जनजागृती करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात 1893 पासून केली आणि नंतरच्या काळामध्ये साधारणतः 60 सालापर्यंत गणेश उत्सवाचे स्वरूप हे लोकशिक्षण, प्रबोधनात्मक, जनजागृती करण्याकडे गणेश उत्सव मंडळाचा दृष्टिकोन होता. साधारणतः 1920 पासून 1942 पर्यंत म्हणजे जवळजवळ 22 वर्षे आचार्य अत्रे यांनी पुण्यातील सार्वजनिक जीवन समृद्ध केले.
त्या काळामध्ये आकाशवाणी सोडल्यास करमणुकीची इतर साधने नाटक, सिनेमा सोडल्यास समाजामध्ये नव्हती. गायन, वादन, नृत्यकला त्याचप्रमाणे पुढाऱ्यांची भाषणे यावरच समाजाला अवलंबून राहावं लागत होते. पुण्यातील गणेशोत्सव हे त्या काळामध्ये प्रत्येक गणपतीचे अवतारातील देखाव्याने व्यापला होता. त्यामध्ये डुल्या मारुती, दारूवाला पूल नेहरू चौक, खडकमाळ आळी, मंडई मधला गणपती, दगडू हलवाई गणपती, वस्ताद जगोबा तालीममधील गणपती, पासोड्या विठोबाजवळचा गणपती, फडके हौदाच्याजवळील वज्रदेही मंडळ व विराणी तालीम मंडळाचा गणपती, भाजी राम मंदिराजवळचा गणपती, कुंटे चौकामधील नगरकर तालीम, गुरुजीच्या तालमीचा गणपती, तुळशीबागेतला गणपती, सोन्या मारुती चौकातील गणपती, विजय टॉकीज गरुड गणपती, गुडलक चौकातला गणपती असे काही मोजके गणपती हे दररोज गणपतीचे अवतार किंवा रूप बदलत असत. कधी मावळ्याच्या वेषात, कधी निरनिराळ्या देवाच्या रूपामध्ये, देखाव्यामध्ये कधी पौराणिक देखाव्यामुळे असे अवतारातले, पोशाखातले गणपती असत. दारूवाला पूल व डुल्या मारुती यांच्यामध्ये तर स्पर्धा लागलेली असे. त्याचप्रमाणे मंडळी आणि दगडू हलवाई यांच्यामध्ये स्पर्धा लागलेली असे.
विशेषतः विसर्जन मिरवणुकीमध्ये या दोन गणपती मध्ये कमालीची स्पर्धा असायची. मुले इकडून-तिकडे पाहण्यासाठी धावत असत आणि काय बदल करण्यात येतोय हे बघण्यात दंग असत. काही एकदम आपली विसर्जन मिरवणूक देखावा बदलत असत.
नंतर रोषणाईचा काळ आला आणि रोषणाई करण्यामध्येच गणपतीचा महोत्सव गाजत राहिला. रोषणाईबरोबर सिनेमातील गाणी वाजत असत. प्रत्येक वर्षामध्ये राजकपूरच्या सिनेमातील गाणी निरनिराळ्या ठिकाणी वाजत असत. अगदी बरसात या सिनेमापासून ते रात्री गंगा मैलीपर्यंत. वीराच्या तालमीचा गणपती जो आहे त्या गणपतीचा देखावा शारदा नि गणपती. शारदेला हातावर पहुडलेली घेतली आहे असा उभारण्यात आला होता. जो राजकपूरचा ट्रेडमार्क होता. नर्गिसला हातावर घेऊन काढलेला आणि आजपर्यंत प्रेमाचा विषय घेऊन सिनेमे आलेले आहेत त्यामध्ये हिरोच्या हातावर कमान केलेली नायिका आजही राजकपूरच्या पोजमध्ये दाखवली जाते. केवढा मोठा प्रभाव राजकपूरच्या त्या ट्रेडमार्कने महाराष्ट्रावर निर्माण केला होता आणि आजही आहे. हे सिनेमा रसिक जाणून आहेत. त्यावेळेस खूप टीकाही झाली.
