झिलमिल सितारोंका आंगन होगा
रिमझिम बरसता सावन होगा
पूर्वी प्रत्येकाच्या घराचं असंच स्वप्न असायचं, कारण वेगवेगळ्या गोष्टीसाठी अंगणाची उपयुक्तता होती, त्यामुळं घर छोटं असायचं अन् अंगण मोठं! त्यामुळेच घरापेक्षा अंगणातल्या खूप मजेशीर आठवणींची सोबत असायची अन् अंगणात खेळता खेळता कधी मोठं झालो हे कळतच नसायचं.
अंगण! प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. अंगण नाही ते घर कसले? अंगण नाही त्या घराला शोभाच नाही. घरं छोटी अन अंगणे मोठी असायची, अंगण म्हणजे घराचे वैभवच जणू!
मुरूम, मातीची भर टाकून थोपटूनथोपटून गुळगुळीत करून त्यावर शेणाने सारवले की अंगणे दृष्ट लागण्यासारखी दिसायची; त्यावर पांढऱ्या रंगांची ठिपक्यांची रांगोळी किंवा पानाफुलांनी रांगोळी बघतच रहावे असे वाटायचे. अंगणाच्या कोपऱ्यात तुळशीचा कट्टा, तिच्यापुढं छोटंसं स्वस्तिक, एका बाजूला कोपऱ्यात न्हाणी! होय, कुडाचा किंवा कंबरेएवढया भिंतीचा आडोसा केलेली न्हाणी असायची. एका बाजूला कोपऱ्यात धुणं भांडी करायसाठी दगड, दगडावर छोटासा अंग घासायला दगडाचा खरबरीत तुकडा आताच्या भाषेतली घासणी. पण नैसर्गिक बिन खर्चिक! एका कोपऱ्यात किंवा घराच्या बाजूलाच घेवडा, पडवळ, कारलं, दोडका यासारख्या वेलवर्गीय भाजीचा मांडव, छोटी फुलझाडे किंवा जाई जुईचा मांडव आणि सांडपाण्याच्या जागी अळू. एकमेकांच्या अंगणातून अलीकडं पलीकडं सहज जाता येत असे, कुणीच मज्जाव करत नसे.
संध्याकाळी सुपात तांदूळ निवडताना सुपाचा आवाज ऐकताच भुर्रकन चिमण्यांचा थवा अंगणात यायचा अन साळी, तांदळातल्या जाळ्या अळ्या टिपायचा. शेजारच्या झाडावरून कावळाही मग काव कावव करत पाय अन पंख ताणून आळस झटकायचा.कधी कधी साळुंक्याही टुण टुण उड्या मारत येत आणि बालपणीच आसपासच्या पक्ष्यांची ओळख होई. संध्याकाळी आयाबाया अंगणात बसून गप्पा मारायच्या, हातात काही तरी निवडणं घेऊन; कधी भाजी तर कधी तांदूळ. तुळशीजवळ संध्याकाळी दिवा तेवायचा.
उन्हाळ्यात तर सगळेजणच अंगणात झोपायचे. (अंगणात प्रकाशासाठी बल्ब असला तरी बंद असायचा, कामापुरताच तो लावायचा) लहानपणी आभाळातल्या चांदण्या मोजण्याची मजा औरच! कुठे सप्तर्षी, कुठं विंचू, कुठं ध्रुव तर कधी आकाशातून निसटणारा तारा या सर्वांशीच सख्य होतं आणि चंद्र तर अगदी जिव्हाळ्याचा! चांदोमामाकडे बघत बघत लहान बाळाच्या ताटातील भाताचा, भाकरीचा काला संपायचा. दिवस सूर्यनारायणाच्या सोबतीने सुरु व्हायचा; प्रथम तो अंगणात यायचा मग आकाशभर फिरायचा. थंडीच्या दिवसात पाठ शेकेपर्यंत सूर्याची किरणं अंगावर झेलत बसायचो.
अंगणातच गजग्यांचे, गदीगाईचे, काचा कवड्यांचे, मातीतले वेगवेगळे खेळ रंगायचे. भादव्याच्या उन्हात शेतातले मूग, चवळी, कुशीचे हुलगे, (आता बघायला पण मिळत नाहीत), काळा श्रावण, उडीद असली कडधान्ये प्रत्येकाच्या अंगणात वाळत असायची अन चैत्र-वैशाखाच्या उन्हात शेवया, पापड, कुरुड्या, वाळवण वाळायची अन वर्षभराची धनधान्ये डाळीसुद्धा चैताचं ऊन अंगावर घेत अंगणात पडायची! मग त्याला राखण बसायच्या निमित्ताने पुन्हा मैत्रिणीना बोलवून गजग्यांचे डाव मांडायचे.
