जगणंही एक अनंत शोधच आहे. भौतिक सुखापासून, त्याच्या पलीकडच्या संवेदनांचा, सृष्टीशी एकात्म साधण्याचा… आणि अशा अनंत आशा, आकांक्षा, ध्येयांचा. त्या अर्थानं आपण सगळे शोधार्थीच पण जेव्हा एकाच बिंदूवर शोध केंद्रित होतो तेव्हा गवसण्याला सुरुवात होते आणि हीच खरी गंमत आहे.
किल्ल्याजवळ उतरलं की छोटा चौक आहे. तिथनं दोन रस्ते फुटतात. एक ब्राह्मण आळीत जातो तर दुसऱा कुंभारवाड्यात. दोन्ही रस्ते म्हणजे चिंचोळ्या गल्ल्या. एकच ट्रक जाऊ शकेल इतक्या. समोरून दुसरं वाहन आलं की रस्ता बंदच. अशा या गल्लीवजा रस्त्याच्या दुतर्फा जुनी घरं. कौलारू घरांच्या भोवताली अंगण. त्या अंगणात चिकू, नारळ, आंबा अशी झाडं. एखादी विहीर. कुठेकुठे जुन्या काळातली चौसोपी घरं. तसा हा भाग म्हणजे किल्ल्याच्या तटबंदीच्या आतलाच असं लोक म्हणायचे. कारण एका बाजूला मारुती मंदिर आहे, ते म्हणजे किल्ल्याचं प्रवेशद्वार असावं. आता जो चार बुरुजांमध्ये किल्ला उभा आहे तो बालेकिल्ला असावा. त्या मारुती मंदिराच्या आतनं एक भुयार थेट किल्ल्यात जातं अशी चर्चा पण प्रत्यक्षात तिथनं कुणी गेलंय की नाही, माहीत नाही.
हे सगळं जुनं गावच; पण एखाद-दुसरं घर सोडलं तर सुबत्ता नाही. वर्षानुवर्षं लोकं जिथं होती तिथंच आहेत. म्हणजे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक स्तर कित्येक वर्षांत बदललेला नाही. किल्ल्याच्या आतला भाग असल्यामुळं इथं कितीतरी लढाया, मारामाऱ्या आणि रक्तपात घडला असेल. त्या सगळ्या आत्म्यांची नकारात्मक ऊर्जा किंवा शाप म्हणा ना, त्यानंच इथली लोकं कधीच समृद्ध होत नाहीत, असं काही लोकं सांगतात.
गाव तसं टुमदार. तीन बाजूंनी समुद्रानं वेढलेलं. एका बाजूला अरबी समुद्र, दुसऱ्या बाजूला समुद्राची खाडी आणि तिसऱ्या बाजूला समुद्राच्या पाण्यानं ओली झालेली खाजण जमीन. तिथं तिवराची झाडं. खाडीच्या पलीकडच्या किनाऱ्यावर रांगेनं बोटी लागलेल्या, लाटांवर झुलणाऱ्या त्यांच्या डोलकाठ्या. तिकडं काही मच्छिमार सिमेंटच्या चौथऱ्यावर मासेमारीच्या जाळ्यांची दुरुस्ती करत बसलेले. त्या किनाऱ्यालगत मासळी वाळत घातलेली. काही बांबू उभे जमिनीत रोवलेले. त्यांना आडवे बांबू बांधलेले आणि त्या बांबूंवर मासळी, विशेष करून बोंबील वाळत घातलेले. वाऱ्याच्या प्रत्येक झुळूकेसोबत त्या बोंबलांचा नाकात घुसखोरी करणारा उग्र वास.
कुंभारवाड्याकडं जाणारा गल्लीवजा रस्ता छोटी-छोटी वळणं घेत जातो. दोन-तीनशे मीटरवर उजवीकडं वळलं की शेवटच्या टोकाला हे घर. तिथं ती राहायची. तिला घरात “माय’ म्हणायचे. तिच्या पुढच्या दोन पिढ्या तिच्या डोळ्यासमोर वाढल्या होत्या. तिसरी पिढी शाळेत जाऊ लागली होती, पण ती या सगळ्या जगापासून अलिप्त.
घर चार खणांचं. बाहेर व्हरांडा. एका बाजूला स्वयंपाकखोली. आत एक मोठी बैठकीची खोली. त्याच्या आत माजघराच्या दोन खोल्या. एका खोलीत देव्हारा. त्यामागं ओसरी. न्हाणीशेजारी तांब्याचा बंब ठेवलेला. तिथंही एका बाजूला चूल मांडलेली. घराच्या व्हारांड्यासमोर मोकळी जागा. त्याभोवताली तारेचं जुनं कुंपण. कुंपणाला एका बाजूला फळ्यांचं छोटं दार. ते दार उघडलं की समोर वाळू नि त्या पलीकडं खाडी.
“माय’ला एक मुलगा, सून आणि दोन नातवंडं. सून दिवसभर काम करत असायची. कधीमधी “माय’ तिला थोडीथोडकी मदत करायची, पण दुपारचा वामकुक्षीचा थोडा वेळ सोडला तर बाकी इतर वेळेस “माय’ सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती व्हारांड्यात बसून असायची, गुडघ्यात डोकं खुपसून, लांबवर दिसणाऱ्या खाडीतल्या पाण्याकडं बघत.