त्याचप्रमाणे आचार्य अत्र्यांनी गणेशोत्सवासारख्या धार्मिक उत्सवामध्ये आपल्या विनोदी भाषणाने सारे पुणे दणाणून सोडले होते. पुणेकरांना खळखळून हसवले आहे. त्या काळामध्ये बटाट्या मारुतीच्या देवळामध्ये जो शनिवार वाड्याच्या समोर आहे. तिथे बाबुराव श्रोत्री यांचे जळत्या समईचा नाच हा कार्यक्रम ठरलेला असे. हे बाबुराव श्रोत्री आमच्या दंडवतेवाडीतील शाळेजवळच आता मुकुंदराव लेले दवाखाना आहे त्याच्या पाठीमागे राहात होते. त्यांचा मुलगा माझ्याच वर्गात होता. चित्रकार ओंकार देखील त्या ठिकाणीच राहात होते.
सिनेमातील गाण्याचा काळ सुरू झाला तेव्हा अगदी आग सिनेमापासून बरसात, आवारा, श्री 420, बूट पॉलिश, अब दिल्ली दूर नहीं, आह, त्यानंतर जिस देश में गंगा बहती है, संगम, मेरा नाम जोकर अशा सिनेमातली गाणी प्रत्येक गणपतीच्या पुढे गाजत असत आणि त्यावर नृत्य करणारी मंडळी होती. इतका राजकपूरच्या प्रभावाने पुण्यातला गणेशोत्सव गाजला होता. राजकपूरशिवाय आणि त्याचप्रमाणे आचार्य अत्रेच्याशिवाय पुण्यातील गणेशोत्सव अधुरा होईल.
त्या काळामध्ये भीमसेन जोशीचे गायन, सरस्वतीबाई राण्याचं गायन, हिराबाई बडोदेकर यांचे गायन, बालगंधर्व गायन, त्याप्रमाणे बी. सायन्ना, सरस्वती एक गायिका होती तिचं एक गाणं सैंया झुटोंका बडा सरताज निकला. पेंढारकर होते त्यांचा गायन कार्यक्रम असे. त्याचप्रमाणे मावळी मेळे मन कलाकाराच्या पार्ट्या, डान्सिंग पार्ट्या, संजीवन मेळा, बाल संजीवन मेळा, या संजीवन मेळ्यामध्ये डॉक्टर शारदाबाई मराठे मॅट्रिकची होमवाल्या यांच्या दोन मुली एक छोटी प्रभा मराठे आणि थोरली उमा या दोघींनी गणेशोत्सव गाजवलेला आहे. शांता आपटेदेखील गणेशोत्सवातून पुढे आलेल्या आहेत.
गजानन वाटवे यांचे गेला दर्यापार घरधनी राधे तुझा सैल अंबाडा, बबनराव ना वडीकरांचे रानात सांग कानात, त्याचप्रमाणे मालतीबाई बघण्यात गायन मैफल असे. पीयूची वहीच्या डॉक्टर संगीता बर्वे यांची सासू!
भाषणाच्या बाबतीमध्ये एकमेव हातखंडा वक्ता म्हणजे आचार्य अत्रे! आचार्य अत्रे यांनी पुणे दणाणून सोडलेले होते. या विविध गणपती मंडळादर्शनाच्या कार्यक्रमांमध्ये आचार्य अत्रे यांची भाषणे! तीही विनोदी भाषणे, सामाजिक विषयावरची भाषणे, राजकीय विषयावरची भाषणे, सांस्कृतिक विषयावरती भाषणे, शैक्षणिक क्षेत्रात संदर्भातली भाषणे या सर्व प्रकारच्या भाषणांसाठी आचार्य अत्र्यांनी गणेशोत्सव गाजविला होता. बरीच व्याख्याने झालेली आहेत.
फडके हौद, तुळशीबाग, दक्षिणमुखी मारुती, भाजीराम मंदिर नारायण पेठ गेट, कुंटे चौकातील नगरकर, तालमीच्या गणपती समोर आचार्य अत्रे यांचे भाषण, उंबऱ्या गणपती जवळ आचार्य अत्रेंचे भाषण, त्याचप्रमाणे गायकवाड वाड्यामध्ये देखील आचार्य अत्रे यांचे भाषण होत असे. ए. डी. कॅप चौक, कॅपातील मंडई येथे देखील भाषणे गाजत. आता ज्यावेळेला पोलीस कमिशनरनी दहा वाजेपर्यंतच आवाज बंदी केली आहे तशीच बंदी मोरारजीभाई सरकारने कार्यक्रमाला बंदी केली होती. कार्यक्रमाला बारा वाजेपर्यंत परवानगी नंतर कार्यक्रम बंदी असे. त्यावेळेला मोरारजी सरकारचे बारा वाजले आहेत मी कार्यक्रम संपवितो. प्रत्येक भाषणाच्या शेवटी आचार्य अत्रे असं म्हणत की, आता मोरारजीचे बारा वाजलेले आहेत मी माझं भाषण संपवतो, हे त्याच पालुपद असे. जगजागृती, समाज लोकशिक्षण, समाजजागृती सर्व भाषणामधून आचार्य अत्रे करीत असत.
