आई-वडील लहानपणीच गेलेले. तेव्हा त्याचं वय होतं पाच वर्षांचं. कुठल्यातरी दुर्धर आजारानं ते देवाघरी गेले असं त्याला सांगितलं होतं. त्यानंतर तो एका अनाथाश्रमात आला. तिथंही रोज सकाळ-संध्याकाळी त्याला औषध दिलं जायचं. आठवड्याला डॉक्टर तपासणीला यायचे. औषधं द्यायचे, सगळ्या मुला-मुलींशी गप्पा मारायचे आणि निघून जायचे. हा नित्यक्रम सुरू होता.
आता त्याला इथं येऊन सहा वर्षं झाली होती. त्याला सगळं कळत होतं. या अनाथाश्रमाच्या बाहेर जाऊन आपणही फिरावं, बाहेरचं जग बघावं, असं त्याला सारखं वाटत होतं. नाही म्हणायला वर्षातून एक-दोन वेळा त्या सगळ्याच मुलांची सहल जायची. एकदा मुंबईला राणीचा बाग, गेटवे ऑफ इंडिया, म्हातारीचा बुट, नेहरू तारांगण असं सगळं त्यांना फिरवून आणलं होतं. एकदा पुण्यातही शनिवारवाडा, लालमहाल, जंगली महाराज मंदिर, शिंदे छत्री असं बरंच काही दाखवलं होतं. पण ती एक-दोनदाची सहल सोडली तर बाकी दिवस अनाथाश्रमाच्या कंपाउंडच्या बाहेर पडायला त्यांना परवानगी नव्हती.
एक दिवस गावाकडचे नातेवाईक म्हणून एक पन्नाशीचं जोडपं त्याच्याकडं आलं. नातेवाईक म्हणजे काय हे तो फक्त ऐकून होता. एक-दोन मुलांचे नातेवाईक अनाथाश्रमात यायचे पण ते त्या मुलांना जवळ काही घ्यायचे नाहीत. अगदी जवळ येऊ दिलं तरी स्पर्श मुद्दाम टाळायचे. त्याला ठाऊक होतं ती नाती वेगळी होती. अनाथाश्रमातल्या मावशी त्या सगळ्या मुलांना जवळ घेऊन लळा लावायच्या. अनाथाश्रमाच्या दीदी, बहुतेक त्या प्रमुख असाव्यात. त्या ही अगदी मनापासून प्रेमाने विचारपूस करायच्या. बाकी अनेक लोक यायचे. कधी कुणी मिठाई आणायचं तर कधी कपडे पण त्या मुलांना स्पर्श कुणीच करायचं नाही.
त्याचे गावाकडचे नातेवाईक म्हणून जे आले होते त्यांना पाहिल्यावर काय करावं त्याला सुचेना. एकतर यांना आपण आयुष्यात कधीच बघितलेलं नाही, आणि त्यांच्या चेहऱ्यावर काही आपुलकीही दिसत नाही. पण त्यातला पुरूष चेहऱ्यावर आपुलकीचा उसना भाव आणत म्हणाला, तोंडावळा एकदम रवीसारखाच. झेरॉक्स कॉपी वाटावा इतका. कसा आहेस बाळा. त्याच्या वडिलांचं नाव रवी होतं हे त्याने अनेकांच्या तोंडून ऐकलं होतं. तो लहान होता तेव्हाच्या बापासोबतच्या काही आठवणी त्याच्यासोबत होत्या पण त्या फारच धूसर होत्या.
त्या पुरूषाचं हे बोलणं ऐकून त्याला वाटलं हे आपल्या वडिलांना ओळखतात म्हणजे ते नक्की आपले जवळचे कुणीतरी आहेत. त्याला आपल्या जवळच्या माणसांना भेटायची, कडकडून मिठी मारायची खूप इच्छा होती. आपलं, आपल्या नात्याचं, रक्ताचं म्हणतात ना, तसं कुणीतरी त्याला हवं होतं. त्याला वाटलं की हे तशाप्रकारचे लोक आहेत. म्हणून तो चेहऱ्यावर हसू घेऊन पुढे सरसावला तो त्या पुरुषाने त्याला हातानेच थांबवलं. तो म्हणाला, आम्ही तुझे जवळचे आहोत. तुला कवेत घ्यायला
आम्ही आसुसलेलो आहोत. आमचं काय आता किती राहिलंय, पण आमचीही मुलं आहेत. त्यांना काही अपाय नको म्हणून काळजी घ्यावीसी वाटते. हे ऐकताच तो हिरमुसून गेला. त्याचं मिठीचं स्वप्न खाडकन गळून पडलं. तो पुरूष पुढे म्हणाला, “मी तुझा काका. म्हणजे तुझ्या बापाचा सख्खा भाऊ. तुझ्या बापाची इस्टेट आहे. तुझ्या आजोबानंतर त्याला तुझा बाप आणि मी दोघंच वारस आहोत. तू आता पुढच्या वर्षी 18 चा होशील तेव्हा तू कागदपत्रांवर सही केलीस की तुझ्या बापाचा हिस्सा तुला मिळेल आणि माझा मला. खरंतर हे असं होईल असं वाटलं नव्हतं पण काय कायद्याचे सोपस्कार वेळीच केलेले बरे.’ आत्ता त्याला या सगळ्याचा अर्थ कळाला. तो म्हणाला, “मला वेगळंच वाटलं होतं. सहीच पाहिजे असेल तर मी आताही देतो. मला इस्टेटीचं काय करायचंय.’ “तसं नाही राजा, तुझं तुझ्यापाशी दिलेलं बरं…’
…त्याला जेव्हा पहिल्यांदा सांगण्यात आलं की तू एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेस तेव्हा त्याला त्याचा अर्थच कळला नाही. काहीतरी आजार झालाय एवढंच त्याला कळालं. पण त्यामुळे लोकं आपल्याला स्पर्शही करणार नाहीत याची त्याला जाणीव होती. अनाथाश्रमात बाहेरची लोकं आली की त्याला वाळीत टाकल्यासारखं वाटायचं आणि आपण खरंच अस्पृश्य आहोत की काय, असं वाटायला लागायचं. पण हळूहळू त्याची सवय होत गेली. ही बोच सुसह्य होत गेली पण स्पर्शाची आस आणखी गहिरी होत गेली.
