मुंबई – शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा मुंबई पुणे हायवेवर अपघात झाल्याने आज सकाळी (दि.१४) निधन झालं. मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी कायमच आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी कळताच मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. यानंतर मेटेंच्या मृत्यूमागे घातपात होता का? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मराठा आंदोलनाचे नेते बाळासाहेब खैरेपाटील यांनी केली आहे.
मेटे यांच्या अपघातानंतर माध्यमांशी बोलताना खैरे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विनायक मेटे यांनी सातत्याने मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले. असा नेता मराठा समाजाला सोडून गेला. मोठे नुकसान झाले. आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आले आहेत, त्यांनी मेटेंचा अपघात झाला तेव्हा तिथे कोणी थांबले नाही. दोन तास अॅम्बुलन्स मिळाली नाही. हा सर्व प्रकार काय आहे, हे आम्हाला समजले पाहिजे अशी मागणी खैरें पाटील यांनी केली.
मुख्यमंत्र्यांना काय तो निर्णय घ्यावा, अन्यथा मराठा मोर्चा शांत बसणार नाही, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते बाळासाहेब खैरेपाटील यांनी दिला आहे.तसेच रुग्णवाहिकेबद्दल देखील खैरे पाटील यांनी सवाल उपस्थित केले आहेत.
मुंबई-पुणे महा मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातानंतर विनायक मेटेंना गंभीर अवस्थेत तातडीनं कामोठेतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत . मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.
विनायक मेटे आपला एक सहकारी आणि बॉडीगार्ड यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. आज दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी ते मुंबईला जात होते.