ज्या वेळेला 1942 सालामध्ये आचार्य अत्रे मुंबईला गेले त्या वेळेला त्या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये 23 जानेवारीला चिंतामणराव देशमुख यांचे गडकऱ्यांच्यावर व्याख्यान ठेवलेलं होतं. त्या काळामध्ये मुंबईमध्ये घोड्याच्या रेसेस, शेअर बाजार या संदर्भामध्ये कार्यक्रम असत. मुंबईमध्ये या आर्थिक व्यवहाराच्या संदर्भामध्ये उलाढाली चालू असत. गंगाधर गाडगीळ असं म्हणतात, आचार्य अत्रे मुंबईमध्ये आले आणि मुंबई मधलं सांस्कृतिक जीवन सुरू झालं. हे खुद्द गंगाधर गाडगीळ आचार्य अत्रेचे टीकाकार हे सत्य सांगून गेलेले आहेत. आणि तो उल्लेख पटण्यासारखादेखील आहे. कारण मुंबई शहर हे आर्थिक राजधानी असल्यामुळे आर्थिक उलाढाल, इन्व्हेस्टमेंट, शेअर बाजार सोडती, मटका याच्या संदर्भामध्ये गुंतलेले होते. सगळे लोक या व्यवहारात दंग होते. त्यामुळे सांस्कृतिक जीवनाला आचार्य अत्रे आल्यानंतर भाषणाचा सपाटा त्यांनी सुरू केला. कित्येक भंडारी हॉल, वनमाळी हॉल, सुंदरलाल हॉल, जांबोरी मैदान, नरे पार्क, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, गेट-वे ऑफ इंडिया, रॉयल ऑपेरा हाउसमध्ये सलग सहा दिवस मालतीबाई बेडेकरांच्या कळ्यांच्या नि:विश्वास, हिंदोळ्यावर या वादळ निर्माण करणाऱ्या कादंबऱ्यावर आचार्य अत्रे यांनी मुंबई ढवळून काढलेली होती. शिवाजी पार्कही गाजविला आचार्य अत्रे यांनी.
ज्यावेळेला आचार्य अत्रे यांची जन्मशताब्दी 1997 मध्ये साजरी झाली त्या काळामध्ये मी गणपती उत्सवाच्या अगोदर जी मिटींग झाली होती त्यामध्ये आचार्य अत्र्यांच्या जीवनावर देखावे करावेत असा प्रस्ताव मांडला होता. परंतु बहुसंख्य मंडळींनी माझा प्रस्ताव अमलात आणला नाही. फक्त साखळी येथील रवींद्र माळवदकर यांनी आचार्य त्यांच्या जीवनावर देखावा सादर केला होता. नंतर 2018 सालामध्ये कावरे कोरडेगाव तेथील गणपती मंडळाने माझ्याकडील आचार्य अत्रे यांच्या जीवनावरचे दहा-बारा फ्लेक्स आपल्या देखाव्यामध्ये सामील केलेले होते. याच्या पलीकडे गणपती मंडळांनी आचार्य अत्रेंची दखल अजिबात घेतली नाही हे सांगायला अतिशय खेद होत आहे. ज्या पुण्यामध्ये आचार्य अत्रे सर्वांगाने विकसित झाले, परिपूर्ण झाले. पुणे शहराला वैभवाच्या शिखरावर नेले. पुणे शहराला दख्खनची राणी करायचा त्यांचा इरादा होता. त्या पुणे शहराने आचार्य अत्रे यांची उपेक्षा केलेली आहे. आचार्य अत्रे देहाने जरी मुंबईत होते तरी मनाने ते सदैव पुण्यात होते आणि पुणेकर होते.
– ऍड. बाबुराव कानडे