मंचर – अतिवृष्टीमुळे मंचर परिसरातील बाधित शेतकऱ्यांच्या संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
मंचरमधील मोरडेवाडी, बाणखेले मळा, शेवाळवाडी बायपास आदी ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस होऊन बांधही वाहून गेले, पिकांची नासाडी झाली. रहिवासी सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून खड्डे झाले. याबाबत आढळराव पाटील यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. यावेळी माजी उपसरपंच धनेश मोरडे, शिवसेना तालुकाप्रमुख अरुण गिरे, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, माजी ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल बेंडे, ग्राहक संरक्षण कक्ष उपाध्यक्ष शिवाजी राजगुरू,युवासेना उपजिल्हाधिकारी कल्पेश बाणखेले, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, शिवसेना विभागप्रमुख संतोष मोरडे, भैरवनाथ पतसंस्थेचे माजी संचालक योगेश बाणखेले, विशाल मोरडे, मंचर शहरप्रमुख रामदास जाधव उपस्थित होते.
यापुढील काळात येथे करावयाच्या उपायोजनांबाबत ग्रामस्थांशी आढळराव यांनी चर्चा केली असून, त्यानुसार मोरडेवाडी भागात पूर्वी असलेल्या ओढापात्राची रुंदी वाढवून येथे साठणारे मैला व सांडपाणी आदींचा बंदिस्तपणे निचरा करण्यासाठी विठ्ठल मंदिर ते नवी आळीमध्ये गटार व्यवस्था करण्याबरोबरच बायपास रस्त्याला पाण्याचा प्रवाह आणि उपमार्ग करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे ग्रामस्थांना आढळराव पाटील यांनी सांगितले.
शेवाळवाडी बायपासयाठिकाणी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. तालुका आणि जिल्हा प्रशासनाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून नुकसानीच्या पंचनाम्याबरोबर हा प्रस्ताव मंजुरीसाठी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.