कतारमध्ये यंदाची फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा अत्यंत यशस्वीपणे पार पडली. या स्पर्धेत कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे भारतही जोडला गेला होता. प्रत्यक्ष स्पर्धेत आपला सहभाग नसला तरीही चाहत्यांचा जल्लोष, त्यांनी केलेल्या अनोख्या गोष्टी किंवा विजेतपदाच्या करंडकाचे भारताची प्रख्यात अभिनेत्री दीपिका पदुकोन हिच्या हस्ते झालेले अनावरण यामुळे भारतातही या स्पर्धेची बूम होती. आता प्रश्न असा निर्माण होतो की आपला संघ या स्पर्धेत कधी खेळणार का? या खेळाची भारतातील दशा, दिशा व प्रगती यावर आता
चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत.
फिफा म्हणजेच जागतिक फुटबॉल महासंघ, त्यांनी त्यांच्या क्रमवारीत निश्चित केलेले पहिले 32 संघ ही स्पर्धा खेळतात. मात्र, त्यापूर्वी पात्रता स्पर्धाही असते. परंतु इतकी वर्षे होऊनही भारतीय संघाला काही या स्पर्धेत सहभागी होता आले नाही. नावाजलेले आंतरराष्ट्रीय खेळाडू आपल्याकडे नाहीत असे नाही; पण तरीही आपण या स्पर्धेसाठी पात्र होत नाही. अर्थात याचीही बरीच कारणे आहेत त्याचाच उहापोह करण्याचा हा प्रयत्न.
इतिहास आहे; पण विस्मृतीतच
जागतिक स्तरावर जेव्हापासून फुटबॉलचा खेळ व त्यानंतर विश्वकरंडक स्पर्धा सुरू झाली तीच ऐतिहासिक परंपरा भारतातही होती. इंग्रजांमुळे म्हणा किंवा युरोपीय देशांतील लोकांमुळे म्हणा आपल्याकडेही हा खेळ खूप पूर्वीच दाखल झाला होता. 1854 साली कोलकाता सिव्हिलीयन क्लब व बराकपूर जन्टलमन या संघात पहिला सामना खेळला गेला होता. त्यातही हा खेळ इंग्रजांनीच भारतीय उपखंडात आणला. कोलकाताच्या याच क्लबला 1972 साली कोलकाता एफसी असे नावही देण्यात आले. त्यानंतर काही काळातच डलहौसी, ट्रेडर व नेवल क्लबही स्थापन झाले. मात्र, त्यानंतरही हा खेळ पुढील काळात देशात म्हणावा तसा रुजला नाही. याच कोलकाता शहराला भारताच्या फुटबॉलची राजधानी म्हणून संबोधले जाऊ लागले. येथेच 1889 साली मोहन बगानची पाळेमुळे रोवली गेली. आज हाच क्लब जगभरात प्रसिद्ध आहे तो या खेळातील त्यांनी केलेल्या प्रगतीमुळे.
फिफाची स्थापनाही झाली नव्हती तेव्हापासून कोलकाता एफसी अस्तित्वात होता हेही विशेष. पण तरीही या देशात फुटबॉलपेक्षा क्रिकेटला जास्त लोकप्रियता लाभली. ब्रिटिशांनी भारतात आणलेले हो दोन्ही खेळ लोकप्रिय असले तरीही क्रिकेटच तळागाळापर्यंत रुजले. अर्थात त्याची कारणेही आहेत. आपल्याकडे क्रिकेट का रुजले कारण आपण त्यात कामगिरी सिद्ध केली. त्यातच 1983 साली एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा जिंकली व क्रिकेटमध्ये पैसा आहे हे लक्षात आल्यावर बीसीसीआयने त्याचे व्यावसायिकतेने मार्केटिंग केले व आज जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ म्हणून बीसीसीआयचेच नाव घेतले जाते. पण फुटबॉलचे मार्केटिंग झाले नाही व हा खेळ भारतात मागासच राहिला ही वस्तुस्थिती आहे. 1893 साली भारतीय फुटबॉल महासंघाची स्थापना झाली. जे कारण त्यावेळच्या क्रिकेटची प्रगती न होण्याचे सांगितले जाते तेच कारण फुटबॉलबाबतही लागू पडते. हे कारण म्हणजे पैसा. आता पैसेच नसतील तर दशा होते, दिशा चुकते व प्रगतीही साध्य होत नाही, हेच खरे.
