रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी अचानकपणे बीजिंगला भेट देऊन जगाला आश्चर्याचा धक्का दिला. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतरच्या काळातील त्यांची ही पहिली परराष्ट्रभेट ठरली. बीआरआय परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पुतीन चीनला गेले असले तरी त्याला अन्यही काही संदर्भ आहेत. पुतीन सध्या जगाच्या नकाशावर आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत हे नाकारता येणार नाही. बीजिंगमध्ये पार पडणाऱ्या परिषदेतील 140 देशांच्या प्रतिनिधींमध्ये पुतीन यांची उपस्थिती युक्रेन युद्धामुळे पूर्णपणे एकाकी पडलेल्या स्थितीत त्यांची प्रतिमा वाढवू शकते. चीन आणि रशिया यांच्यातील युतीमुळे पुतीन यांना आपण युरोपला आव्हान देऊ शकतो, असा विश्वास दिला आहे. पण ही जवळीक भारतासाठी धोकादायक ठरणारी आहे.
सध्या जागतिक शांतता नव्याने संकटात सापडली आहे. एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे आणि दुसरीकडे इस्रायल आणि हमास यांच्यात घनघोर युद्ध सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन इस्रायलला पोहोचण्यापूर्वीच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी बीजिंग गाठून चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची भेट घेतली. पुतीन आणि जिनपिंग यांच्यातील बैठक एखाद्या हाय प्रोफाइल शोसारखी होती, ज्यावर जगाच्या नजरा खिळल्या होत्या. दोन्ही नेत्यांमधील चर्चेत मध्य पूर्वेतील संकट हा केंद्रबिंदू राहिला.
दोन्ही देशांनी इस्रायलच्या कृतीवर टीका केली. रशिया आणि चीनला युद्धबंदी हवी आहे. या बैठकीचा उद्देश अमेरिकेविरुद्ध दोन्ही देशांमधील भागीदारी मजबूत करणे हा असल्याचे बोलले जात आहे. अलीकडच्या वर्षांत रशिया-चीन संबंध अधिक घट्ट होत आहेत. पुतीन आणि जिनपिंग यांनी वैयक्तिक मैत्रीही प्रस्थापित केली आहे.
वन बेल्ट, वन रोड उपक्रमाच्या दहाव्या वर्धापन दिनात सहभागी होण्यासाठी पुतीन चीनमध्ये पोहोचले. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर सोव्हिएत संघाबाहेरील देशाला भेट देण्याची पुतीन यांची ही पहिलीच वेळ आहे. चीन आणि रशियाने फेब्रुवारी 2022 मध्ये “नो लिमिट’ भागीदारीची घोषणा केली होती. काही दिवसांनी पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याची घोषणा केली.
अमेरिका चीनला आपला सर्वात मोठा प्रतिस्पर्धी मानते आणि रशियालाही आपला सर्वात मोठा धोका मानते. पुतीन आणि जिनपिंग यांनी मिळून जगातील सर्वात शक्तिशाली अघोषित युती केली आहे, हे कुणापासून लपून राहिलेले नाही. जगातील सर्वात जास्त अणुबॉम्ब असलेले देश एकमेकांच्या जवळ येण्याला खूप मोठा अर्थ आहे. चीन-रशिया मैत्री खूप गुंतागुंतीची आहे. दोन्ही देश कधी एकमेकांचे मित्र तर कधी शत्रू राहिले आहेत.
रशिया आणि चीनमधील मैत्रीसंबंध भारतासाठी धोकादायक मानले जात आहेत. पाश्चात्य देश रशियाच्या विरोधात आहेत आणि चीन रशियाभोवती कवच घेऊन उभा आहे. रशिया हा भारताचा पारंपरिक मित्र आहे आणि त्याने नेहमीच संकटकाळात भारताला साथ दिली आहे. रशियाशी असलेल्या मैत्रीमुळे भारताने युक्रेन-रशिया युद्धाबाबत तटस्थ भूमिका स्वीकारली आणि रशियाचा एकदाही निषेध केला नाही. पुतीन सध्या जगाच्या नकाशावर आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत हे नाकारता येणार नाही.
बीजिंगमध्ये पार पडणाऱ्या परिषदेतील 140 देशांच्या प्रतिनिधींमध्ये पुतीन यांची उपस्थिती युक्रेन युद्धामुळे पूर्णपणे एकाकी पडलेल्या स्थितीत त्यांची प्रतिमा वाढवू शकते. गेल्या महिन्यात भारतात झालेल्या जी-20 परिषदेतही पुतीन सहभागी झाले नव्हते.
रशिया आणि चीन जवळ येत असल्याने भारताची अस्वस्थता वाढणे स्वाभाविक आहे. या संबंधांमुळे चीन भारतासोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एकतर्फी कारवाई करून लष्करी दबाव वाढवू शकतो, अशी भीती आहे.