मी अनेकदा या घरी गेलो. तिची कहाणी काय असेल, या विचारानं व्यथित झालो पण बरीच वर्ष तिची कहाणी काही कळाली नाही. तिचा मुलगा माझा दोस्त. तो लिहायचा, त्यामुळं आमची गट्टी. त्याच्यासोबत कधीकधी मी तिच्या घरी जायचो. तेव्हा ती माझ्याकडं बघून नुस्त्या ओठांच्या कडा रुंदावायची. उसनं हसू असतं तसं. तिचा आवाज मी तरी कधी ऐकला नाही. पण तिच्या त्या उसन्या हसण्यामागं मोठ्ठं दुःख होतं याची जाणीव व्हायची.
वय सत्तरीकडं झुकलेलं. अंगात नऊवारी. डोईवर पदर. अंगावर एकही दागिना नाही. केस पिकलेले. सुरकुतलेला चेहरा नि अपार करुणेचा भाव असलेले डोळे, असं तिचं रूप. तिच्या डोळ्यातली ही अपार करुणा पाहिली की करुणेचा जगातला पहिला कोंब इथंच उगवला असेल, असं वाटायचं. त्यामुळं ती आई, आजीच्या पलीकडची “माय’ वाटायची.
खाडीतल्या पाण्याकडं तासन्तास बघत ती काय शोधत असेल, असा प्रश्न पडायचा. तिचं नेमकं काय हरवलं असावं, असं मनात यायचं. पण पुन्हा वाटायचं, तिचं जे काही हरवलंय ते गवसण्यापलीकडचं असावं. त्यामुळे तिला त्या शोधात ती हरवलेली वस्तू, व्यक्ती गवसल्याचा भास नि निजानंद मिळत असेल तर आपण तिला का विचारावं, असंही वाटायचं. त्यामुळं माझा प्रश्न माझ्या मनात नि तिचा भास तिच्या डोळ्यांतच विरून गेला.
मी पहिल्यांदा महाबळेश्वरच्या “आर्थर सीट’वर गेलो तेव्हा हा प्रश्न पुन्हा मनात अवतरला. महाबळेश्वरातली ही जागा एका कड्याच्या टोकावर उंच ठिकाणी आहे. ब्रिटिश अधिकारी आर्थर याचं नाव या ठिकाणाला दिलंय. तिथं रोज शेकडो लोक जातात, फोटो काढतात, नवी जोडपी एकमेकांच्या मिठीत शिरतात पण त्यांच्यापैकी कुणालाच आर्थरची वेदना, त्याची शोधाची यात्रा नि त्याच्या मनात खोल खोल रुतलेलं शल्य जाणवलं नसेल का? मला या प्रश्नानं उद्विग्न केलं.तिथं लावलेला माहितीफलक वाचताना माझा जीव गलबलून आला.
त्या “आर्थर सीट’ या ठिकाणावरनं खाली बघितलं की दूरवर खाली एक पांढरी रेष दिसते ती म्हणजे सरस्वती नदी. त्या सरस्वती नदीत एकदा हा आर्थर त्याच्या बायको-मुलीसोबत पोहायला गेला. पोहता पोहता त्याची बायको नि मुलगी त्याच्या डोळ्यादेखत पाण्यात बुडाली. तिथं त्याच्यासोबत काही शिपाईही होते. त्यांनी खूप शोध घेतला पण काही हाती आलं नाही. त्यानंतरही अनेक दिवस, महिने शोध सुरू होता पण आर्थरच्या बायको नि मुलीचं नखंही कुणाच्या नजरेला पडलं नाही. त्या दोघी अशा अचानक कुठं लुप्त झाल्या? या विचारानं आर्थरचं जीवनच उसवून गेलं.
त्यानंतर काही वर्षं तो नोकरीत होता पण कामात लक्ष नव्हतं. सकाळपासून सूर्य मावळून गेल्यानंतरही तासन्तास तो इथं येऊन बसायचा, त्याच सरस्वती नदीकडं टक लावून. त्याची बायको नि मुलगी कधीतरी त्या पाण्यातून बाहेर येतील नि त्याला साद घालतील या अपेक्षेत. ही आभाळाएवढी वेदना त्यानं अनेक वर्षं उरात जपली. मग त्यानं इथं येणं सोडून दिलं. बराच काळ तो परत इकडं फिरकलाच नाही.
पण प्रश्न तसाच राहिला. त्याला त्याची बायको नि मुलगी भेटली का? त्याच्या अपार शोधदृष्टीतूनच त्या दोघींचा भास उद्भवला असेल का? का शोधच गवसणं बनून गेला, अशा अवस्थेला तो पोचला का? या प्रश्नाचं उत्तर त्या शोधातच विरून गेलं.
जगणंही एक अनंत शोधच आहे. भौतिक सुखांपासून, त्याच्या पलीकडच्या संवेदनांचा, सृष्टीशी एकात्म साधण्याचा… आणि अशा अनंत आशा, आकांक्षा, ध्येयांचा. त्या अर्थानं आपण सगळे शोधार्थीच पण जेव्हा एकाच बिंदूवर शोध केंद्रित होतो तेव्हा गवसण्याला सुरुवात होते आणि हीच खरी गंमत आहे.
त्या “माय’शी आणि त्या आर्थरशी माझं जवळचं नातं आहे. माझं काहीच हरवलं नसेल, पण काही गवसलंही नाही हे त्याचं कारण असेल कदाचित. नाहीतर माझा शोध अजूनही सुरूच आहे, जगण्याचा, स्वतःचा, अस्तित्त्वाचा असंही असेल कदाचित. त्या शोधात जे गवसलं त्याचीच तर ही अभिव्यक्ती नाही ना?
– डॉ. भालचंद्र सुपेकर