बाळूचा क्रिकेट हा अतिशय आवडीचा खेळ आणि तो खेळतोही छान. आज त्याने त्याच्या साठवलेल्या पैशातून क्रिकेटचं साहित्य आणण्यासाठी बाबांना विचारताच बाबांनी कुठलीही आडकाठी न करता झट की पट त्याला परवानगी तर दिलीच. बाजारात जाताना त्याच्याबरोबर शेजारच्याच चाळीत राहणारे त्याचे जीवाभावाचे मित्र राघव आणि सुमेधही त्याच्या सोबतीला होतेच.
ते नवीकोरी बॅट, बॉल आणि स्टम्स घेऊन घरी आले. बाळूने येताना आपली लाडकी बहीण शमिकाला पेरू खूप आवडतात म्हणून किलोभर पेरूही आणले. बाळूचे मित्र घरच्यांचा निरोप घेऊन निघणार तेवढ्यात आईने त्यांना थांबवले. त्यांची विचारपूस केली. थांबा रे मुलांनो, पेरू खाऊनच जा, असा आग्रह केला. मुलांनी भराभर फोडी उचलल्या. मीठ, मिरेजिरेपूड यांमुळे ‘पेरूची फोड लागली गोड’ असंच मुलांचं झालं.
पेरू खाता खाताच राघव बाळूच्या आईला म्हणाला, “अहो काकी, बाळू पेरूच्या गाडीवर पेरू घेत होता ना, तेव्हा तिथं काय झालं ठाऊक आहे? अहो, तिथं ना दोन मुलं पेरूचा भाव करत होती. एकमेकांना खाणाखुणाही करत होती. आम्हाला सुरुवातीला काही कळेना. मग एका मुलाने पेरूवाल्याचं लक्ष नाही असं पाहून पटकन एक पेरू उचलला आणि लगेच गुपचुपपणे तो त्याने त्याच्यासोबतच्या दुसऱ्या मुलाकडे दिला. त्या दुसऱ्या मुलाने तो पेरू झटकन स्वतःच्या खिशात लपवला. पेरूवाल्याच्या लक्षात येताच त्याने विचारले एकाला… खरं बोला तुमच्यापैकी पेरू कुणी चोरला, पेरू चोरणारा मुलगा म्हणाला, मजपाशी पेरू नाही. झडती घ्यावी माझी, जर शंका असेल काही. ज्याच्या खिशात पेरू तो सारखा सांगत होता, शप्पथ घेऊन सांगतो, मी पेरू चोरला नाही.’ बाळू लगेच म्हणाला, “आई, शब्दांच्या कसरती करून दोघे बोलत होते.
पेरू चोरून दुसऱ्याकडे देणारा… “माझ्याकडे पेरू नाही’, असंच सारखं म्हणत होता. तर पेरू खिशात लपवून ठेवणारा “मी पेरू चोरला नाही’, असाच कित्ता गिरवत होता.’ आई म्हणाली, अरे, त्या मुलांनी कितीही शब्दांच्या कसरती करून निरपराधी असल्याचा आव आणला तरी ते दोघेही प्रत्यक्षात मात्र अपराधीच आहेत. तुम्ही तिघे होता ना तिथे, मग तुम्ही समजवायचं ना त्या मुलांना.’ बाळू लगेच म्हणाला, “अगं आई, बोललो आम्ही त्या मुलांना. ‘अरे, कशाला खोटं बोलता, चोरी करताना पाहिलंय आम्ही तुम्हांला. सरळ कबूल करा आता. चोरी करणं हे वाईट आहे.’ तेव्हा कुठं खिशात लपवून ठेवलेला पेरू एकाने खिशातून काढून दिला. आता पेरूवाला चिडला. तो त्या मुलांना म्हणाला, “थांबा, तुम्हांला पोलिसांच्या ताब्यातच देतो. तेव्हाच तुम्ही वठणीवर याल.’ पेरू चोरणारा मुलगा लगेच तोंड वर करुन उलट म्हणाला कसा, “आम्ही काय एवढी मोठ्ठी चोरी केली काय? एक छोटासा पेरू तर चोरला.’ बाळूचं बोलणं ऐकून बाबांना चटकन काही आठवलं, ते मुलांना म्हणाले. “या प्रसंगावरून एक गोष्ट आठवली.’
