कालिदास यांनी आपल्या “ऋतुसंहारात’ याच्या रंगाचे बहारदार वर्णन केले आहे. कधी काळी त्याच्या फुलांपासून केलेल्या रंगात वस्त्रे रंगवत असत, ‘आपुला ठावो न सांडिता’ प्रेम कसे करावे; तर ज्ञानेश्वर म्हणतात, कुमुदिनीसारखे. यात कुमुदिनी प्रेयसी आहे, तर चंद्र प्रियकर. कुमुदिनी म्हणजे कुठल्याही अर्थाने ‘कमळ’ नाही.
कुमुदिनी म्हणजे वॉटर लिली. फेब्रुवारीत जलाशयात ती हमखास फुललेली दिसेल. लाल-गुलाबी, पांढरीशुभ्र, पिवळी आणि निळसर जांभळी. विविध रंगांत बहरलेली कुमुदिनी भले कमळ नसेल, पण फुलं प्रमुदित करणारी आहेत. कोकणात अनेक देवळांच्या बाहेर ‘कमळ’ समजून ती विकायला ठेवलेली असतात. कुमुदिनी वेगळी तशी कुमुदही वेगळी. कुमुद हिवाळ्यात फुलणारी, तर कुमुदिनी फेब्रुवारीत फुलणारी आहे. श्री ज्ञानेश्वरांना हे सगळे बारकाईने माहिती होते. त्यांचे निसर्गभान चकित करणारे आहे.
आयुर्वेदाच्या अभ्यासकांचे असे म्हणणे असते की, आपला सह्याद्री पर्वत म्हणजे औषधी वनस्पतींचा प्रचंड मोठा कोशच आहे. फेब्रुवारीत तिथे हमखास सापडणारे फूल म्हणजे धायटीचे फूल. धायटीचे शास्त्रीय नाव वुडफोर्डिया फ्लोरिबंडा असून सुमारे 20 सेंमी उंचीचे हे झुडूप सह्याद्रीसह महाबळेश्वर, कोकण, कारवार या भागात आढळते. फुले असंख्य, लहान, गर्द शेंदरी रंगाची असून फुलांपासून रंग मिळतो; तो ‘आसवा’त घालतात. त्यामुळे आसवांना लाल रंग प्राप्त होतो. फुलांत कषाय आम्ले असतात, त्यांतून तांबडे पिवळे रंगद्रव्य निघते. फुलांचे चूर्ण व्रणरोधक म्हणून वापरतात. वाळलेल्या फुलांचा उपयोग रक्तीआव, अतिसार आणि अनार्तव या विकारांवर औषध म्हणून करतात. धायटीची फुलं म्हणजे इंचभर लांबीची केशरी रंगाची जणू नळीच असते. त्याच्यामध्ये निसर्गाने साखरेसारखा गोडवा भरलेला असतो. आयुर्वेदातील पातळ औषधांना ‘आरिष्ट’ आणि ‘आसव’ असा शेवट असणारी नावं असतात ना, त्यांत ही धायटीची फुलं मोठ्या प्रमाणात वापरतात.
फुलपाखरांचा एक चांगला कोश मराठीत तयार होत असल्याचे वाचले. काळ्या रंगाच्या कॉमन क्रो या फुलपाखराचं छायाचित्रही त्या लेखात होतं. हे फुलपाखरू सह्याद्री परिसरात आढळणाऱ्या घागरीच्या फुलांचं परागसिंचन करतं. पिवळ्या रंगाचं हे फूल आकारानं वैशिष्ट्यपूर्ण असतं. दोन छोट्या पाकळ्या आणि तिसऱ्या पाकळीनं पक्ष्याच्या चोचीचा आकार धारण केलेला असतो. त्यात असलेलं अल्कलाईड कॉमन क्रोसारख्या फुलपाखराला आकर्षित करतं. आगामी फुलपाखरू कोशात घागरीचे वनस्पतीशास्त्रीय नाव मिळेल, अशी अपेक्षा आहे. घागरी हे बोलीभाषेतलं नाव आहे.
