एका समारंभात एका लेखिकेची भेट झाली असता मी तिला म्हटलं, “तुमचे लेख खूप माहितीपूर्ण असतात आणि तुमची लेखनशैलीही छान आहे. तुम्ही कथा किंवा कादंबरी का लिहीत नाही?’
“अहो, मला लिहावीशी वाटते, पण-पण मी कधीच लिहिली नाहीये हो!’ मला हसू आलं आणि एक इंग्रजी म्हण आठवली: देअर्स अ फर्स्ट टाइम फॉर एव्हरीथिंग. कुठल्याही गोष्टीला पहिली वेळ असतेच! म्हणजेच पहिल्यांदा प्रयत्न केल्याशिवाय कुठलीही गोष्ट कशी साध्य करता येईल? पाण्यात पडल्याशिवाय पोहता येईल का? त्यासाठी पाण्यात उडी ही घेतलीच पाहिजे.
पहिल्यांदाच माता होऊ घातलेल्या स्त्रीला पहिलटकरीण असं म्हणतात. पूर्वी अशा स्त्रीला घरातील/नात्यातील इतर ज्येष्ठ स्त्रिया खूप काही सांगत असत. आता या खऱ्या/खोट्या कानावर सतत पडणाऱ्या गोष्टींमुळे त्या बिचाऱ्या स्त्रीला खूप टेन्शन येत असेल असं मला वाटतं. असंच काहीसं कुठलंही नवीन कार्य हातात घेत असलेल्या व्यक्तीला होत असावं.
मला माझ्या कार्यकालात असा अनुभव अनेकदा आला आहे. “हे काम तू हाती घेतलंयस् खरं. पण आपल्याला ते जमेल याचा नीट विचार केलायस का?’ असं सांगणाऱ्या अनेक व्यक्ती भेटल्या. आणि गंमत अशी की असं सांगणाऱ्या बहुतेक मंडळींनाही नवीन कामाचा काही अनुभव नव्हताच! फुकटचा उपदेश करणाऱ्या/सल्ला देणाऱ्या व्यक्ती बऱ्याचदा नामोहरम करणाऱ्या असतात.
अर्थात अनेकदा पहिला प्रयत्न करणाऱ्यापेक्षा त्याच्यानंतर ते काम हाती घेणारे जास्त यशस्वी होतात असं आढळून आलं आहे. याचं कारण म्हणजे पहिल्या प्रयत्नामधील त्रुटी समजल्यावर नंतरच्या प्रयत्नात सुधारणा करायला जास्त वाव मिळत असावा. असे मागून येऊन पुढे जाणारे खूप वेळा अधिक यशस्वी झाले आहेत.
असेंब्ली लाइनवर एकामागोमाग एक असं सतत मोटारगाड्यांचं उत्पादन सर्वप्रथम फोर्ड कंपनीच्या हेन्री फोर्ड यानं सुरू केलं, पण नंतर याच पद्धतीचा वापर करून जनरल मोटर्स ही कंपनी पुढे गेली आणि पहिल्या क्रमांकावर आली! नोकिया कंपनीनं संशोधन करून आणि अविश्रांत परिश्रम करून पहिला मोबाईल फोन बाजारात आणला. मात्र आता या कंपनीचं नावही फारसं कुठे दिसत नाही.
ऍपल, सॅमसंग आणि इतर कंपन्या नोकियाच्या खूप पुढे गेल्या. ईस्टमन कोडॅक कंपनीनं प्रथम डिजिटल फोटोग्राफीचा शोध लावून तसा इलेक्ट्रॉनिक कॅमेरा बाजारात आणला, पण तो त्यांना यशस्वी करता आला नाही. काही वर्षांनी इलेक्ट्रॉनिक कॅमेऱ्यांनी जग व्यापून टाकलं; पण कोडॅक कंपनीचं मात्र दिवाळं निघालं! राज्य मिळवणं सोपं असतं, पण टिकवून ठेवणं अवघड असतं, असं म्हटलं जातं, तेच या उदाहरणांनी अधोरेखित होत नाही का?
असं असलं तरी पहिल्या प्रयत्नालाही महत्त्व आहेच, कारण असा प्रयत्न जर कुणी केला नाही तर त्यामध्ये सुधारणा तरी कशी होणार? मला इथे भगवद्गीतेतल्या कर्मण्येवाधिकारस्ते या सुप्रसिद्ध श्लोकाचा दुसरा चरण आठवतो. तो असा आहे:
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सो स्त्वकर्मणि।।
म्हणजे फळ मिळेल अशी खात्री नाही, तर मग कर्मच कशाला करा, असा विचारही अयोग्य आहे. प्रयत्न हा केलाच पाहिजे. कदाचित आपला प्रयत्न अयशस्वी झाला तरी यातून धडा घेऊन दुसऱ्या कुणाचा तरी प्रयत्न यशस्वी होऊ शकतो हे मनात बिंबवलं पाहिजे.
पहिल्या प्रयत्नात यशस्वी झालेली अनेक उदाहरणं आहेत. सर्वात ठळक उदाहरण म्हणजे भारताच्या इस्रो या अंतराळ संस्थेनं आपल्या पहिल्याच मंगळयान-1 या मोहिमेत यश मिळवलं. यात इस्रोच्या शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ चमूचं अभिनंदनच केलं पाहिजे. पहिलीच वेळ आहे, आता कसं होणार, असं म्हणत ते हात पाय गाळत बसले नाहीत.
थोडक्यात, पहिलीच वेळ आहे म्हणून चिंतित होऊ नये आणि खूप लोकांनी आधी हे केलं आहे, कशाला आपण प्रयत्न करायचा असं म्हणूनही प्रयत्न टाळू नये! एव्हरेस्ट शिखर शेर्पा तेन्झिंग आणि एडमंड हिलरी यांनी सर्वप्रथम पादाक्रांत केलं असलं तरी आजवर सहा हजारांवर लोकांनी या शिखरावर यशस्वी चढाई केली आहे!
– श्रीनिवास शारंगपाणी