नवी दिल्ली – युक्रेन मधील खार्किव्ह शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी पंतप्रधान मोदींच्या विनंतीवरून रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी तेथील युद्ध सहा तासांसाठी थांबवले असल्याचा दावा करणाऱ्या पोस्ट सध्या सोशल मिडीयात जोरदारपणे फिरत आहेत. तथापी हे वृत्त खोटे असल्याचा खुलासा खुद्द मोदी सरकारच्याच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने केला आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की अशा प्रकारच्या दाव्यात काहींही तथ्य नाही. आम्ही भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी कोणत्याही देशाला अशा प्रकारे त्यांचे बॉम्बींग थांबवण्याची विनंती करणे अशक्य आहे आणि असा दावा करणेही साफ चुकीचे आहे. आम्ही भारतीय विद्यार्थ्यांना तेथून काही विशिष्ट मार्गाने जाण्याची सुचना केली होती.
अनेकांनी ती सुचना मान्य केली असे त्यांनी सांगितले. खार्किव्ह मध्ये थांबलेल्या विद्यार्थ्यांनी तो भाग त्वरीत सोडावा अशी सूचना भारतीय दूतावासातर्फे या विद्यार्थ्यांना करण्यात आली होती. दरम्यान पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी संपर्क साधून चालू घडामोडींवर त्यांच्याशी चर्चा केली.
या पार्श्वभूमीवर मोदींनी त्यांना युद्ध थांबवण्याची सुचना केली आणि पुतीन यांनी ती मान्य केली अशी जोरदार अफवा पसरली. मोदी समर्थकांनी हा भारताच्या वाढलेल्या जागतिक प्रभावाचा परिणाम असल्याच्या प्रतिक्रीया सोशल मिडीयातून व्यक्त केल्या होत्या. पण आता ही बातमी खोटी असल्याची बाब सरकारकडूनच स्पष्ट करण्यात आली आहे.