चीनशी सामना करण्यासाठी भारत आपले सैन्य मजबूत करण्यात व्यस्त आहे. लष्करी पुरवठ्यासाठी भारत रशियावर अवलंबून आहे. रशिया मात्र चीनच्या जास्तच जवळ जात आहे. रशिया आता चीनचा भागीदार आहे आणि यामुळे भारताला काही प्रमाणात त्रास होण्याची शक्यता आहे. शस्त्रास्त्रांसाठी रशियावरील अवलंबित्वामुळे हा संपूर्ण प्रश्न खूपच गुंतागुंतीचा झाला आहे. युक्रेनबाबतच्या भूमिकेमुळे अमेरिका आणि युरोपसोबतचे भारताचे संबंध अडचणीत आले आहेत.
चीनच्या वन बेल्ट, वन रोड प्रकल्पामुळे भारतही त्रस्त आहे. चीन या प्रकल्पाच्या माध्यमातून भारताला वेठीस धरत आहे. त्यामुळे बीआरआय प्रकल्पाला ब्रेक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-मध्य पूर्व-युरोप कॉरिडॉरचा प्रस्ताव दिला होता. युद्धकाळात रशियाने भारताला नेहमीच साथ दिली. 1971 च्या युद्धात जेव्हा अमेरिकेने बंगालच्या उपसागरात आपला ताफा पाठवला तेव्हा रशियानेही ते थांबवण्यासाठी आपल्या युद्धनौका पाठवल्या होत्या.
शस्त्रास्त्रांसाठी भारत रशियावर अवलंबून राहिला. सुमारे तीन दशकांपूर्वी भारताने रशियाशी हातमिळवणी केली. दुसरीकडे, चीनने जगात एक बहुपक्षीय शक्ती म्हणून स्वत:चा प्रचार सुरू केला होता. युक्रेनमध्ये पुतीन यांच्या आक्रमकतेनंतर चीन-रशियाची ही नवी युती आणखी गुंतागुंतीची झाली आहे. युद्धामुळे कमकुवत झालेला रशिया चीनसाठी संपत्तीसारखा असेल. हीच बाब भारतासाठी अडचणीचे कारण बनू शकते.
रशिया-चीन मैत्री भारताला आपल्या संबंधांवर फेरविचार करण्यास भाग पाडू शकते. चीन आणि रशिया यांच्यातील युतीमुळे पुतीन यांना आपण युरोपला आव्हान देऊ शकतो, असा विश्वास दिला आहे. युक्रेनमधील युद्धामुळे अमेरिकेलाही दडपण आले आहे. भविष्यात चीन तैवानवर हल्ला करू शकतो, अशी भीती अमेरिकेला आहे. या कारणास्तव जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारताशी आपले संबंध मजबूत करण्यात अमेरिका व्यस्त आहे. चीनची रशियासोबत वृद्धिंगत होत जाणारी मैत्री फायदेशीर असल्याचे दिसून येत आहे. रशिया आणि चीनमधील वाढणारे सामरिक संबंध भारताच्या हिताचे नाहीत. सबब, भारताला सावध राहून मुत्सद्देगिरीचा अवलंब करावा लागेल.
रशिया हा भारताचा पारंपरिक मित्र असल्यामुळे चीनसोबत संभाव्य युद्ध झाल्यास तो भारतविरोधी भूमिका घेण्याची शक्यता नाही. परंतु रशियाशी संबंध सुधारून चीन भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. चीन मनोवैज्ञानिक युद्ध म्हणजेच सायकॉलॉजिकल वॉरफेअर खेळण्यामध्ये जगात माहीर मानला जातो. त्यामुळे रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना निमंत्रित करुन चीनने एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. एकीकडे भारताला शह देण्याचा प्रयत्न करतानाच दुसरीकडे अमेरिकेच्या चिंताही वाढवल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय पटलावर सध्या दिसत असलेली एकंदरीत परिस्थिती ही एखाद्या शीतयुद्धाचे संकेत देणारी आहे, असे अनेक अभ्यासकांचे म्हणणे आहे. याचे कारण जागतिक राजकारणात आज उघडपणाने ध्रुवीकरण होताना दिसत आहे. एका बाजूला अमेरिका, इस्राईल, संयुक्त अरब आमिराती, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया, आणि युरोपियन देश आहेत; तर दुसऱ्या बाजूला चीन, इराण, पाकिस्तान, उत्तर कोरिया, रशिया आदी देशांची युती तयार होत आहे. वैश्विक शांततेसाठी ही स्थिती चिंता वाढवणारी आहे.
– अभय कुलकर्णी