पिवळा टॅबूबिया ऊर्फ गोल्डन बेल नावाचे झाड आपल्याकडे बागांमध्ये मोठ्या प्रमाणात लावलेले दिसते. डिसेंबर-जानेवारीत शिशिराच्या कडाक्यात निष्पर्ण झालेली ही झाडे फेब्रुवारीमध्ये बेसुमार बहरतात. पिवळ्याधम्म सुवर्णकांतीच्या फुलांनी हे झाड बहरते, तेव्हा त्याच्यावर नुसती फुलेच फुले असतात. त्याच्याविषयी ‘बहर’ पुस्तकात भरभरून लिहिताना डॉ. श्रीश क्षीरसागर म्हणतात- पिवळ्याधमक फुलांनी अक्षरशः निथळणारं झाड नजरबंदी करून सोडतं. फुलं 4 ते 6 सेंमी आकाराची, नरसाळ्यासारखी, पाच तलम-नाजूक चमकील्या पाकळ्यांची निष्पर्ण झाडावर येणारा पहिला बहर थोडा रोडावला की, नवी पालवी फुटायला सुरुवात होते आणि पालवी आल्यावर पुन्हा एकदा धाकला बहर येतो.
हा वृक्ष अगदी अलीकडे म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या देशात आणला गेला. गोल्डन बेल या इंग्रजी नावाने प्रसिद्ध असलेला हा पिवळ्या फुलांचा-टॅबुबिया अर्जेशिया आणि दुसरा गुलाबी टॅबुनिया म्हणजे टॅबुनिया रोझिया या दोन्ही सुंदर रंगांच्या जाती स्वतंत्र भारतात मोठ्या प्रमाणात लावण्यात आल्या. दोन्हींना एकाच काळात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात फुले यायला लागतात. दोन्हींचे कुल आहे बिग्नोनिएसी. नुसतं शोधायला लागा, चटकन ओळखू येईल आणि पटकन सापडेलही!
आता म्हणजे फेब्रुवारी महिन्यातच आपल्याला जगातलं सर्वांत सुंदर फूल पाहायला जायचं आहे. होय, जगातलं ते सर्वांत सुंदर फुलं आहे याबद्दल जगभरातल्या नव्वद टक्के निसर्गप्रेमींचं आणि वनस्पतीशास्त्रज्ञांचं एकमत आहे. जसं चित्रांतल्या लिओनार्दो द विंचीच्या मोनालिसाबद्दल किंवा वास्तुकलेतल्या ताजमहालबद्दल पानंच्या पानं भरून लिहूनही त्यांचं सौंदर्य शब्दातीत राहिलं आहे, तसं ‘महर्शिया’ या फुलाबद्दल मराठीत आणि जगभरात सर्वांनी भरभरून लिहिलंय, या फुलाकडे पाहताना आपण मंत्रमुग्ध होतो. जेमतेम तीन-चार मीटर उंच असणारा हा वृक्ष ब्रह्मदेशातून भारतात आला. महाराष्ट्रात या वृक्षाची एकूण संख्या दहा-बारापेक्षा कमीच निघेल. मुंबई विद्यापीठात तो आहे. राणीच्या बागेतही एक झाड आहे. पुण्यामध्ये बावधन भागात आर्किटेक्ट श्री. नरेंद्र डेंगळे यांच्या बंगल्यात तो आहे. ब्रह्मदेशातून तो पहिल्यांदा कोलकात्यात दाखल झाल्याने तिथे त्यांची संख्या जरा जास्त आहे. बंगळुरूमध्ये बऱ्यापैकी तो भेटेल.
केरळमध्ये तिरुअनंतपूरमच्या प्राणिसंग्रहालयाच्या आवारात दोन-तीन झाडे आहेत. ऍमहर्शिया चांगला वाढण्यासाठी हवामान आणि जमिनीबद्दलच्या अटी फार आहेत. त्याला फार कडक ऊन चालत नाही, तसेच जमीन चांगली म्हणजे ‘लोमी सॉईल’ हवी, मराठीच्या लेखकांनी आणि शास्त्रज्ञांनी त्याचे नामकरण ‘ऊर्वशी’ असे केले आहे. महाजनसर लिहितात- फेब्रुवारीमधले ऊर्वशीचे फुलणे म्हणजे जणू लावण्यवती नर्तिकेचा बहारदार नृत्याविष्कारच! फांद्या फांद्यांना लोंबणारे मेणबत्त्यांच्या झुंबरांसारखे (कॅंडलग्रॅम) लांबच लांब फुलोरे येतात. त्यांच्या लोंबणाऱ्या शाखेचा रंगसुद्धा लालसर असतो.
