बाबा, आज माझा वाढदिवस. आज आपण बाहेर फिरायला जाऊया का? किती महिने झाले, आपण बाहेर कुठे फिरायलाच गेलो नाही?’ शमी तक्रारीच्या सुरात म्हणाली. “हो बाबा, बरोबर बोलतेय शमी. जाऊया ना आपण आज फिरायला.’ बाळूने शमीच्या बोलण्याला दुजोरा दिला. पाठोपाठ शर्वरीनेही बाळूच्या री ला री ओढली. शर्वरी नववीत, बाळू आठवीत तर शमी पाचवीच्या इयत्तेत शिकत होती.
बाबा म्हणाले, “अरे हो हो! पण कुठे फिरायला जायचं? तुमचं काही ठरलंय का?’बाळू म्हणाला, “संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘वनराणी’ ट्रेनमधून फेरफटका मारून येऊया.’ शर्वरी म्हणाली, “राष्ट्रीय उद्यान पाहू. तिथली जंगलझाडी, हिरवे डोंगर, खळाळते झरे, जंगलातील प्राणी आम्हाला सारं सारं पाहायचंय.’ आई लगेच म्हणाली, “अरे पण आज नको. आज शमीचा वाढदिवस. मला सांगा, आपण असे वाढदिवसाच्या दिवशी बाहेर कुठे फिरायला गेलो आणि अशावेळी नेमके पाहुणेरावळे, शेजारीपाजारी घरी आले तर काय वाटेल त्यांना? घराला टाळं पाहून बिचारे आल्या पावली परत जातील. बरं दिसतं का हे?’ बाळू, शमीला आणि शर्वरीला आईचं बोलणं पटलं.
बाळू कसलासा विचार करून मग पटकन म्हणाला, “बरं आई, हवं तर आज नको, उद्या तरी जाऊया का आपण फिरायला? “ठीक आहे, उद्या जाऊया आपण फिरायला. आता खूश ना?’ बाळूने, शमीने आणि शर्वरीनेसुद्धा होकारार्थी माना डोलावल्या.
“बरं चला, आज आपल्या शमूचा वाढदिवस आहे. आपण तो छान साजरा करायचाय. घर सजवूया. शमूचे आजी आजोबा आज शमूसाठी खास भेटवस्तू घेऊन येणार आहेत. एका मुलीची मज्जा आहे बाबा आज!’ बाबा असं म्हणताच शमी लाडातच म्हणाली, “होय होय, आज मज्जाच आहे माझी. त्याचं कारण तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे आणि नसेल माहीत तर पुन्हा एकदा सांगते. असं म्हणून ती ठेक्यात आणि ठसक्यातच पुढे म्हणाली,
घर सजवतात दादा ताई
आईची केक करायची घाई
छानसा ड्रेस आणतात बाबा
आजी आणते लाडवांचा डबा
आजोबांचं मला ठाऊक पक्क
आणतील ते चित्रांची पुस्तकं
काका, काकू, मामा, मावशी
सगळेच हजर एका दिवशी
घर माणसांनी फुलून जाई
कौतुक सारं माझंच होई
आहेच आजचा दिवस खास
माझा वाढदिवस आहे ना आज!
आई हसून म्हणाली, “हो गं बाई. आज आमच्या शमूचा वाढदिवस. केक घरीच केलाय बरं मी. तोही तुझ्या आवडीचा चॉकलेट केक.
शमूने गाण्यात म्हटल्याप्रमाणे संध्याकाळी घर कसं माणसांनी फुलून गेलं. दिवस आनंदात सुरू झाला आणि मावळला तर त्याहून अधिक आनंदात. शमूचा वाढदिवस, तिला आलेल्या भेटवस्तू, केक, चॉकलेट, वेफर्स, जेवणं, गप्पा सारंच भारी. मुलांची खाण्यापिण्याची चंगळ तर विचारूच नका. रात्री उशिरा जेवणं करून पाहुणे निघून गेले.
दुसरा दिवस उजाडला तोही उत्साहातच. सर्वांनी पटापट तयारी केल्या आणि बरोबर सकाळी दहाच्या ठोक्याला सगळेच घराबाहेर पडले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एका तासाभरात पोहचले. बाबा आईला म्हणाले, “कावेरी, अगं उद्यानात येणाऱ्या लहान मुलांसह मोठ्यांनाही अशा “वनराणी’ ट्रेनचं आकर्षण असतं. ही ट्रेन सर्व कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचं आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचं काम करत असते. आईला हे पटलं. मुलांनी दिवसभरात उद्यानात खूप मज्जा केली. बाबांनी उद्यानातील खूप गोष्टी मुलांना दाखवल्या. सर्व फिरून झाल्यानंतर संध्याकाळी सर्वजण एका झाडाखाली बसले. बाळू, शमी आणि शर्वरी तर खूप आनंदात होते. बाबांनी इथल्या झाडांची, पानाफुलांची, इथल्या वन्यजीवांची बरीच माहिती मुलांना दिली.
आई म्हणाली, “मुलांनो, इथला हिरवागार निसर्ग पाहून तुम्हाला खूप आनंद झालाय, हे तुमचा चेहराच सांगतोय. निसर्ग आणि मानव यांचा अतूट संबंध आहे बरं. कारण या निसर्गातून मानवाला बऱ्याच गोष्टी प्राप्त होत असतात. त्या सर्व गोष्टींचा उपयोग मानव आपल्या जीवनामध्ये करत असतो.
शमीने विचारलं, “आई, निसर्ग म्हणजे नक्की काय गं?’
“अगं निसर्ग म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश या पाच तत्त्वांनी मिळून बनलेली सृष्टी. हा निसर्ग खूप दानशूर आहे बरं.’
आता बाळूने प्रश्न केला. “दानशूर? म्हणजे नेमका कसा?’ बाबा म्हणाले, “अरे, हा निसर्ग मानवाला भरपूर काही देत असतो. पण त्या बदल्यात तो मानवाकडून कधीच काही मागत नाही. निसर्ग कधी बोलत नाही, पण कृती मात्र करतो. निसर्ग हा कोणताही भेदभाव करत नाही.’
शर्वरी पटकन म्हणाली, “बाबा, निसर्गातून मानवाला शुद्ध हवा मिळते. तसेच फळं, फुलं, पानं, भोजन, औषधं आणि इंधनसुद्धा मिळते. त्याच प्रमाणे उद्योगांना लागणारा कच्चा मालही मिळतो. बरोबर ना?’ बाबा म्हणाले, “अगदी बरोबर शर्वरी. निसर्ग आपल्याला खूप काही देतच असतो.’
आई म्हणाली, “बरं का मुलांनो, खोल दऱ्या, घनदाट जंगले, उंच उंच बर्फाच्छादित शिखरे, निर्मळ वाहणारे झरे, अथांग सागर, हवेच्या झोक्यावर हिरवीगार डोलणारी शेतं, नारळी पोफळीच्या बागा, डोंगराच्या आडून उगवणारा सूर्य, तसेच आकाशात गुलाल उधळणारी सूर्याची किरणे ही सर्व नयनरम्य चित्रे या निसर्गानेच तयार केलीत. म्हणून हा निसर्ग एक चित्रकारसुद्धा आहे.’
शमी म्हणाली, “बाबा, आई, आज इथल्या निसर्गाच्या सहवासात आपण संपूर्ण दिवस राहिलो. रमलो. खरंच खूप छान वाटलं. माझ्या वाढदिवसाचं हे सर्वात सुंदर गिफ्ट तुम्ही आज मला दिलंय.’
एकनाथ आव्हाड