी आपली ठुमरी गायली आणि त्यांना सुवर्णपदकही देण्यात आले. दरम्यान, कोलकाताच्या बालीगंगा परिसरातील साऊथेंड पार्कमध्ये त्यांनी घर बांधले व 10 फेब्रुवारी 1938 रोजी ढाका येथील दंडाधिकारी रायबहादूर कमलनाथ दासगुप्ता यांची नात, मीरा दासगुप्ता यांच्याशी विवाह केला. वर्ष 1939 मध्ये त्यांचे पहिले अपत्य राहुल देव बर्मनचा जन्म झाला.
संगीतकार म्हणून त्यांनी सती तीर्थ आणि जनानी या बंगाली नाटकांमधून सुरुवात केली आणि शेवटी “राजगी’ या चित्रपटास त्यांनी प्रथम संगीत दिले व त्यांच्या कारकिर्दीस सुरुवात झाली. वर्ष 1944 मध्ये ते शशिधर मुखर्जीच्या विनंतीनुसार मुंबईला आले. “दोभाई’ या चित्रपटातील गीता दत्तने गायलेले “मेरा सुंदर सपना बीत गया’ या गाण्यामुळे त्यांना प्रसिद्धीच्या झोतामध्ये आणले.
एस. डी. बर्मन यांनी “आराधना’च्या सर्व गाण्यांसाठी संगीत दिले, परंतु लवकरच ते आजारी पडले आणि चित्रपटाचे पार्श्वभूमी संगीत तयार करण्याचे काम त्यांचा मुलगा आर. डी. बर्मन यांच्याकडे सोपविले. महान संगीतकारास अभिवादन.