भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील नागपूर व दिल्ली कसोटी पार पडल्यावर खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा जास्त चर्चा या मैदानाच्या खेळपट्टीवरून सुरू झाली. आता दिल्लीत दुसरी कसोटी झाली व त्यातही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची वाताहत झाली व पुन्हा एकदा वादंग सुरू झाला आहे. खरेतर भारताची फिरकी गोलंदाजी खेळता येत नसल्यानेच हे वाद सुरू आहेत, हे उघड आहे. त्यामुळे कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे ते लक्षात घेतले पाहिजे. ऑस्ट्रेलियाबाबत बोलायचे तर “नाचता येईना अंगण वाकडे’ असेच चित्र दिसत आहे. जे काही पहिल्या कसोटीत घडले तेच काही फरकाने दुसऱ्या कसोटीतही घडले.
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिका हे परदेशी संघ जेव्हा भारताचा दौरा करतात त्यावेळी त्यांना सर्वात जास्त भीती खेळपट्टीचीच असते. कारण, भारतात पिरकी गोलंदाजीला मदत मिळेल अशीच खेळपट्टी तयार केली जाते. खरेतर हे प्रत्येक देश करतो. कारण आपली ज्या क्षेत्रात सर्वात जास्त ताकद असते त्यासाठीच उपयुक्त खेळपट्टी करणे हे गैर नाही. जर परदेशी संघांची ताकद वेगवान गोलंदाजीत आहे तर ते ग्रीन टॉपच (खेळपट्टीवर गवत राखणे) तयार करतात व याचा अनुभव भारतीय संघाने सातत्याने घेतला आहे. संघात जगातील सर्वात महान लेग स्पीन गोलंदाज शेन वॉर्न असतानाही ते भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियात त्यांच्या घरच्याच मैदानांवरही पाटा खेळपट्टी बनवत नव्हते हे सगळ्यांनाच माहिती आहे. ग्लेन मॅकग्रापासून सर्वच वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल अशाच खेळपट्ट्या तयार केल्या जात होत्या. मग हेच बीसीसीआयने भारतीय संघाची ताकद ओळखून केले तर तो गुन्हा ठरत नाही.
भारतीय संघाने प्रत्येक परदेश दौऱ्यात अशाच खेळपट्ट्यांचा सामना करत सरस कामगिरीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. तसेच कोणतीही मीडिया ट्रायल, माइंड गेम असले प्रकार केले नाहीत. जी कोणती खेळपट्टी मिळेल त्यावर सगळ्यांनीच उभे राहून टिच्चून फलंदाजी केली आहे.
राहुल द्रविडला तर कोणत्याही खेळपट्टीची ऍलर्जी नव्हती. त्याला 10 चेंडूत 20 धावाही करता येत होत्या व 100 चेंडूतही 10 धावा करता येत होत्या. तंत्राचा उल्लेख झाल्यावर विक्रमादित्य सुनील गावसकर व राहुल द्रविड यांचेच नाव समोर येते. मग असा नांगर टाकणारा एकही फलंदाज ऑस्ट्रेलियाकडे नाही का, असा सवाल निर्माण होतो. आपल्याला फिरकी गोलंदाजी खेळता येत नाही ना मग तंत्र सुधारा ना, खेळपट्टीवर का खापर फोडता, असाच प्रश्न आता त्यांना विचारावासा वाटतो.
फिरकी त्रिकुट पुन्हा अवतरले
एकेकाळी फिरकी गोलंदाजीच्याच जीवावर आपण परदेशात जिंकत होतो. जास्त जिंकले नाही कारण त्या देशांची वेगवान गोलंदाजी खेळण्याचे आपले तंत्र उघडे पडायचे. यात काळानुरूप बदल झाला. गावसकर यांनी वेगवान गोलंदाजी कशी खेळायची हे आपल्याला शिकवले. सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवागने त्याचा पालापाचोळा कसा करायचा हे दाखवून दिले. आता रोहित शर्मा, विराट कोहली त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून जगावर राज्य करताना दिसतात. अर्थात, आपल्या फलंदाजांनी वेगवान गोलंदाजी खेळण्याचे व त्यावर हल्ला चढवत धावा करण्याचे तंत्र गेल्या दोन दशकांतच सिद्ध केले. मग हेच काम परदेशी संघ विशेषतः ऑस्ट्रेलियाचे फलंदाज का शिकत नाहीत. भारतीय संघाकडे पूर्वीपासूनच अव्वल फिरकी गोलंदाज होते.
