ती तशी दिसायला वाईट नव्हती. पण तिचा रंग सावळा होता, त्यापेक्षा गोरा नव्हता असं म्हणता येईल. सावळ्या रंगातही तिचं रूप उठून दिसायचं. जणू तिच्या त्या रूपासाठीच निसर्गानं तो खास रंग बनवला होता. तिच्या सावळ्या रंगाला थोडासा निळसर झाक होता. ती आपली घर आणि शाळा यात रमलेली. आईने सांगितलेली कामं करायची, घरात आवरायला मदत करायची, आणि स्वयंपाकात मदत करायची यात ती रमत होती. रोज शाळेत जायचं आणि संध्याकाळचा अभ्यास हा तिचा नित्यनेम.
पण सगळं चांगलं चाललेलं असताना दुधात मिठाचा खडा पडावा, तसं घडलं. त्याला ती कारणीभूत होती, की तिचं रूप की इतर कोणी हे नाही सांगता यायचं. पण चांगल्याला चिकटून वाईट येतं म्हणतात ना तसं ते घडलं. एक मुलगा काहीतरी कारण काढून तिच्याशी बोलायला बघायचा, पण तिला हे सगळं नको होतं म्हणून ती त्याच्याकडं अजिबात लक्ष देत नव्हती.
त्या दिवशी शाळा सुटली तशी ती तडक घरी निघाली. ती रमतगमत चालली होती, एकेक पाय आपटत दोन वेण्यांशी खेळत होती. तितक्यात… तितक्यात तो आला. हो तोच मुलगा जो तिच्या मागं लागला होता. तो तिच्यासमोरच येऊन उभा राहिला. त्यानं तिला सांगितलं, थांब घाबरू नकोस मी तुला काहीच करणार नाही. मी फक्त तुला एकच गोष्ट सांगायला आलोय. बाकी माझा काहीही हेतू नाही. असं म्हणत तो तिच्या थोडं जवळ आला नि म्हणाला, माझं तुझ्यावर प्रेम आहे.
तिची छाती जोरजोरात धडधडत होती. श्वास जोरात चालला होता. सगळं अंग थरथरत होतं. अचानक असा प्रसंग समोर उभा राहील, असं तिला कधीच वाटलं नव्हतं. काय करावं हेही तिला कळत नव्हतं. एखाद्या पुतळ्यासारखी ती स्तब्ध उभी होती. ती काहीच बोलत नाही हे पाहून तो आणखी पुढं आला, त्याने तिचा हात हलकेच हातात घेतला. नेमकं काय घडतंय हेच तिला कळत नव्हतं. तो म्हणाला, हे बघ, माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. तू वेळ घे, विचार कर आणि शांतपणे उत्तर दे. तुझा नकार असेल तरी माझी हरकत नाही. चल येतो मी, बाय, टेक केअर.
त्यापुढचे दोन दिवस पोटात दुखतंय असं सांगत ती घरीच राहिली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो तिच्या घराबाहेर घिरट्या मारताना तिला दिसला. त्याने काहीच केलं नाही, फक्त तिच्याकडं दोन चार मिनिटं बघत राहिला आणि निघून गेला. पंधरा वीस दिवसांनी त्याने शाळेच्या ग्राउंडवर तिला गाठलं. अगदी शांतपणे प्रेमाने विचारलं, काही विचार केलास का. तिने मानेनेच नकार दिला. तो म्हणाला चार दिवसांनी होळी आहे. तुमच्या घराजवळ मोठी होळी असते. मी तिथं येईन. तुझा होकार असेल तर तू त्या दिवशी तुझा निळ्या रंगाचा ड्रेस घालून ये. एकदम भारी दिसतेस तू त्या ड्रेसमध्ये.
