बाळू म्हणाला, “आई, आज थोरात सर भेटले आणि का कुणास ठाऊक मला रमेश पाटीलही आठवला. त्याचं काय झालं, थोरात सर जूनला गेल्यावर्षीच आमच्या शाळेत शिक्षक म्हणून नव्याने रुजू झाले. आमच्या मराठी शिकवणाऱ्या देशपांडेबाई सेवानिवृत्त झाल्या आणि त्यांच्या जागी थोरात सर आले. मराठी विषय ते जीव लावून शिकवतात. मराठी लेखक-कवींविषयी, त्यांच्या साहित्याविषयी कुठलाही प्रश्न विचारा त्यांचे उत्तर तयार. फार दांडगे वाचन आहे त्यांचे. मुलांशी नेहमीच ते आपुलकीने वागतात पण बेशिस्त, बेजबाबदार वागणाऱ्या मुलांना शिक्षाही करतात. त्यांच्या शिक्षाही अफलातून असतात बरं!
एखादा मुलगा शाळेत उशिरा आला की, शाळा सुटल्यावर तासभर थांबवून त्या मुलाकडून शाळेच्या खेळाच्या मैदानावर पाणी शिंपडणे, तिथली माती सारखी करणे, तर कधी शाळेच्या भोवतालच्या झाडांना पाणी घालणे यासारखी कामे करून घेत. या कामात त्या मुलांसोबत त्यांचाही सहभाग असायचा. मुलांशी गप्पा मारता मारता मुलांचा एक तास केव्हा संपून जायचा हे मुलांना कळायचेसुद्धा नाही. गृहपाठ न करणाऱ्या मुलांकडून ग्रंथालयात शाळा सुटल्यावर बसवून गृहपाठ पूर्ण करून घ्यायचा, हे तर त्यांचं नेहमीचं ठरलेलं. अशावेळी मुलांना काही अभ्यासात अडले तर मदतही करायचे त्यांच्या ह्या असल्या शिक्षांतून मुलांना त्यांच्याबद्दल कधीच राग यायचा नाही.’ आई मध्येच म्हणाली, “अरे पण, तू मला रमेश पाटीलबद्दल सांगणार होतास ना?’ “अगं आई तेच सांगणार आहे. अगं, एकदा काय झालं…’
बाळूने एकदा काय झालं म्हटल्यावर आईने हातातलं काम जरा बाजूला ठेवले अन् ती बाळूकडे उत्सुकतेने पाहू लागली. बाळू म्हणाला, “अगं गेल्या वर्षाची जूनची गोष्ट. जूनला शाळा सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी थोरात सर वर्गात आले. सोबत मुख्याध्यापक सहस्त्रबुद्धे सर होतेच. मुख्याध्यापकांनी थोरात सरांची आमच्या वर्गाला ओळख करून दिली आणि मग ऑफिसच्या इतर कामासाठी ते वर्गाबाहेर पडले. थोरात सरांनी आम्हा सर्व मुलांची ओळख करून घेतली. प्रत्येक मुलाने आपले संपूर्ण नाव, मराठीतील आपला आवडता लेखक किंवा कवी, त्याचे वाचलेले पुस्तक आणि आपला छंद अशा रीतीने आपली माहिती द्यायची.
सगळ्यांची ओळख झाल्यावर थोरात सरांना वर्गातील मुलांचे केवढेतरी छंद समजले. चित्रकला, संगीत, नृत्य, नाट्य, हस्तकला… बाप रे! केवढ्या नानाविध छंदांची यादीच वर्गात तयार झाली. अचानक बाहेर ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि थोड्याच वेळात पावसाची रिमझिम ऐकू आली. खिडकीवर पावसाच्या थेंबांचा जोर वाढला. ते थेंब जणू वर्गात शिरायला लागलेत असेच वाटले. आता पावसाचे मधुर संगीत जणू सुरू झाले होते. पहिल्या पावसातला भिजलेल्या मातीचा मृदगंध वाऱ्याबरोबर वर्गात शिरला होता. त्या पहिल्या पावसाने वर्गातले सारे वातावरण एकदम प्रसन्न, भारून गेल्यासारखे वाटले.
थोरात सर म्हणाले, तुमच्या मराठीच्या पुस्तकातील पहिलीच पावसाची कविता आपण गाऊया, असं म्हणून सरांनी “नटखट पाऊस’ ही कविता गायला सुरुवात केली- “पाऊस सरी, येतात दारी,
झिम्माड पाऊस रानात…
टपटप टपटप वाजत बसतो,
जणू बोलतो गाण्यात,
पाऊस पाणी, फुलती गाणी, पाऊस पाहतो हसून
आनंदाच्या लाटेवरती, चला जाऊ या बसून’
या ओळी ऐकल्यावर तर आम्हाला आम्ही आनंदाच्या लाटेवर स्वार झालो आहोत, असेच वाटले. सर पाऊसगाणे म्हणत होते आणि आम्ही मंत्रमुग्ध होऊन ते गाणे ऐकत होतो. नुसते ऐकत नव्हतो. तर त्या पाऊसगाण्यात चिंब चिंब भिजून गेलो होतो. जणू बाहेर पाऊस आणि आत पाऊस अशी आमची अवस्था झाली होती. कारण सरांच्या तोंडून बाहेर पडणारे शब्दच तेवढे प्रभावी आणि परिणामकारक होते. लय, ताल आणि सूर हातात हात गुंफून त्या पाऊस-गाण्यात सामील झाले होते. एवढं सगळं सुंदर सुरू असताना सरांचे अचानक लक्ष शेवटच्या बाकाकडे गेले. त्या बाकावर रमेश भिंतीला डोकं टेकवून चक्क झोपला होता. सरांना खूप राग आला, ते त्याच्याजवळ गेले. ओरडूनच त्यांनी त्याला उठवलं, म्हणाले, वर्गात ढाराढूर झोपायला तू गोडधोड जेवणावर ताव मारून आलास की रात्रभर सिनेमा
पाहिलास? सगळा वर्ग चिडीचूप.
रमेश सशासारख्या भेदरलेल्या नजरेने सरांकडे पाहात होता. त्यांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. मग मीच उठून उभा राहिलो, धीर करून सरांना म्हणालो, गरीब आहे तो सर! सर पटकन म्हणाले, गरीब? मग याच्या कपड्याला अत्तराचा वास कसा? मी म्हणालो, सर उदबत्त्यांचा वास आहे! वडील नाहीत त्याला तो काम करून शिकतो, शाळेत येण्यापूर्वी तो उदबत्त्या विकतो. आई हे ऐकल्यावर सर खूप अस्वस्थ झाले. त्यांनी पुढे कविता शिकवलीच नाही. उलट रमेशच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. वर्गात का झोपू नये हे त्याला समजावून सांगितलं. पण हे सांगताना त्यांचे डोळे पाणावलेले होते.’
रमेशची ही सारी हकीगत ऐकून आईचेही डोळे पाणावले. बाळूला पोटाशी धरत ती म्हणाली, “धिटाईने तू सरांना रमेशची सारी हकीगत सांगितलीस, हे फार छान केलेस. माझा गुणाचा बाळू तू. असाच साऱ्यांच्या मदतीला धावून जात जा.’
एकनाथ आव्हाड