सकाळी सकाळी वर्तमान पत्र हातात घेतलं की महिलांची होणारी फसवणूक, त्यांचा होणारा छळ, अत्याचार हे सगळं वाचून मनाला फार त्रास होतो म्हणून, आज लिहावसं वाटलं. बऱ्याचदा असं बघितलं गेलय की स्त्रीला गृहीत धरलं जातं. आताच्या भाषेत म्हणाल तर “टेकन फॉर ग्रॅंटेड’ मग ती कोणीही असो मुलगी, प्रेयसी, बहीण, बायको, मैत्रीण किंवा आई. पण तिला कायम गृहीतच का धरायचं? तिचे तिला स्वतःच असं काही स्थान नाही का? तिचं महत्त्व नाही का? असे प्रश्न नेहेमी पडतात.
अनेक अशा भयानक बातम्या वाचल्या किंवा ऐकल्या तरी असं वाटतं की आज आपण 2023 मध्ये प्रगती पथावर असूनही स्त्रीच्या बाबतीत मागे का? तिचं महत्त्व, तिचं वेगळं अस्तित्व का समजून घेत नाही? समाजातलं तिचं महत्त्वाचं स्थान खऱ्या अर्थाने तिच्या वाट्याला कधी येणार आहे?
स्त्रीला प्रेम करण्याचा आणि तो नाकारण्याचा अधिकार आहे; पण तरीही आज किती तरी मुली, स्त्रिया भोगतायत, त्यांच्यावर अत्याचार होतायत… हे सगळं कधी थांबणार? सतत तिने घाबरत, कोणाच्या तरी दबावाखाली आणि प्रत्येक गोष्टीसाठी राहायचे का?
खऱ्या अर्थाने स्त्री मुक्त कधी होणार? नवरात्रात आणि जागतिक महिला दिनाच्या दिवशी मात्र स्त्रीच्या बाबतीत बोललं जातं तिच्या आरोग्याची काळजी, तिच्या अस्तित्वाच महत्त्व सांगितलं जातं; पण हे सगळं फक्त तेव्हाच नसतं… हे समाजाला कधी समजणार?
खरंतर स्त्रीमुळेच घर-संसार चालतो, घराला घरपणही देते, ती एक स्त्रीच असते. वडिलांवर प्रेम करते तीही मुलगीच असते हेही खरं.
अनेक वेळा समाज माध्यमांवर स्त्रीबद्दल बोललं जातं; पण वस्तुस्थिती खूपच वेगळी आहे. सुधारणा कुठेच दिसत नाही.
एका मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही तोच बुरसटलेला आहे. ती एक वापराची वस्तू नाही हे कधी कळणार? मनात येईल तेव्हा असा तिच्या बद्दल झालेला समज कधी दूर होईल? स्त्रीच्या मनातल्या भावना, तिची जिद्द, तिचं आयुष्य, तिला तिच्या मनाप्रमाणे जगायला कधी मिळेल?
नुसतं शिक्षण घेऊन उपयोग नाही, तर यासाठी समाजाची मानसिकता बदलायला हवी. समाजात स्त्री बद्दल आदर वाढायला हवा.
स्त्री जन्मदाती असूनसुद्धा तिला आदराने वागावले जात नाही असे, दिसते. अनेकवेळा तिच्या सहनशीलतेची समाजात परीक्षाच बघितली जाते.
स्त्रीशक्तीचा जागर हा नक्कीच झाला पाहिजे, कारण माझ्या मते ती एक मल्टी-टास्कर आहे आणि म्हणूनच स्त्रीचा मान, सन्मान, अधिकार हा मोठा आहे. स्त्रीमुळे घराला घरपण येते तिच्यामुळेच नात्यांत जिवंतपणा असतो. हे मान्य करायला हव. आपण देवीची आरती म्हणतो तेव्हा मला जाणवतं की एका स्त्रीमध्ये वात्सल्य, मातृत्व, कर्तृत्व, मांगल्य, कौशल्य आणि अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य असते.
स्त्रीच्या कल्पनाशक्तीला, तिच्या धैर्याला आणि अनेक अशा अडथळ्यांना सामोरे जाऊन, आपली भूमिका, जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने साकारण्याऱ्या सगळ्या स्त्रियांना माझा सलाम आहे.
प्रत्येकाच्या जीवनात, प्रत्येकाच्या यशात स्त्रीचा सिंहाचा वाटा असतो हे कायमच लक्षात ठेवले पाहिजे. असेन मी, नसेन मी, तरी असेल… गीत हे फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे… ह्या शांता शेळके यांच्या ओळी मला त्यामुळेच खूप भावतात.
– अवंती लोहकरे