पुसेगाव – खटाव गावाच्या जांभुळवाडा नावाच्या शिवारातील पोवई गणेश मंदिराच्या खालील बाजूस असलेल्या गट नंबर 170 मधील पुसेगावचे प्रगतशील शेतकरी व आल्याचे व्यापारी शंतनु प्रल्हाद वाघ यांच्या शेतातील सुमारे 25 हजार रुपये किंमतीचे आले पीक अज्ञात चोरट्यानी खोदून नेले आहे. याबाबत पुसेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
सध्या या भागात रब्बीची सुगी जोरात सुरू आहे. शेतकरी ज्वारी, गहू, हरभरा अशी हातातोंडाशी आलेली पिके काढण्यात दिवसभर मग्न आहेत. तसेच काही ठिकाणी पिकांना पाणी देण्याचे कामही अंतिम टप्प्यात असल्याने शक्यतो शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात जात नसल्याने दिवसभर माणसांनी गजबजलेल्या शेतशिवारात रात्रीच्या वेळी कोणीही दिसत नसते. याचाच फायदा अज्ञात चोरट्यानी घेत गुरुवारी रात्री शंतनु वाघ यांच्या जांभुळवाडा नावाच्या शिवारातील सुमारे 25 हजार रुपये किमतीचे आले गुरुवारी रात्री अक्षरशः जमिनीतून खोदून चोरून नेले. चार वर्षांपासून पडझड झालेल्या आले पिकाच्या दरात यावर्षी वाढ होताना दिसत आहे. आजमितीला सुमारे 21 ते 22 हजार रुपये प्रति गाडी (म्हणजे पाच क्विंटल) अर्थात सुमारे 42 ते 44 रुपये किलो या दराने सध्या आले पिकाची विक्री होत आहे. पुढील तीन चार महिन्यांत या दरात कमालीची वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने नगदी पीक असलेले आले हे नऊ महिन्यांचे पीक आहे.
मात्र, काही शेतकरी आले पिकाची पानगळ झाली तरीही ते जमिनीत दिडीसाठी तसेच ठेवतात. उन्हाळाभर पाण्याचे योग्य नियोजन केल्यास त्या पिकाला पुन्हा फुटवा येतो आणि जमिनीत आले पिकाचा माल ही चांगलाच वाढतो आणि पावसाळ्यात याच पिकातून शेतकऱ्याला दीडपट उत्पादन होत असते. गतवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लावलेल्या आले पिकाच्या बांड्या (पाने) सध्या गळलेल्या आहेत. आले पीक दिडीला ठेवले आहे त्याची जोपासना शेतकरी करत आहेत. मात्र, उन्हाळा वाढू लागला की अशा चोऱ्या वाढत आहेत
वर्षभर पोटच्या पोरासारखं जपलेल्या आले पिकाची शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळीही जाणीवपूर्वक राखण करणे गरजेचे आहे. पोलीसांनीही याबाबत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. तसेच दिडीने आले ठेवलेल्या शेतकऱ्यांनी आले पिकाची योग्य ती काळजी घेतल्यास चांगला फायदा होणार आहे. कारण येत्या तीन चार महिन्यात आले पिकाच्या विक्री दरात कमालीची वाढ होणार असण्याची शक्यता आहे.
शंतनु वाघ, आले खरेदी विक्री व्यापारी, पुसेगाव