बोटभर लांबीच्या टोकदार गुलाबी कळ्या क्रमाक्रमाने वरून खाली उमलत राहतात आणि आपण पाहातच राहतो. उमललेल्या स्वर्गीय फुलांचे शब्दांत वर्णन करणे केवळ अशक्य! ऊर्वशीची फुले केवळ ऊर्वशीच्या फुलांसारखीच असतात. अनुपमेय सौंदर्याने नटलेली असतात. नाचत असतात. एका फुलोऱ्यात वीस-पंचवीस फुले असतात. ती काहीशी ऑर्किडच्या फुलासारखी दिसतात, अनियमित आकाराची (झागोमार्फिक). पाच सुट्या पाकळ्यांपैकी तीन मोठ्या व दोन लहान असतात. त्यांचा रंग नारंगी म्हणावा की लाल, का लालसर गुलाबी- कसाही असला तरी फारच नेत्रदीपक असतो. सर्वांत मोठ्या पाकळीवर एक सोनेरी ठिपका असतो. फुलांची लांबी पंधरा-वीस सेंटिमीटर सहज भरेल. दहा अक्कडबाज पुंकेसरही लाल रंगसंगतीशी मिळत्या-जुळत्या रंगाचे, पण परागकोश मात्र हिरवट रंगाचे असतात.
डॉ. वालिश या वनस्पतींच्या अभ्यासकाने 1824 मध्ये हे झाड ब्रह्मदेशातपाहिलं आणि त्याच्या अप्रतिम सौंदर्याने तो वेडा झाला. त्याचं रोप घेऊन तो भारतात आला. कोलकात्याच्या वनस्पती उद्यानात हे झाड लावून वालिशनं त्याचं नामकरण महर्शिया नोबिलिस’ असं केलं. भारतीय वृक्षांबद्दल विशेष प्रेम असणाऱ्या ब्रह्मदेशाच्या माजी गव्हर्नरांच्या पत्नीच्या स्मरणार्थ ‘महर्शिया’ हे नाव, तर ‘नोबेलिस’ आलंय फुलांच्या देखणेपणावरून. प्रतिभासंपन्न निसर्गलेखक श्रीकांत इंगळहळ्ळीकर या झाडाबद्दल लिहिताना कसं भारावून जातात, ते पाहा- ‘ज्या फुलांचं सौंदर्य बंदिस्त करताना कॅमेरा स्तब्ध होतो, कुंचले थरथरतात, शब्द लपून बसतात आणि प्रतिभा अवाक् होते- अशी ‘महर्शिया’ या जगातल्या सर्वांत सुंदर वृक्षाची फुलं फेब्रुवारी महिन्यात जगातल्या मोजक्या ठिकाणी फुलतात. महर्शियाचा फुलणारा वृक्ष बागेत असणं म्हणजे सुंदर वृक्षांमधला कोहिनूर हिरा बाळगण्यासारखं अभिमानास्पद समजलं जातं. युरोपातल्या बागांमध्ये बंदिस्त अनुकूल वातावरण देण्यापासून आयुर्विमा उतरवण्यापर्यंत या अप्सरेचं कौतुक केलं जातं.’ आपण 1854 च्या आधी जन्मलो असतो ना, तर काही उपयोग नव्हता.
एकविसाव्या शतकात वावरणारे आपण भाग्यवान आहोत, कारण आपल्याला या जन्मात महर्शिया ऊर्फ ऊर्वशी पाहायला मिळू शकतो. फेब्रुवारी म्हणजे वसंत अगदी जवळ येऊन ठेपला आहे. काही उतावीळ झाडांनी तर वसंतोत्सव घोषितसुद्धा केला. वसंतात प्रत्येक नवे-जुने झाड फुलून येते, असे म्हणतात. पण शिशिर ऋतूमुळे झडून गेलेली पालवी आधी यावी आणि मग फुले, हा क्रम योग्य वाटतो; नाही का? फेब्रुवारी हा नवपल्लवीचा महिना… अर्जुन, तामण, मेडशिंगी, अजान, कांचनचंपा (ऑक्ना ऑब्ट्युझाटा), कुसुंब, वारंग इत्यादी बहुतांश झाडांना नवी पालवी येते- चैत्रपालवी. सीताअशोक हा वृक्ष तर नुसत्या नवपल्लवीनेही सुंदर (फोलिएज ब्युटी) दिसतो. त्याची कोवळी पाने सुरुवातीला पांढरट करड्या रंगाची, अतिनाजुक व मुलायम असतात. लवकरच ती जांभळट, लाल, गुलाबी आणि लाल-किरमिजी असे रंग बदलत पोपटी व शेवटी हिरवी होतात. करंज तसे सदाहरित झाड आहे.
