अमरावती – देशाचे आजचे पंतप्रधान कुठेही गेल्यानंतर जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका करतात. संसदेमध्ये जेव्हा नरेंद्र मोदी जातात तेव्हा सत्ताधारी पक्षाचे खासदार मान खाली घालून बसतात. एकप्रकारची दहशत त्या ठिकाणी दिसून येते. या देशात मोदींच्या रुपाने नवीन ‘पुतीन’ तयार होत आहे का, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले.
अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, मी अनेक नेत्यांना जवळून पाहिले आहे, जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर मी सर्व पंतप्रधान पाहिले. नेहरुंची भाषणे नवा भारत कसा निर्माण करायचा, यावर असायची. आताच्या पंतप्रधानांच्या भाषणात नेहरु आणि काँग्रेसवर टीका असते. त्यांच्यात दृष्टीकोनाचा अभाव दिसतो, अशी टिप्पणी त्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर सतत हल्ला करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. पंतप्रधान विरोधी पक्षांवर टीका करत असतात पण भविष्यासाठी त्यांच्या सरकारच्या किंवा भाजपच्या योजनांवर चर्चा करत नाहीत. काँग्रेस पक्ष काही काळापासून सत्तेत नाही. पण मोदी सतत विरोधकांवर हल्ले करत आहेत. काही पक्ष विरोधी पक्षात आहेत याचा अर्थ असा नाही की महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांना विश्वासात घेऊ नये, असेही पवार म्हणाले.
नेहरूंनी स्वातंत्र्यपूर्व काळात आयुष्याच्या उमेदीची १० ते ११ वर्षं तुरुंगात घालवली. स्वातंत्र्यानंतर देश संसदीय लोकशाही पद्धतीने चालायला हवा यासाठी एक रचना उभी केली. त्या नेहरूंचे योगदान या देशाच्या इतिहासात कुणी पुसू शकत नाही. त्यांच्यावर आज पंतप्रधान टीका करतात, चुकीच्या गोष्टी सांगतात, अशा शब्दांत शरद पवारांनी मोदींना लक्ष्य केले.
तसेच देशाची सत्ता सन्माननीय मोदींच्या हातात आहे. हे लोक महाराष्ट्रात येऊन माझ्याकडे कामांचा हिशेब मागतात. परंतु तुम्ही गेल्या १० वर्षातील सत्ताकाळात काय केले? याचा हिशेब जनतेला द्यायला हवा, असेही शरद पवार म्हणाले.