काय बालमित्रांनो लक्षात आहे ना, आईने प्रणवला काय प्रयोग करायला सांगितला होता? त्यानंतर प्रणवने काय नोंदी केल्या ते बघा बर का.
कृती
1. हळदीच्या पट्टीवर साबणाचे पाणी टाकले.
2. नंतर त्या पट्टीवर लिंबू रस पिळला
निरीक्षण
1. साबणाचे पाणी टाकल्यावर पिवळी पट्टी नारिंगी लाल रंगाची झाली
2. लिंबाचा रस टाकल्यावर पट्टीचा नारिंगी रंग परत पिवळा झाला.
“आई, हे बघ माझे निरीक्षण. बरोबर आहे ना? पण मला सांग, आम्लामुळे निळा लिटमस कागद लाल होतो म्हणाली होतीस. इथे मात्र साबणाने झाला. साबणात कुठे आम्ल असते?’ प्रणवची शंका एकदम रास्त होती. आईने काय उत्तर दिले असेल बरं?
आई म्हणाली, “बरोबर साबण काही आम्लधर्मी नाही. ते आहे आम्लारीधर्मी. आम्लारीधर्मी पदार्थ जर हळदीवर टाकले तर हळदीचा रंग नारिंगी लाल होतो आणि त्यावर आम्ल टाकले की परत हळदीला पिवळा रंग येतो. लिटमस कागदाप्रमाणे हळद ही पण एक दर्शक आहे. म्हणजेच पदार्थ आम्लधर्मी आहे का आम्लारीधर्मी आहे हे ओळखण्यास मदत करते.’
प्रणवचा मग पुढचा प्रश्न तयार होताच. “आई, घरात वापरले जाणारे आम्लारी पदार्थ कोणकोणते आहेत? त्यांची चव कशी असते?'”ज्या पदार्थांमुळे हळदीचा रंग नारिंगी होतो किंवा लाल लिटमस निळा होतो, ते सारे आम्लारी पदार्थ आहेत. जसे कपडे अथवा भांडी धुण्यासाठी वापरले जाणारे साबण, केक, ढोकळा हलका व्हावा आणि फुगावा यासाठी वापरला जाणारा खाण्याचा सोडा व बेकिंग पावडर हे सारे आम्लारी पदार्थ आहेत आणि यांची चव तुरट/कडवट असते आणि स्पर्शाला बुळबुळीत असतात. आम्लारीधर्मी पदार्थांचे गुणधर्म आम्लधर्मी पदार्थांच्या विरुद्ध असतात.’
“परवा तू पाणीपुरी जास्त खाल्ली मग काय झाले?’ “घशाशी आंबट आंबट येत होते.’ “का माहीत आहे? अन्न पचनासाठी आपल्या जठरामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल असते. अती खाल्ले की जास्त प्रमाणात आम्ल तयार होते व ते घशाशी येते.’ “त्यावेळी तू काय घेतले होतेस?’ “हां! ते घरात औषधी दूध नव्हते, म्हणून तू पाण्यात तो केकचा सोडा मिसळून दिला होतास. मग नंतर डराव डराव करत होतो मी. पण त्यामुळे मला बरं वाटलं.’
“अरे ते दूध नव्हे, मिल्क ऑफ मॅग्नेशिया. खायचा सोडा व मिल्क ऑफ मॅग्नेशिया दोन्ही अल्कलीधर्मी आहेत. जेव्हा आम्लधर्मी व अल्कलीधर्मी पदार्थ एकत्र येतात व त्यांचे उदासीकरण होते. म्हणजेच क्षार व पाणी तयार होते. त्यामुळे आम्लाचा त्रास कमी होतो.’
“क्षार म्हणजे मीठ ना?’ “घरातले मीठ हा एक प्रकारचा क्षार आहे. आणखी इतरही क्षार आहेत. एक काम कर. मीठाचे पाणी तयार कर. आता हे पाणी पिवळ्या आणि नारिंगी दोन्ही पट्ट्यांवर टाक. काय झालं सांग बरं?’
“अगं आई, कोणत्याही पट्टीचा रंग बदलला नाही.'”म्हणजेच काय म्हणणार?'”क्षार उदासीन असतात’, प्रणव म्हणाला. “…आणि आम्ल, आम्लारी आणि क्षार यांचे गुणधर्मही समजले.’
बालमित्रांनो प्रणवसारखे तुम्हालाही आम्ल, आम्लारी आणि क्षार यांविषयी समजले ना?
– विशाखा गंधे