इतिहास डुरॅंड करंडकाचा
कोलकाता एफसी, मोहन बगान यांच्यासह अनेक क्लब उदयाला आले व सिमला येथे देशातील पहिली फुटबॉल स्पर्धा खेळवली गेली. सर मोर्तिमर डुरॅंड यांनी या स्पर्धेचा पाया रचला व आज त्यांच्याच नावाने ही स्पर्धा केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. यातूनच पुढे 1911 साली मोहन बगान संघाने पहिली स्पर्धा जिंकली. आयएफए करंडक स्पर्धा जिंकत मोहन बगान संघाने इतिहास रचला. कारण तोपर्यंत या स्पर्धेत दरवेळी ब्रिटीश संघच विजेते ठरले होते. त्यानंतर 1937 साली फिफाच्या मान्यतेने भारतीय फुटबॉल महासंघाला (एआयएफए) मान्यता देण्यात आली. यातूनच 1954 साली भारतीय संघटनेने अन्य आशियाई देशांच्या मदतीने आशिया फुटबॉल महासंघाची स्थापनाही केली.
सुवर्णकाळ
1951 ते 1962 हा काळ भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ मानला जातो. दरवर्षी भारतीय फुटबॉलने प्रगती साध्य केली. भारताच्या फुटबॉल संघाने 1951 व 1962 या दोन साली आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली व इतिहास रचला. या दोन स्पर्धा अनुक्रमे राजधानी दिल्ली व जकार्तामध्ये झाल्या होत्या. ही कामगिरीही झाकोळली गेली असा विक्रम भारतीय फुटबॉल संघाने केला. 1956 साली मेलबर्न ऑलिम्पिक स्पर्धेत भारत हा पहिलाच आशियाई देश ठरला होता की ज्या संघाने या मोठ्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. 1960 सालानंतर देशभरात फुटबॉललाही लोकप्रियता लाभू लागली. त्याचे प्रमाण कमी असले तरीही हीच नवी आशा होती की, आपल्या देशातही फुटबॉलची संस्कृती रुजेल, वाढेल.
आजच्या चित्राबाबत बोलायचे तर त्याची पाळेमुळे जरी 1960 सालच्या दशकात रुजली तरीही आतापर्यंत भारतीय फुटबॉल संघाने आपली ओळख निर्माण केली व आता आपल्या खेळाडूंनाही जगभरात आदर मिळताना दिसतो. 2007 साली नेहरू करंडक, 2008 साली एफसी चॅलेंज करंडक या स्पर्धा भारताने जिंकल्या व आपणही या खेळात कुठे कमी नाही हे सिद्ध केले. त्यानंतर 2011 साली आपला संघ एशियन गेम्सलाही पात्र ठरला. मात्र, जगाच्या लक्षात येण्यासाठी आपल्या संघाने यानंतरच्या काळात सातत्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमक दाखवली तरच आपण विश्वकरंडकात खेळण्याचे स्वप्न पाहू शकतो.
महिला फुटबॉलची स्थिती
भारतातील महिला फुटबॉलचे चित्र भारतातील महिलांच्या क्रिकेटपेक्षा काही वेगळे नव्हते. महिलांच्या फुटबॉलचे व्यवस्थापन भारतीय महिला फुटबॉल फेडरेशनतर्फे केले जाते. त्यानंतर 1990 साली त्याला भारतीय फुटबॉल महासंघाने आपल्या छत्रछायेखाली घेतले व तेव्हापासून जरा महिला फुटबॉलला सुगीचे दिवस आल्याचे दिसते. 2000-2001 साली इस्ट बंगाल व मोहन बगान क्लबने त्यांचे महिला संघही तयार केले. तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महिला गटाच्या स्पर्धाही सुरू झाल्या व खेळाडूंना मोठे व्यासपीठही मिळाले. भारतात महिलांच्या क्रिकेटकडे जसे विनोदाने पाहिले जायचे किंवा सरळ दुर्लक्षच केले जायचे तेच चित्र अद्याप आपल्या महिला फुटबॉलचे आहे यात शंका नाही.