दिवाळी जवळ आली की पावसाने पडलेले खड्डे मुरुमाने मुजवून सपाट करायचे शेणाने सारवून गुळगुळीत करायचे, चार आठ दिवसाला सडा टाकून ते गच्च लिपून टाकायचे मग दिवाळीला त्यावर पाच दिवस शेणाच्या गौळणी, पांडव घालायचे. मोठमोठ्या रंगीत रांगोळ्या घालायच्या. त्यावेळी संस्कार भारतीच्या रांगोळ्या नव्हत्या, ठिपक्यांच्या आखीव-रेखीव सुबक रांगोळ्या असायच्या. प्रत्येकाच्या अंगणातल्या गवळणी, रांगोळ्या बघत हिंडायचे. तिथंच बाजूला कोपऱ्यात मुलांचा मातीचा किल्ला,त्यावर उगवलेलं गच्च हिरवंगार हळीव अन त्यात लपलेले सैनिक! प्रत्येकाच्या अंगणातील किल्ल्याच्या कल्पना वेगळ्या. इतरांपेक्षा आपला किल्ला आकर्षक, वेगळा, देखणा करण्याची कोण चढाओढ! बांबूच्या काठीला निरनिराळे जिलेटीन कागदाचे, कार्डशीटचे आकाशकंदील अंगणात लटकायचे.
तिन्हीसांजेला गार वाऱ्याची झुळूक अंगावर घेत कधी ढगांचे आकार, रंग तर कधी आकाशात उडणारे पक्ष्यांचे थवे न्याहाळायचे. बगळ्यांच्या थव्याकडे हात उंचावून तळहाताकडे बोटं दुमडून नखांवर कवड्या मागायच्या अन एकमेकांना नखावरील ते पांढरे ठिपके दाखवायचे. “मला मिळाल्या कवड्या म्हणून!’ पाऊस पडायला लागला की ते थेंब झेलायला अंगणात पळायचे, कधी गारा वेचायच्या अन ग्लासमध्ये साठवून थंड थंड पाणी प्यायचं, किती मजेदार! ओलसर मातीत कोटी तयार करायची. भुताच्या, राक्षसाच्या, राजाराणीच्या, जादूच्या गोष्टीही अंगणातच रंगायच्या. जोपर्यंत घरातून दोन-तीन हाका ऐकू येत नाहीत तोपर्यंत तिथून हलायचेच नाही. रात्री स्वप्नात मग असलंच काहीतरी असायचं.
अशा या जिव्हाळ्याच्या अंगणाचा उल्लेख हिंदी मराठी सिनेमाच्या गाण्यात, प्रसंगात, कवितांत असायचाच!
ज्योती कलश झलके…
म्हणत सकाळी सडा टाकणारी अभिनेत्री असो की
मेरे अंगन मे तुम्हारा क्या काम है?
म्हणणारा अभिनेता असो की
अंगणात माझ्या कोण कोण येते? कावळा येतो की चिमणी येते?
असा प्रश्न विचारणारा कवी असो अंगण प्रत्येकाला प्रियच!
असे हे शेजाऱ्याशी, झाडाझुडपांशी, पशुपक्ष्यांशी नाते जोडणारे अंगण आता जीवनातून हद्दपार झालेय.आपल्या सीमा कम्पाउंड भिंतीने भक्कम करून आम्ही शेजार परका केलाय; मग असलेच अंगण तर ते एका छोट्याशा फरशीच्या चौकोनी तुकड्याइतके असते, त्याहून मोठे असेल तर ते गाडी ठेवण्यासाठी असते. पायाला माती चिकटू नये, घरातील चकचकीत फरशी घाण होऊ नये म्हणून अंगणातही चकचकीत फरशीच असते. पाइपने पाणी मारले की स्वच्छ! क्वचितच एखादे हिरवे रोप शोभेचे-त्यावर कुठली चिमणी न कुठला कावळा बाळाची सांडलेली भातशिते टिपायला येणार? अन् बाळगोपाळाच्या हसण्या खेळण्याचा आवाज तरी अंगणातून येणार?
अंगण स्मृतीच्या पटलावर नेहमीच रेंगाळत राहील अन् त्या समृद्ध बाल्याला पुन्हा पुन्हा मनाच्या अंगणात दुडुदुडु धावायला बोलवत राहील…
– सुचित्रा पवार