चंद्रा-बेदी-प्रसन्ना व व्यंकट ही चौकडी असो वा त्यातून व्यंकट बाहेर गेल्यावर राहिलेले फिरकीचे त्रिकुट असो आपण सातत्याने मायदेशात परदेशी संघांवर राज्य केले. त्यात काही अपवादही होते मात्र, तरी आजही महान फिरकी गोलंदाजांच्या यादीत याच चौघांची नावे सर्वात वर आहेत. त्यानंतरचा काळ अनिल कुंबळे-हरभजनसिंग-व्यंकटपती राजू यांचा होता. त्यांनीही तोच दर्जा टिकवून ठेवला व जगातील सर्व संघांना पाणी पाजले. त्यांची कारकीर्द संपल्यावर अनेक नवनवे फिरकी गोलंदाज भारतीय संघात आले परंतु त्यांचा दर्जा, अनुभव व जिद्द फारशी दिसली नाही. त्यातच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून नवोदितांकडे जास्त लक्ष द्यायला सुरुवात झाली व त्यातूनच आपल्याला समर्थ फिरकी गोलंदाजीचा सेकंड बेच मिळाला.
रवीचंद्रन अश्विन-रवींद्र जडेजा-अक्सर पटेल हे त्रिकुट लाभले. त्यांच्या जोडीला कुलदीप सिंग व यजुवेंद्र चहल हेदेखील चांगले गोलंदाज मिळाले. मात्र, जे सातत्य व अष्टपैलूत्व अश्विन, जडेजा व पटेलने दाखवले ते बाकीच्यांकडे असल्याचे कधी दिसून आले नाही. त्यामुळे अश्विन, जडेजा व पटेल यांच्याकडेच आपल्या फिरकी गोलंदाजीचे समर्थ त्रिकुट असेच आता पाहिले जात आहे व हेच गोलंदाज आता येत्या काळात जागतिक क्रिकेटवरही राज्य करतील हा विश्वासही मिळाला.
हिली आणि कंपनीचा रडीचा डाव
ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात दाखल होण्यापूर्वीच त्यांचे माजी कसोटीपटू इयान हिली यांनी वेगळाच राग आळवला होता. त्यांच्या स्टिव्हन स्मिथ व उस्मान ख्वाजा यांनीही हिली यांच्या हाताला हात लावत ममं म्हटले होते. या दौऱ्यात सराव सामना खेळण्यास ऑस्ट्रेलियाने नकार दिला का तर म्हणे बीसीसीआय सरावाला वेगळी व प्रत्यक्ष सामन्यासाठी वेगळी खेळपट्टी देऊन फसवणूक करते. मग ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळ तरी वेगळे काय करते. आजवर जितके दौरे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचे केले तेव्हा हेच चित्र असायचे. मग तेच आम्ही केले तर ते पाप कसे. घरच्या मैदानावर खेळणारा प्रत्येक संघ हेच करत आला आहे. कारण परदेशात मालिका जिंकणे कठीण गेले असेल, तर किमान मायदेशातील मालिका तरी जिंकाव्या हाच हेतू असतो.
आपल्याकडे जवागल श्रीनाथ व झहीर खानपासून जसप्रीत बुमराहपर्यंत जेव्हा नवे व दर्जेदार वोगवान गोलंदाज आले तेव्हा ऑस्ट्रेलियाने त्यांच्याकडचे ग्रीनटॉपही बदलले व शेन वॉर्नची गुणवत्ता पाहून तशी खेळपट्टी बदलल्याची अनेक उदाहरण आहेत. मात्र, याच वॉर्नला भारतात भारतीय संघाविरुद्ध फारसे यश लाभले नाही. बीसीसीआयने जर फिरकीला साथ देणारी खेळपट्टी तयार करण्याचा इतिहास रचला होता तर त्यावर कुंबळे व हरभजनप्रमाणे वॉर्नही यशस्वी व्हायला हवा होता. मात्र, तसे घडले नाही. कारण भारतीय संघ फिरकी गोलंदाजीही खेळतो व तशी फलंदाजी ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला अद्याप जमलेली नाही, हीच वस्तुस्थिती आहे.
