– ज्ञानेश्वर फड
गेल्या काही वर्षांपासून शहरातील सांडपाणी आणि कंपन्यांचे रसायनयुक्त पाणी इंद्रायणीत सोडल्यामुळे नदीचे मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण होत आहे. याबाबत सातत्याने माध्यमांद्वारे प्रशासनावर ताशेरे ओढण्यात आले. तसेच आळंदी शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी इंद्रायणी प्रदूषणाचे व्हिडिओ, फोटो सातत्याने सोशल मीडियावार शेअर केले होते. याची दखल घेऊन नुकतेच गेल्या महिन्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेने पाहणी करून सहा कंपन्यांवर कारवाई केली.
मात्र, एक महिनाही उलटत नाही तोवरच शुक्रवारी (दि. 24) इंद्रायणीत पुन्हा रसायनमिश्रीत पाणी सोडण्यात आले. आळंदीतील बंधाऱ्यावरून पाणी पडल्यानंतर खाली नदीत रसायनाचा फेस होत असल्याचे दिसले. त्यामुळे प्रशासनाची कारवाई ही फक्त कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
इंद्रायाणी नदीकाठावर देहू आणि आळंदी ही मोठी दोन तीर्थक्षेत्रे आहेत. तुलनेत आळंदीपेक्षा देहूतील नदी पात्रात प्रदूषण कमी आहे. मात्र देहूपासून पुढे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील कंपन्यांचे प्रदूषित पाणी आणि काही भागातील सांडपाणी थेट नदीत सोडल्यामुळे पाणी ज्यावेळी आळंदीत पोहोचते तेव्हा ते अत्यंत प्रदूषित झालेले असते.
काळवंडलेले असते. त्या पाण्याची दुर्गंधी येते. त्यामुळेच नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णीचा विळखा तयार होते. पीसीएमसीकडून दरवर्षी कोट्यवधींचे टेंडर काढून जलपर्णी काढली जाते; मात्र मुळात पाणीच प्रदूषित असल्यामुळे पुन्हा जलपर्णी तयार होते.
आळंदी आणि देहू ही तीर्थक्षेत्रे वारकरी संप्रदायातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी आहेत. याठिकाणी वर्षाभरात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. कार्तिकी एकादशीच्या वेळी आणि आषाढी वारी सोहळा पालखी प्रस्थानाला लाखो भाविक येतात. अशावेळी लाखो लोकांची स्नानाची व्यवस्था इतर ठिकाणी होणे कठीण असते त्यामुळे त्या भाविकांना याच प्रदूषित पाण्यात आंघोळ करण्याशिवाय पर्याय उरत नाही.
तसेच तीर्थक्षेत्री स्नानाला संप्रदायात अधिक महत्त्व असल्याने भाविक मोठ्या भक्तीभावाने इंद्रायणीत स्नान करतात. अशावेळी अनेकदा भाविकांना त्वचा रोगांच्या समस्यांचाही सामना करावा लागतो. नदी काठावरील गावांना देखील या प्रदूषित पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. डासांचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. प्रदूषित पाणी पिकांना दिल्यामुळे जमीन नापीक होत चालली आहे.
आश्वासनांचे काय झाले?
हिंदुत्वाचा डांगोरा पिटणाऱ्या सरकारला वारकरी भाविकांच्या या व्यथा दिसत नाहीत का? असा प्रश्न निर्माण होत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी इंद्रायणी स्वच्छतेबाबत आश्वासन दिले होते; मात्र त्यांचे आश्वासन हवेत विरल्याचे चित्र आहे. तसेच केंद्र सरकारचा नदी स्वच्छतेचा संकल्प अजूनही शून्यातच असल्याचे दिसत आहे. नदी स्वच्छतेबाबतचे कार्यक्रम हे फक्त कागदावरच असल्याचे दिसते कारण प्रत्यक्षात गेल्या दहा वर्षांत इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त होण्याऐवजी दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे.
एसटीपी प्रकल्प बंधनकारक हवे
प्रदूषणमुक्तीसाठी कंपन्यांना आणि नदीकाठावरील गावांना जलशुद्धीकरणाचा एसटीपी प्रकल्प बंधनकारक करून सांडपाणी आणि प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करूनच ते इंद्रायणीत सोडावे. तरच नदी प्रदूषण कमी होईल.