हिवाळ्याच्या अखेरीस थोडी पानगळ होते, पण लगेच त्याला फेब्रुवारीत तजेलदार हिरवी लवलवती पालवी येते. बेलाचा वृक्ष पानझडी असतो. हिवाळ्याअखेर त्याची पानगळ होते आणि फेब्रुवारीत नवी पालवी येते. बेलाची पाने एकांतरित, संयुक्त प्रकारची, त्रिदल म्हणजे तीन पर्णिकांची, हिरवीगार व चकचकीत असतात. त्याच्या पानांचा (फळाप्रमाणे) औषधी उपयोग खूप आहे. महादेवाला ही पाने (बिल्वपत्र) वाहतात. शिवण या पर्णसुंदर वृक्षाला फेब्रुवारीअखेरीस फुले व पाने एकदमच येतात. आयुर्वेदात या झाडाला त्याच्या पानांवरून दिलेली संस्कृत नावे पर्णसौंदर्याचा गौरव करणारी आहेत. उदा. भद्रपर्णी, श्रीपर्णी, मधुपर्णिका, पीतरोहिणी इत्यादी. पानांचे सौंदर्य लक्षात घेण्यासाठी मुद्दाम पाहावा असा शिवण (मेलिना अर्बोरिया) वृक्ष आहे.
टेमरू (डायॉस्पायरास मलबारिका) आपल्या पर्णसौंदर्याच्या दिमाखामुळे फेब्रुवारीअखेरीस आपले लक्ष वेधून घेतो. त्याची नवपल्लवी सुरुवातीला लालभडक आणि तजेलदार असते. एखादा आठवडा फक्त हे सौंदर्यदर्शन घडविल्यानंतर पानांचा रंग लालसर बदामी, पोपटी आणि शेवटी हिरवा होतो. लहानपणी मला किसलय’ या शब्दाने फार वेड लावले होते. शंभर कोशांत अर्थ शोधल्यावर एखाद्या कोशात तो सापडायचा, पुन्हा मी विसरायचो अन् पुन्हा हा शब्द भेटायचा. किसलय म्हणजे नवपल्लवी! फेब्रुवारीत आंब्याच्या किसलयात लपलेला कोकिळ पक्षी आपल्या प्रियेला साद घालण्यासाठी एक सणसणीत सूर काढतो अन् सृष्टी वसंतोत्सवांचं उद्घाटन झाल्याचे घोषित करते.
एकदा बाबा भिडे पुलाजवळून जाताना ओरडून प्रज्ञा म्हणाली, ‘अहो, ते बघा पत्रावळीचं झाड!’ तिला काय म्हणायचं आहे हे लक्षात घेऊन माझी उत्सुकता वाढली, पळसाचे झाड आणि महानगराच्या मध्यभागी? पळसाचे संस्कृतात एक नाव ‘त्रिपत्रक’ आहे. त्यावरून मराठीत म्हण आली, ‘कुठेही जा, पळसाला पाने तीनच’ मधले पान मोठे आणि गोल असते. बाजूची दोन्ही पाने तिरकस अंडाकृती असतात. त्यांच्या या वैशिष्ट्यामुळे मध्यभागी गोल पान घेऊन तिरकस पानांनी भोवतीची पत्रावळ तयार करता येते. ज्वारीच्या वाळलेल्या कडब्याच्या बारीक काड्यांनी ही पाने विणता येणे ही सुंदर कला मला अवगत आहे. आता प्लॅस्टिकच्या पत्रावळी आहेत. सुदैवाने मी खऱ्या पळसाच्या पत्रावळींवर जास्त जेवलो आहे. गेले ते दिन गेले!
– विश्वावसू काशीकर