खेळपट्टीचा बागुलबुवा
भारताविरुद्धच्या या कसोटी मालिकेसाठी कशा खेळपट्ट्या असतील यावरचे कवित्व कायम सुरू होते. त्यातच पहिल्या व दुसऱ्या कसोटीसाठी लाल मातीची खेळपट्टी दिसल्यावर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या पोटात गोळाच आला. घडलेही तसेच. पहिल्या डावात 177 तर दुसरा डाव अवघ्या 91 धावांत संपला. दुसरी कसोटीही अपवाद ठरली नाही. त्यांचा पहिला डाव 263 धावांवर तर दुसरा डाव अवघ्या 113 धावांवर संपला. आता त्यांच्या माजी खेळाडूंनी आपल्याच खेळाडूंविरुद्ध गळा काढला आहे. इयान चॅपेल यांनीही घरचा आहेर दिला आहे. तर माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने तर “आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार’ इतक्या शेलक्या शब्दांत टीका केली आहे.
मुळातच या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ इच्छा नसताना सहभागी झाल्यासारखेच वाटत आहे. त्यांना ही मालिका सुरू होण्यापूर्वीच खेळपट्टीचा बागुलबुवा झाला. काळी माती किंवा लाल मातीच्या खेळपट्ट्या आशिया खंडात असतातच हे माहिती असतानाही विनाकारण टीका करायची व माइंड गेम करायचा ही त्यांची जुनी खोड आहे. प्रत्येक देशाचा दौरा करण्यापूर्वीच हा खेळ सुरू केला जातो, तसा यंदाही केला गेला. मात्र, तेच बुमरॅंग ठरले व तेच ऑस्ट्रेलियावर उलटले. ज्या खेळपट्टीवर रवींद्र जडेजा, अक्सर पटेल व महंमद शमीसारखे खेळाडू धावा करतात त्यावर स्टीव्हन स्मिथपासून त्यांचे दर्जेदार फलंदाज धावांसाठी झगडताना दिसतात. विनाकारण खेळपट्टीचा बागुलबुवा करण्यापेक्षा व माइंडगेम खेळण्यापेक्षा क्रिकेट खेळा, असेच सांगावेसे वाटते.
तंत्र सुधारा, दृष्टिकोन बदलेल
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आयपीएल स्पर्धेत खेळून येथील खेळपट्ट्यांचा अनुभव घेतला आहे. मग त्यांनी आता फिरकी गोलंदाजी कशी खेळायची याचे तंत्रही शिकून घेतले पाहिजे. कोणत्या गोलंदाजाला बॅकफूटवर खेळायचे व कोणत्या गोलंदाजाला फ्रंटफूटवर खेळायचे याचे काही आरखडे असतात. कुंबळेच्या गोलंदाजीवर बॅकफूटवर खेळावे लागत होते. कारण, त्याच्या गोलंदाजीत वेग असायचा. मात्र, हरभजन चेंडू काही वेळा हळूवार टाकायचा म्हणून त्याच्या गोलंदाजीवर फ्रंटफूटवर खेळले तर यश मिळायचे हे देखील अनेक फलंदाजांनी दाखवून दिले आहे. तसेच जडेजा व पटेल चेंडू वेगात टाकतात त्यामुळे त्यांना बॅकफूटवर तर अश्विन चेंडू हळू टाकतो म्हणून फ्रंटफूटवर खेळले तर त्यांच्याही धावा होतील.
मात्र, त्यांना या तीनही गोलंदाजांनी इतकी भीती बसली आहे की ते यातून बाहेरच येण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यांनी वेगवान गोलंदाजीवर फलंदाजी करण्याचे तंत्र जपले व फिरकी गोलंदाजी खेळली तिथेच ते अपयशी ठरले. नेटमध्ये आपल्या पॉपिंग क्रीझ व रिटर्न क्रीझच्या दोन्ही बाजूचा भाग खराब करत सचिनने वॉर्नची गोलंदाजी खेळण्यासाठी तयारी केली होती. तेच काम ऑस्ट्रेलियाच्याही फलंदाजांनी केले तर चित्र बदलेल. त्यामुळे त्यांनी फिरकी खेळण्याचे तंत्र शिकले तरच दृष्टिकोन बदलेल अन्यथा या मालिकेतही त्यांच्या हाती फारसे काही लागणार नाही. जडेजा-अश्विन-पटेल यांच्या फिरकीचे भूत त्यांच्या मानेवरून अद्याप उतरलेले नसल्याने पुढील दोन्ही कसोटीत फार काही वेगळे चित्र दिसणार नाही.
अमित डोंगरे