येरवडा (प्रतिनिधी) – करोना विषाणुसाठी संपूर्ण देश लढत आहे. करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यास त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्याचे काम अग्निशामक दलाकडे आहे; परंतु अग्ग्निशामक दलाच्या देवदूत वाहनांवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेसाठी कोणतेही साहित्य पुरविले जात नसून पुरविलेले साहित्यही चांगल्या दर्जाचे नसल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
आपत्ती व्यवस्थापनेचा एक भाग असलेल्या अग्निशामक दलाने कंत्राटी पध्दतीने घेतलेल्या देवदूतच्या कर्मचाऱ्यांकडे सोपविले आहे. शहरात सहा देवदूतची सहा वाहने आणि 72 कर्मचारी हे शिफ्टनुसार काम करीत आहेत. मात्र, हे काम करताना या कर्मचाऱ्यांकडे त्यांचा फायर ब्रिगेडचा ड्रेस, साधा कापडी मास्क आणि हॅन्डग्लोज, अशी साधने दिलेली आहेत. हीच साधने देऊन त्यांना करोना विषाणू असलेल्या ठिकाणी पाठविले जात आहे.
करोना रुग्ण सापडलेली झोपडपट्टी, सोसायटी, हॉस्पिटल, दफनभूमी, स्मशानभूमी, क्वारंटाईन ठेवलेले रुग्ण या ठिकाणी हे अग्निशामक दलाचे देवदूत जंतुनाशक फवारणी करतात. शहरात अनेक ठिकाणी नवीन करोना रुग्ण आढळत आहे.त्या सर्व ठिकाणी निर्जंतुकीकरण अग्निशामक दलाचे हे देवदूत करित असुन त्यामुळे यांच्या सुरक्षितेसाठी योग्य ते किट कंत्राटदाराने किंवा महापालिकेने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.
तसेच, हे कर्मचारी खासगी कंपनीकडे आर्यन फर्म देवदूत या अग्निशामक वाहनावरील कर्मचारी हे कंत्राटी कामगार आहेत. या कर्मचाऱ्यांनी विमा सुरक्षा कवचची मागणी केली आहे. सध्याच्या धोक्याच्या काळात या कर्मचाऱ्यांची काळजी घेणे गरजेचे असून यासंदर्भातील निवेदनही प्रशासनाकडे देण्यात आले आहे.
सर्व कर्मचाऱ्यांना पीपीइ किट दिले आहेत. काही कारणाने ते उशिरा मिळाले. मात्र ते सर्व कर्मचाऱ्यांना दिले आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना नियमानुसार विमा संरक्षण दिले आहे.
– विष्णु गत्ते, फिल्ड सुपरवायझर, आर्यन फर्मस देवदूत