चार दिवस चार युगांसारखे वाटत होते. एकेका क्षणात आख्खं जग फिरून आल्यासारखं तिला भासत होतं. तिलाही तो आवडायला लागला होता. कधी नव्हे ती आरशासमोर तासन् तास उभी राहू लागली होती. टिकली, लिपस्टीक, पावडर सगळं नीट लागलंय की नाही हे ती वारंवार बघू लागली. होळीच्या दिवशी ती निळ्या रंगाचा ड्रेस घालून तयार होती. आईसोबत ती आली तेव्हा होळी पेटायला अजून वेळ होता. तिची नजर भिरभरत होती, पण तो दिसत नव्हता. थोड्या वेळाने तो आला तशी तिच्या चेहऱ्यावर लाली पसरली. त्याच्याशी नजर भिडवायला ती लाजत होती. लाजतच तिने कोपऱ्यातून त्याच्याकडे बघितलं. त्यानेही तिच्याकडे हसून बघितलं. होळीच्या साक्षीने दोन मनांच्या एक होण्याचा सोहळा सुरू झाला होता.
त्यानंतर त्यांच्या भेटी होऊ लागल्या. दोन-पाच मिनटंच ती दोघं बोलायची, हातात हात घ्यायची आणि निघून जायची. दोघांना एकमेकांचा सहवास खूपच आवडत होता. दोन चार महिने गेले, पण त्यातही विघ्न आलंच. एक दिवस तिच्या वडिलांनी त्या दोघांना त्या निर्जन रस्त्यावर हातात हात घेऊन फिरताना बघितलं. वडिलांनी त्या मुलाला दम दिला आणि परत माझ्या मुलीकडं बघितलंस तर जीव घेईन, असा दम दिला. दोघांनी चोरून एकमेकांकडे बघितलं ते शेवटचंच. तो मुलगा खाली मान घालून निघून गेला.
फुलण्याआधीच कळी कोमेजून जावी तशी तिची गत झाली. तिचं कशातच लक्ष लागेना. तासन् तास ती बाहेर बघत बसून राहायची. काम करता करता कुठंतरी गुंग व्हायची. त्या घटनेला तीन वर्षं झाली होती. तिची रयाच बदलली होती. रात्री अपरात्री झोपेतून बडबडत उठायची. एकदा दुपारी आई झोपली असताना ती एकटीच त्या निर्जन रस्त्यावर गेली आणि स्वतःशीच बडबडत होती. तेव्हा भावाने तिला बघितलं आणि घरी आणलं.
कुणीतरी सांगितलं की तिला भूतबाधा झालीय. मग मांत्रिक-तांत्रिक झाले, बाबा-बुवा झाले, देवीची ओटी भरून झाली, पण काही फरक पडेना. अखेर हे फार मोठं प्रकरण आहे, ते लवकर घराबाहेर घालवा. नाहीतर ते तुमच्या सगळ्या खानदानासाठी घातक आहे, असं एका मोठ्या मांत्रिकानं सांगितलं.
पंधरा दिवस झाले ती त्या चौकात बसून राहायची. रात्री दुकानाच्या आडोशाला झोपायची. तिथं अंधारातच पालिकेच्या नळावर अंघोळ करायची आणि सकाळ झाली की परत चौकात येऊन बसायची ती सूर्य अस्ताला जाईपर्यंत. एक हॉटेलवाला भिकाऱ्यांना तिन्ही वेळ खायला द्यायचा. त्यांच्यात जाऊन ती बसायची.
एक दिवस संस्थेचे कार्यकर्ते आले, ते म्हणाले आमच्यासोबत चल तिथं सगळी सोय आहे, अनेक जण आहेत तुझ्यासारखे, आम्ही तुला सांभाळू. ती म्हणाली, मी नाही येऊ शकत, कारण माझा भाऊ मला इथं सोडून गेलाय. दुकानातून काहीतरी जिन्नस घेऊन येतो सांगून गेलाय. तो नक्की येईल. तिच्या डोळ्यात भाऊ परत येईल अशी वेडी निष्फळ आशा दिसत होती.
– बी. चंद्रदास