आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेदरम्यान अशा काही घटना समोर येत आहेत की त्या खेळ भावना आणि क्रीडा संस्कृतीला गालबोट लावत आहेत. कधी कधी खेळाडूंना चिडवण्यासाठी धार्मिक घोषणा दिल्या जातात. तर कधी संघाचा विजय हा गाझा येथील पॅलेस्टिनी नागरिकांना समर्पित केला जात आहे तर कधी “प्लेअर ऑफ द मॅच’सारखा पुरस्कार हा पाकिस्तानातून निर्वासित झालेल्या अफगाणी नागरिकांना अर्पण केला जात आहे. याकडे काही जण द्वेषभावनेतून उमटणारी प्रतिक्रिया म्हणत आहेत तर काही जण राजकारण. या भानगडीत फारसे न पडणारे मंडळी या घटना क्रिकेटच्या अस्मितेला ठेच पोहोचवणाऱ्या आणि नकारात्मक वातावरण तयार करणाऱ्या आहेत, असे म्हणतील.
मैदानात कोणताही खेळाडू केवळ आपल्याच देशासाठी खेळत असतो. तो युद्धभूमीत किंवा निवडणुकीच्या रणभूमित नसतो. तो कोणत्याही राजकीय विचारसरणीला पुढे नेत नाही. हे केवळ खेळाचेच मैदान असते आणि त्यात जिंकण्यासाठी खेळाडू आक्रमक खेळाचा आधार घेत असतो. हा खेळ “जंटलमन गेम’ नावाने ओळखला जातो. अर्थात, एखाद्या संघासाठी प्रत्येक दिवस सारखा नसतो. तो कधी पराभूत होतो तर कधी विजयी. यात लहानसहान संघदेखील मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेल्या संघाला चितपट करण्यात देखील यशस्वी होतात. अशा चित्तथरारक स्थितीत खेळाच्या पावित्र्याला बाजूला ठेवून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर बेजबाबदार कृती घडते तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करायचा असेल तर अशा प्रकारचे कृत्य ही मंडळी आपल्या देशातही करू शकतात. अर्थात त्याचेही समर्थन करता येणार नाही. कारण चांगले क्रिकेटपटू हे जगासाठी आयकॉन असतात. त्यांना लाखो, कोट्यवधी फॉलोअर असतात. त्यांच्या प्रत्येक मताकडे, भूमिकेकडे, आचरणाकडे जगाचे लक्ष असते. ते देश-जगाबाबत काय विचार करतात हे महत्त्वाचे ठरते. म्हणूनच त्यांच्या तोंडून येणारी प्रतिक्रिया ही मैदानाबाहेर उमटायला हवी आणि हेच योग्य आहे. आणखी एक मांडला जाणारा तर्क म्हणजे, एखाद्या संघाने आपला विजय ग्राउंडस्टाफ मॅनला अर्पण केला तर तेव्हा त्याला विरोध होत नाही.
अर्थात, यामागे मानवतेचा विचार असतो. ग्राऊंडस्टाफ मॅनला एखादा विजय अर्पण करणे ही बाब व्यक्तिगत राहू शकते. मात्र, एखाद्या राजकीय आंदोलनाचे कौतुक करणे, पाठराखण करणे हे राजकारणाच्या श्रेणीत मोडते. या दोन्हीतील फरक समजून घेतला पाहिजे. मी जुन्या शाळेतला क्रिकेटपटू आणि आपणही विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत प्रतिनिधित्व केले आहे. आमच्यावर जे क्रिकेटचे संस्कार झाले, ते अशा प्रकारच्या कृत्यांना थारा देणारे नाही आणि तशी ते परवानगीही देत नाहीत. अभिव्यक्तीच्या नावाखाली दिली जाणारे असे कथित स्वातंत्र्य आमच्या काळात कधीही दिसले नाही. विशेष म्हणजे तत्कालीन काळात देखील अशा प्रकारच्या राजकीय संकटांना जग सामोरे जात होते. तेव्हा देखील देशांदेशातील हितसंबंधावरून संघर्ष सुरू असायचा. पण त्याचे प्रतिबिंब मैदानात कधीही उमटत नसे.
एक गोष्ट स्पष्ट आहे की, खेळाच्या मैदानात राजकारण होऊ नये. ही बाब आयसीसीने स्पष्ट करायला हवी. अर्थात क्रिकेटपटू देखील मनुष्य आहे आणि त्याच्या भावनादेखील प्रसंगी अशा घटनांमुळे तीव्र होऊ शकतात. त्यालाही आपला विचार असतो; परंतु एखाद्या खेळाडूला अशा घटनांवर प्रतिक्रिया द्यायचीच असेल तर त्याने अन्य ठिकाणच्या व्यासपीठाचा वापर करायला हवा. आपल्या भावना तेथे मांडाव्यात, व्यक्त कराव्यात. एका अर्थाने त्या ठिकाणी मांडलेले मत अधिक प्रभावी राहू शकते. म्हणूनच क्रिकेटपटूंनी मैदानात उत्साही होण्याची गरज नाही आणि तीव्र मतेही मांडू नयेत. अशा प्रकारची निरर्थक बडबड ही घातक राहू शकते. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष जका अशर्रफ यांनी भारताविषयी आक्षेपार्ह मत व्यक्त करून अगोदरच तोंड पोळून घेतले आहे. त्यांनी विश्वचषक सुरू होण्यापूर्वी भारतविरुद्ध वादग्रस्त वक्तव्ये केली आणि स्थिती एवढी ढासळली की त्यांना त्यांच्याच देशात प्रखर विरोध झाला. तोंडातून बाहेर पडलेला शब्द परत घेता येत नाही, हे देखील त्यांना कळून चुकले असेलच. त्यामुळे खूपच विचारपूर्वक बोलायला हवे.
आपले व्यक्तिगत विचार काहीही असतील, परंतु एखाद्या जबाबदार पदावर आपण असाल तेव्हा प्रत्येक शब्द मोजून मापून बोलला पाहिजे. त्यामुळे खेळाच्या संस्कृतीवर परिणाम होतो. साहजिकच खेळाला खेळाच्या दृष्टीनेच पाहिले पाहिजे. राजकारण अणि युद्धाला बाजूला ठेवले पाहिजे. त्यावर तोडगा काढण्याचे मार्ग वेगळे आहे. त्यासाठी कुटनीतीचे प्रयत्न केले जातात. क्रिकेट खेळाडूंचा उद्देश हा खेळाच्या मैदानात चांगली आणि सर्वोत्तम कामगिरी करण्याचा असावा. तेथे क्रिकेटला राजकारणाचा मुलामा देऊ नये. आयसीसीने या गोष्टी रोखण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. त्याचे काटेकोरपणे पालन करायला हवे.
– सुरिंदर खन्ना, माजी क्रिकेटपटू