भूतिया व छेत्रीपासून प्रेरणा घ्या
भारतीय फुटबॉलची एकेकाळी दशा होती, तसेच दिशाही चुकत होती कारण ज्यांना या खेळातील काहीही कळत नाही तेच या संघटनांचे सर्वेसर्वा बनले होते. खेळाच्या संघटनेवर खेळाडूच हवा हे भारतीय ऑलिम्पिक संघटनेने सिद्द केले व पायोली एक्स्प्रेस पी. टी. उषा यांची नियुक्ती झाली. आता तर काय अनेक खेळांच्या संघटनांवर खेळाडूच पदाधिकारी म्हणून विराजमान असल्याने येत्या काळात आपण क्रीडा क्षेत्रात आणखी यश मिळवू असा विश्वासही वाटतो. आपल्याकडे पेले, मॅराडोना, लिओनेल मेस्सी किंवा ख्रिस्तियानो रोनाल्डो असे महान खेळाडू नाहीत म्हणून देशातील मुला-मुलींना प्रेरणा मिळत नाही अशी वक्तव्येही केली गेली.
मात्र, आपल्याच देशात बायचुंग भूतिया व सुनील छेत्रीसारखे महान खेळाडू जन्माला आले व त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विक्रमांचे इमले रचून इतिहासही घडवला. मात्र, या दोन नावांच्या पुढे आपण अद्याप गेलेलो नाही. हे दोन खेळाडू जर कोणत्या अन्य देशात जन्माला आले असते तर मेस्सी किंवा रोनाल्डोपेक्षाही जास्त लोकप्रिय झाले असते. मेस्सी काय किंवा रोनाल्डो काय त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत केलेले गोल व त्याची संख्या पाहिली तर भूतिया व छेत्री कुठेही कमी नाहीत. उलट छेत्रीने तर या दोन खेळाडूंनाही आव्हान दिले होते. या दोन नावांतच आपल्या फुटबॉलची यादी संपत असली तरीही त्यांच्याकडून प्रेरणा घेत आपल्या देशातील नवोदितांनी जग जिंकावे अशी अपेक्षा आहे.
मार्केटिंगही हवे
भारतात फुटबॉल, क्रिकेट हे दोन्ही खेळ ब्रिटिशांनीच आणले मात्र, क्रिकेट प्रचंड लोकप्रिय झाले व फुटबॉलला अद्याप ती उंची गाठता आलेली नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मार्केटिंग. बीसीसीआय याच बाबतीत जगभरात पुढे आहे तर फुटबॉल संघटनेला फुटबॉलचे तसेच आपल्या खेळाडूंचे मार्केटिंग कधी जमलेच नाही. इतकी मोठी लोकसंख्या हेच आपले बलस्थान आहे हे बीसीसीआयने ओळखले. आता भारतीय फुटबॉल संघटनेनेही जर योग्य मार्केटिंग केले तरच चित्र बदललेले दिसेल. क्रिकेटमध्ये अनेक महान खेळाडूंची कारकीर्द बीसीसीआयकडे पैसा नसतानाच संपली. त्यानंतर मात्र, सुनील गावसकर यांच्यापासून कपिल देव, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुलीपासून ते आताच्या विराट कोहलीपर्यंत प्रत्येक दशकात असे खेळाडू पुढे आले की त्यांनी जागतिक क्रिकेटची समीकरणेच बदलून टाकली.
त्याच्या जोडीला बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्यासह अनेकांची दूरदृष्टी यशस्वी ठरली व आपण जागतिक क्रिकेटची आर्थिक महासत्ता बनलो. आता असेच मार्केटिंग व प्रचंड पैसा मिळवून देत असलेल्या आयपीएलसारख्या स्पर्धा भारतीय फुटबॉलमध्येही झाल्या पाहिजेत तरच हे चित्र बदलेल. आपल्याला जर 2032 सालच्या फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत पात्र होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर आतापासूनच त्यासाठी योजनाही राबवली गेली पाहिजे. नाही म्हणायला इंडियन सुपर लीग फुटबॉल सुरू झाले; पण त्यातून फारसे काही हाती लागले नाही. त्यामुळेच प्रगती साधून दशा व दिशा बदलायची असेल तर त्याचे व्यावसायिकपणे मार्केटिंग करणेही काळाची गरज आहे हे विसरता कामा नये.
अमित डोंगरे