एक होता कोंबडा. मोठा ऐटबाज होता तो! त्याचा रंग लाल होता आणि तुरा होता लालबुंद. म्हणून त्याला सगळे “लाल्या’ म्हणायचे. लाल्या फार हुशार होता. त्याला झोपायला, लोळायला मुळीच आवडायचे नाही. सारखे आपला काही ना काही काम करीत असायचा. सकाळी लवकर उठून बांग द्यायचा. एकदा मोठ्यांदा सगळ्यांना आवाज द्यायचा, “उठा रे, सकाळ झाली. चला, उठा, कामाला लागा.’ त्याचं हे आरवणं ऐकलं की, सगळे आपापली झोप सोडून आळोखेपिळोखे देत जागे व्हायचे.
एकदा काय झालं, लाल्या आपलं खाणं शोधण्यासाठी एका रानात गेला. तिथे त्याला गव्हाचं पीक आलेलं दिसलं. त्यानं सहज गव्हाची एक लोंबी तोडली आणि त्यातले गहू खाऊन पाहिले… तर काय? त्याला ती चव भलतीच आवडली. आतापर्यंत दररोज तो गावातल्या घरांच्या आसपास फिरून त्यातले धान्यधुन्य वेचून खात असे. पण हे गहू एकदम ताजे आणि चवदार होते. त्याला वाटलं, हे असे रुचकर गहू आपल्याला रोज खायला मिळाले तर काय मजा येईल! तेवढ्यात त्या रानाचा मालक तिथे आला आणि त्याने त्या कोंबड्याला हाकलले.
लाल्याने दोन-तीन गव्हाच्या मोठ्याशा लोंब्या तोंडात धरल्या आणि तिथून त्यानं पळ काढला. घरी आल्यावर त्याला वाटलं, आणलेले सारे गहू खाल्ले तर ते संपून जातील. त्यापेक्षा त्या शेतकऱ्यासारखे आपण हे गहू पेरले तर? तो छान छोटा खड्डा करतो. त्यात ते गहू घालतो. वरून थोडी माती पसरतो. थोडं पाणी शिंपडतो. दोन-तीन दिवसांनी गव्हाला अंकुर फुटतात. लाल्याची मित्रमंडळी त्याचा हा सारा उद्योग बघत असतात. सगळे त्याची टिंगल करतात. म्हणतात, “आपल्याला रोज आयतं खायला मिळत असताना एवढे कष्ट कशाला घ्यायचे? वेडाच आहे हा लाल्या!’
लाल्या कुणाकडे लक्ष देत नाही. रोज थोडंथोडं पाणी त्या रोपांना घातल्यावर रोपं मोठी होऊ लागतात. असं बरेच दिवस चाललेलं असतं. लाल्या बाकीच्यांबरोबर रोज खायला शेजारच्या परिसरात जातच असतो पण त्याने लावलेल्या गव्हाच्या रोपांकडेही त्याचं चांगलं लक्ष असतं. मधूनच त्याचे मित्र त्याला चिडवायचे, “काय रे, कधी येणार तुझे गहू त्या रोपांना? नुसतं गवतच वाढताना दिसतंय.’ पण लाल्याला माहीत होतं, एक दिवस याला नक्की गहू लागतील.
एक दिवस रोजच्यासारखा सकाळी कोंबडा उठतो. पंख फडफडवून आळस झटकतो आणि छान मोठ्यांदा आरवतो. मग रोजच्यासारखा आधी तो आपल्या गव्हाच्या चिमुकल्या शेताकडे जातो. पाहतो तर काय? त्या रोपांना छान गव्हाच्या कोवळ्या लोंब्या लोंबत असतात. लाल्या फार खूश होतो. तो आणखी एकदा मोठ्यांदा ओरडतो, “कुकू।।।च कू।’ आनंदानं तो नाचतोदेखील. मग नेहमीप्रमाणे त्या सगळ्या रोपांना तो पाणी देतो आणि आपला चारा शोधायला बाहेर पडतो.
काही दिवसांनंतर गव्हाचा दाणा चांगला भरू लागतो. उन्हामध्ये ते गवत चमकायचं, रोपं डोलायची… लाल्याला त्याचा भारी आनंद व्हायचा. त्याच्या मित्रांचाही त्या गव्हांवर डोळा होताच. रोपांवर भरपूर लोंब्या आणि त्यांमध्ये चांगले टप्पोरे दाणे दिसू लागल्यावर लाल्याला वाटलं, आता हे गहू काढून घ्यायला हवेत. तेवढ्यात त्याचे सारे मित्र जमा होतात आणि म्हणतात, “अरे वा, लाल्या, तुझ्या रोपांना चांगलेच गहू आले की रे! चला, आपण सगळ्यांनी त्याच्यावर आता मस्त ताव मारू यात.’
ते गहू इतके आकर्षक दिसत होते की, सगळ्यांना असं वाटत होतं, कधी आपण त्या लोंब्या तोडतोय आणि त्यातले मस्त टपोरे गहू काढून खातोय. ते पुढे होणार तितक्यात लाल्या त्यांच्यासमोर उभा राहिला. म्हणाला, “मी दाणे आणले, पेरले, रोपं वाढवली; तेव्हा तुम्ही कुणी आलात का मदतीला? उलट माझी टिंगल करत होतात.’
मित्र गडबडीनं म्हणाले, “आता ते जाऊ दे. तू एकटा थोडाच खाणार आहेस सगळे गहू? आम्हालापण दे ना थोडेथोडे.’ सगळे त्याला लाडीगोडी लावू लागले. पण लाल्या हुशार होता. तो म्हणाला, “हे सगळे गहू मी खाणार नाहीचंय.’
“मग काय करणार एवढ्या गव्हाचं?’ बाकीच्यांनी आश्चर्यानं विचारलं.
“मला आत्ता जेवढी भूक आहे, तेवढे गहू मी खाणार. बाकीचे पुन्हा पेरणार. तुम्हाला मी एकेक लोंबी देतो. त्याचे दाणे तुम्ही पेरा. रोपं वाढवा आणि तुमचे तुम्ही गहू खा. आपण सगळेजण आपापल्या कष्टाचे गहू खाऊयात.’ यावर बाकीचे काय बोलणार!
मग प्रत्येकाला लाल्यानं मोठ्या प्रेमानं चवदार गव्हाची एकेक लोंबी दिली. देताना म्हणायचा, “खा नाहीतर पेरा. तुमची मर्जी!’ बाकीचे गहू मात्र रोपं लावण्यासाठी त्यानं नीट सांभाळून ठेवले. असा होता आपला कष्टाळू कोंबडा! त्यानं साऱ्यांनाच कष्ट करायला शिकवलं. स्वावलंबी बनवलं.
– माधुरी तळवलकर