अनाथाश्रमात मावशी मनापासून सगळ्या मुलांवर प्रेम करायच्या बाकी संस्थेच्या प्रमुख दीदी, तिथं राहणारे इतर लोक आणि बाहेरून येणारे सगळे यांच्यात बेगडी प्रेम दिसायचं. स्वार्थ आहे म्हणून ते जवळ घेतल्याचा, आपुलकी असल्याचा आव आणायचे पण त्यात प्रेमाचा ओलावा अजिबात नसायचा. त्या दूरच्या नातेवाईकांचं वर्षभर येणं सुरू होतं. कधी कपडे तर कधी थोडेफार पैसे किंवा आणखी काही जिन्नस ते त्याला द्यायचे. प्रत्येक भेटीत एखादी वस्तू आणून त्यांचं त्याच्यावर किती प्रेम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करायचे. पण त्याला सगळं कळत होतं. हा सगळा दिखावा त्याच्या एका सहीसाठी चालला होता.
वर्ष झालं तसं एक दिवस ते कागदाचं भेंडोळं घेऊन आले. त्याच्या बऱ्याच ठिकाणी सह्या घेतल्या. त्याचे फोटो काढले. असाच एक दिवस ते त्यांच्या गाडीतून त्याला मोठ्या कचेरीत घेऊन गेले. तिथं साहेबांच्या समोर त्याला सह्या करायला लावल्या. त्या दिवसभर त्याला त्यांनी कुठंकुठं फिरवलं. चांगल्या हॉटेलात जेवायलाही नेलं. पण स्पर्श होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतली. त्या दिवसानंतर मात्र पुढे ती मंडळी अनाथाश्रमात कधीच फिरकली नाहीत.
दीड महिन्यांपूर्वी एका तिशीतल्या तरुणीने त्याला दत्तक घेतलं. काही दिवसांनी ती त्याला घरी घेऊन जाईल, असंही सांगितलं होतं. त्याला वाटलं ही देखील एखाद्य इस्टेटीसाठी हे करत असेल. पण ती त्याला खूप मायेनं बोलायची. अनाथाश्रमातलेही म्हणायचे की बघ आता तुझं सोनं होईल. पण त्याचा विश्वास बसत नव्हता. लोकांना आपला स्पर्श नकोय त्यांना फक्त सहानुभूती दाखवायची असते किंवा आपल्या रूपाने त्यांचा स्वार्थ साधायचा असतो, याची त्याला पक्की खात्री झाली होती.
पुन्हा एकदा ती तरुणी त्याला एका कार्यालयात घेऊन गेली. तिथं त्या साहेबांनी त्याला भरपूर प्रश्न विचारले. यांच्यासोबत राहायची तयारी आहे का विचारलं तर तो क्षणभर गप्प राहिला मग म्हणाला, मिठी मारू दिली तर राहीन. साहेबांना काही कळलं नाही पण मग संस्थेच्या मावशींनी त्याच्याबद्दल सांगितल्यावर त्यांना खरी मेख समजली. त्या दिवशीही त्याला भरपूर खाऊपिऊ घातलं. ती तरुणी स्पर्श टाळत नव्हती पण त्यालाच संकोच वाटत होता. तिच्या सगळ्या वागण्यात त्याच्याविषयी आत्मीयता होती.
अखेर तो दिवस उजाडला. ती तरुणी कार घेऊन आली. त्याचं सामान भरलं आणि तिचा ड्रायव्हर कारवरून निघाला. ती म्हणाली आपण माझ्या स्कूटरवरून जाऊ. तो मागे बसला. मध्येच गाडी खड्ड्यात आदळली. तोल जाईल म्हणून त्याने पटकन तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने म्हटलं, “घाबरू नकोस, मला तुझी ताई समजलास तरी चालेल. आजपासून आपण एकाच घरात राहणार आहोत. भावाबहिणीसारखे…’
त्याने तिला मागूनच घट्ट मिठी मारली. इतकी वर्षं त्याने रोखून धरलेली स्पर्शाची आस पूर्ण होत होती. त्याच्या डोळ्यातून असीम आत्मानंद झरत होता.
– बी. चंद्रदास