‘एकदा एक पारधी, पक्षी पकडायला आला. दाणे पेरुन गुपचुपपणे, जाळे पसरून गेला. एक साळुंखी लपूनछपून, दाणे टिपायला आली, जाळ्यामध्ये अडकताच, पुरती घाबरून गेली. देवाकडे तिने लगेच, धावा सुरू केला. “एकच दाणा चोरला म्हणे, एवढी शिक्षा मला?’ देव म्हणाला तिला, “मनावर ताबा हवा. चोरी मोठी की छोटी, हा प्रश्नच कशाला हवा?’
आई म्हणाली, “अगदी खरंय, चोरी ती चोरीच. मग ती चोरी छोटी की मोठी हा प्रश्नच गौण आहे. बरं मग शेवटी काय झालं त्या मुलांचं?’ आईने असं विचारताच सुमेध म्हणाला, “अहो, काकी आम्ही मध्यस्थी केली म्हणून बरं. नाहीतर फेरीवाला त्यांच्या अंगावर धावलाच होता. पेरूवाल्याचे हात त्यांना मारण्यासाठी चांगलेच शिवशिवत होते. त्यांनी मुलावंर हात उगारताच पेरू चोरणारा मुलगा म्हणाला, ‘प्लीज, एक वेळ सोडून द्या आम्हाला. पुन्हा नाही चोरणार. दिवसभर उपाशी आहे हो हा माझा भाऊ. पैसे नाहीत आमच्याजवळ पेरू घेण्यासाठी म्हणून चोरी केली. पण आम्ही वचन देतो यापुढे चोरी कधीच करणार नाही.’
“त्या मुलांनी गयावया केली. मग बाळूने स्वतः एक किलो पेरू विकत घेऊन त्या मुलांना दिले. त्या मुलांनी बाळूचे आभार मानले. तुझ्यामुळेच आमची सुटका झाली असे म्हणाले.’ आई म्हणाली, “चांगलं केलंत. यानिमित्ताने त्या मुलांना सुधारण्याची एक संधी तर मिळाली. पण लक्षात ठेवा मुलांनो, आपल्याला देवाने जे दोन हात दिलेले आहेत ना, ते चोरी करण्यासाठी नाही तर सत्कृत्य करण्यासाठी दिलेले आहेत. याचा विसर कधीच पडून देऊ नका. ज्या हातांनी सुंदर चित्र रेखाटू शकता त्याच हातांनी सुंदर वास्तू उभारू शकता. भुकेलेल्याला घास भरवू शकता.
आपल्या रोजच्या जगण्यात आपण नेहमीच दीनदुबळ्यांना मदतीचा हात द्यावा. माणुसकी जपेल त्याला मनापासूनी हात जोडावा. ऊतू नये, कधी मातू नये, हात आखडूनी खर्च करावा. कष्ट करताना नेहमीच भरभर कामात आपला हात चालावा. चूक झाल्यास कबूल करावी, हात झटकून कधी ना बसावे. हातावर तुरी देईल त्याच्या मात्र, हात धुऊन पाठीस लागावे. संकट धावून आले तरी, हातपाय कधी गाळू नये. संकटाशी दोन हात करावे, संकटापुढे हात टेकू नये. दुसऱ्यांच्या कष्टावर आयता, हात कधीही मारू नये. हातापाया पडून लाचारीने कामाला दूर सारू नये. उगारण्यासाठी नाही बरं, उभारण्यासाठी आहेत हात. चांगले वागून, आपण जगावे, हीच आहे खरी बात.’
शमी पटकन म्हणाली, “अय्या, आई. चांगले वागून जगण्याचे तू आमच्या हाती जणू कंकणच बांधलेस. तुझ्या प्रत्येक वाक्यात तुझा ‘हात’ होता.’ बाळू म्हणाला, “हो आई, सहज बोलता बोलता तू हातावर केवढे वाक्प्रचार सांगितलेस.’ राघव म्हणाला, काकी ,आम्हाला आज मस्तच मेजवानी मिळाली.काकांच्या साळुंखीच्या गोष्टीने आम्हाला…. चोरी छोटी की मोठी हा प्रश्नच कशाला हवा? …हे अगदी सहज कळले.
एकनाथ आव्हाड