कोणालाही अपयशी व्हायचे नसते. ते कोणाचे ध्येय नसतेच. यशप्राप्ती हाच प्रत्येकाचा ध्यास असतो. मात्र त्याचवेळी हेही लक्षात घेतले पाहिजे, की केवळ यश मिळवणेच महत्त्वाचे नाही, तर ते प्राप्त करण्यासाठी जे परिश्रम घेतले जातात, प्रयत्न केले जातात ते त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे असतात.
टीव्हीवरील जाहिरातीत प्रख्यात फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. तो म्हणतो, “माझे आजचे जे काही यश दिसतेय त्यामागे 17 वर्षे आणि 114 दिवसांची तपश्चर्या आहे’. केवळ मेस्सीच कशाला? आपल्या सभोवती जी कोणी माणसे आपापल्या क्षेत्रात यशस्वी झाली आहेत, त्या सगळ्यांचे म्हणणे यापेक्षा वेगळे असणार नाही. मात्र एक गोष्ट आपण नेहमी विसरतो… किंबहुना ती कायमस्वरूपी लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे यश असो वा अपयश हे दृश्य परिणाम आहेत. त्याच्या मागे धावण्यात एका बाबीकडे आपले कायम दुर्लक्ष होते. ती बाब म्हणजे एखादे ध्येय साध्य करण्यासाठी केलेले प्रयत्न.
यशप्राप्तीसाठी बुद्धिमत्ता आणि काही वेळा भाग्य महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाचे आणि आवश्यक असते ती तुमची जिद्द, दृढनिश्चय, समर्पण, शिस्त आणि ध्येसिद्धीचा ध्यास. एखाद्या गोष्टीची तयारी करण्यासाठी लागणारा कालावधी किंवा त्याच्या प्रशिक्षणाचा अवधी म्हणूया आणि त्याची पद्धत यावरच अंतिम निकाल अथवा यश अवलंबून असते. साध्य प्राप्तीसाठी तुम्ही किती प्रयत्न केले, त्यात स्वत:ला किती झोकून दिले यावरच तुम्हाला प्राप्त झालेल्या यशाचा आनंद निर्धारित होत असतो.
एखादा दहावी-बारावीचा विद्यार्थी असो वा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा परीक्षार्थी असो त्याला किती गुण मिळणार याची त्याला बऱ्यापैकी कल्पना असते. ती तशी असते कारण आपण किती अभ्यास केलाय आणि परीक्षेत काय लिहिलेय याची त्याला जाण असते. त्याने केलेली अपेक्षा आणि मिळालेले गुण यात थोडाफार फरक पडतो.
यशोशिखर गाठायचे असेल तर अगोदर स्वत:च्या भयावर, नैराश्यावर मात करावी लागेल. स्वत:च्या क्षमतेवर, कर्तृत्वावर विश्वास ठेवावा लागेल. अपयशाने विचलित होता कामा नये. उलट अपयश हा तर यशाच्या मार्गातील एक टप्पा आहे, असे मानले पाहिजे. त्यामुळे एखादी बाब साध्य करण्यासाठी जे प्रयत्न करत आहात, त्यांचा किंवा त्या तयारीच्या प्रशिक्षणाच्या अवधीचा आनंद घ्यायला हवा. तसे केले तर मिळालेले यश कितीही असो, त्याकरता घेतलेल्या कष्टाचा, प्रयत्नांचा आनंद तुम्हाला खऱ्या अर्थाने उपभोगता येईल, त्या यशाची फळे चाखता येतील.
सतत शिकण्याची व त्याचा उपयोग करण्याची कला अंगी असणे ही आणखी एक महत्त्वाची बाब आहे. यासंदर्भात रॉजर फेडररचे उदाहरण बोलके आहे. किमान 20 वेळा ग्रॅंड स्लॅम जिंकूनही आपले स्थान अबाधित राखण्यासाठी त्याला आजही नियमित सराव करावा लागतो. केवळ फेडररच कशाला, सचिन तेंडुलकर किंवा अन्य कोणीही घ्या, आज आपण आहोत ते स्थान टिकवण्यासाठी सातत्याने सराव करत राहणेच अपरिहार्य आहे. तसे करत राहिलात तर दरम्यानच्या काळात तुम्हाला अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळतात.
त्यामुळे नवे काही शिकायचे असेल तर त्याकडे पाठ करू नका, निरूत्साह तर अजिबातच नको. शिकत राहा आणि सराव करा. शेवटी मला एवढेच म्हणायचे आहे की यश अथवा अपयश ही केवळ उप अंगे आहेत व तात्कालिक आहेत. सगळ्यांत महत्त्वाचे काही जर असेल तर त्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि ते साध्य करण्यासाठी तुम्ही विकसित केलेली प्रक्रिया अन् केलेले प्रयत्न!
– तारक मयुख पारिख